ग्रामगीता
श्रोतेजन प्रश्न करिती । आमुच्या गांवीं आहे संपत्ति ।
परि सुख न मिळे लोकांप्रति । ऐसें झालें ॥१॥
विकास कार्याचा कोठला ? गांवीं वाद बळावला ।
धनिक-गरीबांचा लागला । वर्ग-कलह ॥२॥
समाज या दोहोंभागीं विभागला । एक न मानी एकाला ।
परस्परांवरोनि विश्वास गेला । उडोनि त्यांचा ॥३॥
आता काय करावी योजना ? कोणाची थोरवी पटवावी जना !
कैसेनि होईल ग्रामरचना । सुंदर आमुची ? ॥४॥
ऐका प्रश्न हा महत्वाचा । आवश्यकचि निर्णय याचा ।
त्यावांचूनि गांवाचा । मूळपायाचि ढासळे ॥५॥
श्रीमंत-गरीबांचा वाद । गांवास करील बरबाद ।
म्हणोनि ही दूर करावी ब्याद । जाणत्यांनी ॥६॥
देवाघरीं एकचि प्राणी । ना श्रीमंत ना भिकारी कोणी ।
ही आहे समाजरचनेची उणी । मानवनिर्मित ॥७॥
मूलसिध्दांतीं भेदचि नाही । हा प्रलोभनांचा खेळ सर्वहि ।
समज येतां दोघांसहि । भेद कांही दिसेना ॥८॥
खेळाकरितां दोन पक्ष केले । परि खेळ विसरोनि लढूं लागले ।
आपसांत वैमनस्य आले । अज्ञानाने ॥९॥
एकाकडे आले अधिक कंचे । तो म्हणे माझ्याचि मालकीचे ।
मग खेळणेंहि थांबलें इतरांचें । एकाचिया लोभामुळे ॥१०॥
ऐसेंचि आहे संसाराचें । घरचें आणि समाजाचें ।
तितंबे झाले कुटूंबांचे । अज्ञानें आणि लोभाने ॥११॥
कामाकरितां जाति केली । काम विसरून जातचि धरली ।
जन्मजात थोरवी मिरविली । वर्णधर्माच्या नांवाने ॥१२॥
ऐसेंचि झालें अर्थव्यवस्थेचें । हिस्सेदार सर्वचि धनाचे ।
पण कांहीच राहिले मानाचे । बाकी मेले भुकेने ॥१३॥
एक राहिला गरीब गडी । एकाची वाढली श्रीमंती बडी ।
ही सर्व अज्ञानाची बेडी । भोवली सगळया ॥१४॥
एकापाशीं ठेव ठेवली । त्याने अविचाराने उपभोगिली ।
कुणाची ठेव ही बोलीच गेली । कालांतराने ॥१५॥
देवळामाजी पुजारी ठेवला । तो देवूळचि ग्रासूनि बसला ।
बायकापोरंसाठीहि केला । उपयोग त्याने देवळाचा ॥१६॥
कोणी तीर्थी सदभक्त झाले । त्यांची देवळावरि सत्ता चाले ।
पुढे व्यापाराचें साधनचि केलें । हक्क दावूनि मुलांनी ॥१७॥
एकाकडे दिली खूप जमीन । गांवें वसवोनि त्यांना द्याया वाटून ।
परि तोचि बसला गबर होऊन । राबणारांसि पिळोनि ॥१८॥
धनासाठी राखणदार आणला । त्याने कमजोर मालक पाहिला ।
आपणचि बळकावून बसला । पैसा शक्तियुक्तीने ॥१९॥
ऐसेंचि झालें गरीबी-श्रीमंतीचें । कष्ट करणारे झाले दूरचे ।
पैसे घेणारे झाले कायमचे । मालक येथे ॥२०॥
श्रमणारापदरीं मोजकें माप । उरला गल्ला आपोआप ।
तो स्वयें उपभोगणें हें महापाप । परि ठरविला न्याय्य हक्क ॥२१॥
खोटयासि दिलें खरें नांव । पैशांनी पैशांचें वाढलें वैभव ।
म्हणती ही पूर्वजांची ठेव । हक्क कुठला श्रमिकांचा ? ॥२२॥
आता कांही केल्या समजेना । कोण पुसतो उपदेश-कीर्तना ? ।
फार तर मुंगियासि साखरकणा । देवोनि म्हणे दान केलें ॥२३॥
हजारोंचें जीवन पिळावें । तेणें त्यांच्यांत रोग वाढावे ।
मग दवाखाने धर्मार्थ घालावे । धर्मशील म्हणवोनिया ॥२४॥
पाहतां आजचा मजूर । न मिळे पोटासि भाकर ।
तैसेंचि काम करवी अहोरात्र । वारे मालक धर्मशील ! ॥२५॥
हा तों राहतो महालीं शहरीं । मुलें गाडी नेती सिनेमादारीं ।
शिकती व्यभिचार व्यसनें चोरी । लुटती कारभारी खेडुतां ॥२६॥
कांहींनी खूप बुध्दि लढविली । संपत्ति अतोनात वाढविली ।
काढोनि कवडीहि नाही दिली । प्राण जातां श्रमिकांचा ॥२७॥
गांवांतील लोक उपाशी मरे । म्हणती मरती ते मरोत बिचारे ।
आयुष्य सरल्या कोण तारे ? पैसा-दवा सब झूट ! ॥२८॥
ऐसें अधिक धन जमविलें । समाजीं कामीं नाही आलें ।
ते चोरचि म्हणावे ठरले । एकलकोंडे आपगर्जी ॥२९॥
ज्याचे पाशी अधिक जमीन । न देई मजुरां पोट भरून ।
तो कशाचा भाग्यवान ? महाकदर्यु म्हणावा ॥३०॥
भव्य वाडा पडला सुनसान । एकचि पत्नी एक संतान ।
परि न देई शेजारपण । वा रे भूषण कृपणाचें ! ॥३१॥
कित्येकांचें जनावरी वागणें । सरंजामशाहीने वजन टाकणें ।
धाकदडपणाने कामें घेणें । घातक होईल यापुढे ॥३२॥
गरीब सारेच ओरडती । श्रीमंत हे गुंड आहेत म्हणती ।
परि यांची लागली नेत्रपाती । कांहीं केल्या उघडेना ॥३३॥
यासि उपाय करावा कांही । त्यासाठी मार्ग दोनचि पाही ।
कायदा अथवा धर्ममार्ग राही । सेवाभावें समज द्याया ॥३४॥
यासहि कोणी न घालती भीक । त्याने पुढे चिडती लोक ।
मग रक्तक्रांतीची ऐकूं ये हांक । वाढे धाक मनस्वी ॥३५॥
कोणी घर फोडोनि चोरी करिती । कोणी डाके मारूनि लुटती ।
कोणी भरदिवसां कापिती । मुलाबाळांसहीत ॥३६॥
ही पाळीच कां येऊं द्यावी ? म्हणोनि कांही योजना शोधावी ।
गरीब-श्रीमंत दोन्हीहि बरवीं । राहतील ऐसी ॥३७॥
परस्परांचा विचार घ्यावा । आपला समतोल हिस्सा ठेवावा ।
कोणासहि राग न उदभवावा । ऐसें करावें गांवाने ॥३८॥
तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुध्दि आमुचा उद्यम ।
एकाचा घोडा एकाचा सरंजाम । असावा जैसा ॥३९॥
मुळीं जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना ।
सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो सन्माना घ्यावया ॥४०॥
कोणाचे निभेना वगळूनि ग्राम । प्रत्येकासि प्रत्येकाचें काम ।
काम झालिया पुन्हा भ्रम । वाढतो याचा ॥४१॥
सुतार याचे खांब करी । बेलदार याची भिंत उभारी ।
कुंभार याचे कवेलू उतारी । छावणीसाठी ॥४२॥
लोहार खिळेफासे घडवी । मजूर बांधी घरें-पडवी ।
ऐसें न करितां हा गोसावी । राहता कोठे ? ॥४३॥
चांभार याचे जोडे बनवी । विणकर याला वस्त्रें पुरवी ।
नीटनेटके कपडे शिवी । शिंपी यासाठी ॥४४॥
शेतकरी याला पिकवोनि दे । धान्य मिरची भाजी कांदे ।
सर्वांच्या श्रमें घर आनंदें । साजवी हा आपुल्यासाठी ॥४५॥
सर्वांचे हात सर्वासि लागे । सर्वांस जगविती गुंतले धागे ।
हें समजोनि जो गांवीं वागे । तोचि खरा बुध्दिमान ॥४६॥
परि यांत भाव वाईट शिरला । कोणी न मानीच कोणाला ।
म्हणे पैसे देतों आम्हीं सकलां । म्हणोनि कामें करिती हे ॥४७॥
खरे महत्त्व आहे परिश्रमाला । परि हा मानतो पैशाला ।
काम न करितां, पैसा असला । तरी काय भागतसे ? ॥४८॥
खोदूनि आणली गोटेमाती । तासली फाडी रचल्या भिंती ।
तेव्हाच बनली ती संपत्ति । परिश्रमाच्या स्पर्शाने ॥४९॥
रानीं असोत लांकडे काडया । त्या श्रमाविण न होती गाडयामाडया ।
श्रमाविण संपत्ति म्हणजे कवडया । त्याहि वेचल्या श्रमाने ॥५०॥
खरें याचें तारतम्यज्ञान । सर्वांनी असावें समजोन ।
वाहावा सर्वांचा योगक्षेम पूर्ण । हाचि धर्म धनिकांचा ॥५१॥
गांवीं जे जे श्रीमंत असती । तयांचें धन गांवची संपत्ति ।
समजोनि वागावें या रीतीं । मदत द्यायासि प्रसंगीं ॥५२॥
आपणापाशी अधिक असे । शेजार्यासि पुरवावें हर्षें ।
सर्व मिळोनि राहावें सरिसें । गांवधर्म म्हणोनिया ॥५३॥
धन हें गरीबांचें रक्त । समजोनि वागोत श्रीमंत ।
श्रम ही गांवाची दौलत । म्हणोनि व्हावा मान तिचा ॥५४॥
ऐसें केलिया सकळ जनांनी । वर्गभेद मिटतील गांवचे दोन्ही ।
यास बुध्दि द्यावया उपजोनि । साधुसंतांनी काम घ्यावें ॥५५॥
आणि सावध असावें सरकार । नीटनेटका घडवाया व्यवहार ।
जनतेमाजी भराभर । वारें शिरवावें शिक्षणाचें ॥५६॥
लहान मुलीमुलांपासोनि । मिटवावी गरीब-श्रीमंत श्रेणी ।
सर्वांस पाहाया समानपणीं । लावावें प्रत्यक्ष कृतीने ॥५७॥
शब्दांत नको समसमान । प्रत्यक्ष पाहिजे धनमानशिक्षण ।
फूट पाडिती ते द्यावेत हांकोन । गांवचे भेदी ॥५८॥
नसतील ऐकत जे जे कोणी । त्यांना कायद्याने घ्यावें आटपोनि ।
मग रचना करावी समानगुणीं । इमान जागीं ठेवोनिया ॥५९॥
जैसे बापास पुत्र सारिखे । तैसे गरीब श्रीमंत राजाचे सखे ।
हा भेद मिटविणें काम निकें । त्याचेंचि असे राजधर्में ॥६०॥
पण जेथे सरकार मिंधा झाला । तेथे आग लागली प्रजेला ।
मग कोण पुसे कोणाला ? धिंगाणा झाला पहा सर्व ॥६१॥
संतसाधूहि मिंधे झाले । दक्षणेवरील मोहून गेले ।
मग पर्वताचे कडेचि लोटले । समाजावरि ॥६२॥
जनतेचा मग वालीच नाही । ती चेततां मग आगचि सर्वहि ।
भस्म होईल सगळी मही । हाहा:कारें ॥६३॥
सगळी जनता बंदिस्त केली अथवा मारोनि टाकिली ।
तरी श्रमाविण पैदास कुठली ? कष्टावें लागेल सर्वांसि ॥६४॥
मग हें ऐसें कां होऊं द्यावें ? सकळांनी आधीच जागृत व्हावें ।
आपुल्या परीने सावरावें । कार्य नीट गांवाचें ॥६५॥
उत्तम व्यवहारें धन घ्यावें । उत्तम कार्यासाठी लावीत जावें ।
जेणें परस्परांचें कल्याण व्हावें । तैसेचि करावे व्यवहार ॥६६॥
ऐसा कदर्युपणा नसावा । की ज्याने गांवचि व्याजें बुडवावा ।
प्रसंग पडतांहि न द्यावा । साथ लोकां ॥६७॥
अविचाराने न उधळावें धन । फसवोनि न घ्यावें गरीबांपासून ।
दोन्ही मार्ग समसमान । ठेवावे देवघेवीचे ॥६८॥
न व्हावा शेवटचा कळस । म्हणोनि सहानुभूतीचा वाढो हव्यास ।
विरोधचि करूं नये यास । कोणी कोणा ॥६९॥
सगळयांनी मिळोनि वागावें । सर्वांचें समजोनि कार्य करावें ।
श्रीमंत-गरीब दिसोंचि न द्यावे । बहिरंग जीवनीं ॥७०॥
ते दिसावेत गुणावरि । बुध्दीवरि, कार्यावरि ।
ऐसे असले प्रकार जरी । समताभाव तरी न सोडावा ॥७१॥
याचें समाजासि मिळे शिक्षण । तोचि खरा भाग्याचा दिन ।
त्यासि नाही मग भंग जाण । कल्पकाळीं ॥७२॥
समाजांत जेव्हा धुरीण वाढती । तेव्हाचि ऐसी होय क्रांति ।
आपोआपचि मिटेल भ्रांति । पक्षभेदांची ॥७३॥
तेचि करितील परिवर्तन । समाजांत उत्तम ज्ञानकण ।
पेरूनि करितील परम पावन । भारतमाता ॥७४॥
ऐसी सुबुध्दता सगळयांत यावी । तरी श्रीमंती-गरीबी मिटावी ।
नाहीतरि गति बरवी । नाही आता समाजीं ॥७५॥
हें समजणेंचि जरूर आहे । काळ याचीच वाट पाहे ।
तो ऐसा थांबलाचि न राहे । स्वारी करील वेगाने ॥७६॥
म्हणोनि माझें एवढेंचि सांगणें । वाढवा सामाजिक वृत्तीचें लेणें ।
मिरवा सामुदायिकतेचीं भूषणें । लोकांमाजी ॥७७॥
नुसतें श्रीमंत सहकार्य देती । खर्चूनि लक्षावधि संपत्ति ।
तरी तेवढयाने ही भेदवृत्ति । जाणार नाही ॥७८॥
ओळखोनि श्रमाची प्रतिष्ठा । त्यांनी दावावी कार्यनिष्ठा ।
श्रमणारांच्या निवारावें कष्टा । स्वत: श्रम करोनिया ॥७९॥
सर्वांनी सर्वांसि पूरक व्हावें । ऐसें धर्माचें सूत्र बरवें ।
हें काय तुम्हांसि सांगावें ? शहाणे जनहो ! ॥८०॥
त्याअभावीं बिघडली गांव-स्थिति । कोणी जनावरासम राबती ।
कोणी नाजुक होवोनि फिरती । टोळभैरव ॥८१॥
कोणी म्हणती धनी आम्ही । काय आहे आम्हां कमी ?
कमाई केली वडिलें नामी । घरबसल्याचि आमुच्या ॥८२॥
हें तयांचें महाअज्ञान । कळली नाही त्यांना खूण ।
यापुढे जाईल धन-जमीन । निकष्टिकांची ॥८३॥
न करितां काजकाम । पावेल कोणा जीवा आराम ?
सर्व धांवतील होवोनि बेफाम । निकष्टिकांमागे ॥८४॥
म्हणोनि सांगणें उद्योगा शिका । पराधीन राहूं नका ।
आपुल्या हक्काचा हा पैका । गोडी चाखा तयाची ॥८५॥
आज निकष्टिकांची चालती । उद्या विचारूं नका फजीती ।
म्हणोनि समजोनि घ्यावी युक्ति । उद्योगाची ॥८६॥
सर्व तर्हेच्या कलाकुसरी । शिकूनि वागावें शहाण्यापरी ।
पोट भरावयाची उजागरी । तेव्हा लाभे ॥८७॥
हें जंव करितील शिक्षितजन । तेव्हा बंद होतील मजुरांचे वाग्बाण ।
नाहीतरी ते बेईमान । ठरवितील आपणां ॥८८॥
म्हणतील आम्हीं कष्ट करावे । तुम्ही आरामांत राहावें ।
सांगतां ’ समानतेने ठेवावें ’ । कोण म्हणेल पुढारी ? ॥८९॥
सर्वांवरि सारखेंच प्रेम । मग सर्वांकरितां एकचि नियम ।
सर्वांनी करावेत परिश्रम । अपापल्या परींनी ॥९०॥
एकाने करावें काम । दुसर्याने करावा आराम ।
हें तों आहे हराम । देश-हिताच्या दृष्टीने ॥९१॥
दुनिया आहे कष्टिकांची । जो जो कसेल शेती त्याची ।
जो काम करील लक्ष्मी तयाची । दासी व्हावी नियमाने ॥९२॥
ऐसी आहे आजची प्रवृत्ति । पाहिजे हेंचि समाजा प्रति ।
त्यांत थोरांनी तरी खंती । काय म्हणोनि मानावी ? ॥९३॥
विद्वानाने शिक्षिताने । महंताने श्रीमंताने ।
कष्ट कराया मुद्दाम लागणें । हेंचि मोठेपणाचें ॥९४॥
तेणें सर्वांस होईल सुकर । कामें करितील जन भराभर ।
लाज जाईल निघोनि पार । वैभवाने निर्मिलेली ॥९५॥
कामांत पडले बुध्दिमान । तेणें प्रत्यक्षांत येईल ज्ञान ।
शेतीभातीची उन्नति पूर्ण । विकास होईल देशाचा ॥९६॥
एरव्ही उद्योगाविण जें भोगणें । तें मानवासि लाजिरवाणें ।
आळशासि खाणेंपिणें । देणें असे महापाप ॥९७॥
श्रमाने अंगीं हीनता येते । ऐसें बोलती कोणी एक ते ।
समजावे देशघातकी पुरते । उपद्रवी पापभक्षी ॥९८॥
आपुलें करावयासि काम । कां वाटावी लाजशरम ?
उलट गर्व असावा निस्सीम । कामाचा आपुल्या ॥९९॥
जयास जैसी अभ्यासरीति मानवेल जैसी कार्यपध्दति ।
घेऊनि तेंचि शिक्षण सुमति । यावें पुढती तयाने ॥१००॥
कामें सर्वचि मूल्यवान । त्यांची योग्यता समसमान ।
श्रीकृष्णें सिध्द केलें उच्छिष्टें काढून । ओढिलीं ढोरें विठ्ठलें ॥१०१॥
कोणाचीच योग्यता कमी नाही । सर्वचि कामें आवश्यक हीं ।
म्हणोनि कामाचा बदला सर्वांहि । सारखा असे सामान्यत: ॥१०२॥
एक शेतीकामाचा कामगार । एक बेलदार सुतार लोहार ।
शिंपी धोबी कुंभार चांभार । सारिखेची उपयुक्त ॥१०३॥
कोणी भंगी-काम करी । कोणी वैद्य नाम घरी ।
कोणी देवालयीं सक्रिय पुजारी । सारिखेचि उपयुक्त ॥१०४॥
कोणी बुध्दिवंत पुराण सांगे । कोणी चुकलिया लावी मार्गे ।
जैसी ज्याची योजना निसर्गे । सहजचि केली त्यापरीं ॥१०५॥
परि सर्वांना सर्वांचा आदर । ऐसा असावा जगाचा व्यवहार ।
कोण ब्राह्मण कोण महार ? कामामाजीं सारिखे ॥१०६॥
येथे कामांत उच्च-नीचता । कोणें ठरवावी व्यवहारत: ?
प्रत्येक काम महत्त्वपूर्णता । आपुल्या स्थानीं ठेवितसे ॥१०७॥
आहे सर्वांचीच गरज । सर्वकाळ सहजासहज ।
एक नसतां जग-जहाज । अपूर्णता दावीतसे ॥१०८॥
दोर घेवोनि साखळीचा । बोझा बांधावा लाकडांचा ।
एक तुटतां तार कडीचा । सर्व पडे विस्कटोनि ॥१०९॥
तैसी आहे कामांची गति । काम असावें सर्वांप्रति ।
तरीच जगेल ही क्षिती । सारखेपणीं राबतां ॥११०॥
ज्याचा असेल जो जो बाणा । तो लावावा देश-कारणा ।
जो असेल ज्या कार्यी शहाणा । तेंचि पुरवावें तयाने ॥१११॥
ज्यासि पुरेल जैशापरी । तैसी भरपूर द्यावी सामुग्री ।
श्रम करावे आपापल्यापरी । जैसी बळबुध्दि ज्यापाशीं ॥११२॥
ऐसें गांवीं कराल काम । तेणेंच पावेल आत्माराम ।
लाभेल संतोषाचें निजधाम । नाहीतरि संकट ना टळे ॥११३॥
अरे ! उठा उठा श्रीमंतांनो ! । अधिकार्यांनो ! पंडितांनो ! ।
सुशिक्षितांनो ! साधुजनांनो ! । हांक आली क्रांतीची ॥११४॥
गांवागांवासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा ।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकडया म्हणे ॥११५॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।
श्रमसंपत्तिमहत्त्व कथित । सतरावा अध्याय संपूर्ण ॥११६॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥