वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय चोविसावा

ग्रामगीता

अध्याय चोविसावा : यात्रा-मेळे

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतयाने केला प्रश्न । गांवीं संप्रदाय असती भिन्न । 
वेगवेगळे त्यांचे एकूण । देवधर्म उत्सवादि ॥१॥

ते सार्वजनिक उत्सवींहि येती । तरी आपणांसि वेगळे समजती । 
आपापली भिन्न मानूनि संस्कृति । चालती सर्व ॥२॥

त्यांचे फड निरनिराळे । साजविती भिन्न देवळें । 
कोठे प्रतिमापूजेचे सोहळे । कोणी मूर्तिविरोधक ॥३॥

कित्येकांची तीर्थी धाव । ते इतरांसहि देती उठाव । 
इकडे ओस पडलें गांव । तरी पर्वा नाही ॥४॥

या सर्वांचीं मतें वेगळीं । भिन्न त्यांची संतमंडळी । 
एकएकाची करितो टवाळी । आपाआपुल्या गोटांत ॥५॥

वेगवेगळया शिष्यशाखा । वेगवेगळे गुरु देखा । 
कोणी न मिळती एक-एका । करिती उत्सव आपुले ॥६॥

खरें-खोटें ज्ञान कांही । अंधरूढया शिकविती पाही । 
गट पडले भिन्न भाविकांचेहि । मिरविती द्वाही आपुलाली ॥७॥

हे जोंवरी एक न होती । तोंवरी संघटनेची फजीती । 
यासि उपाय करावा कोणेरीतीं । तेंचि आम्हां सांगावें ॥८॥

श्रोतयांचा प्रश्न मार्मिक । उत्तर ऐका आवश्यक । 
गांवापासोनि विश्वापर्यंत देख । जरूरी याची ॥९॥

भिन्न भिन्न झाले गट । वेगवेगळे पडले तट । 
आकुंचित मतें शिकविती रोगट । समाजासि ॥१०॥

अंधश्रध्देस आणोनि पूर । लोकीं रुजविती मिथ्याचार । 
त्यांच्या उत्सवांचे प्रकार । विचित्रचि असती ॥११॥

अपार धनाची धुळधाणी । अनिष्ट प्रथांची पेरणी । 
फुटीर वृत्ति वाढेल जनीं । ऐसी करणी कितीकांची ॥१२॥

कित्येक बुवा वेषधारी । जगती ऐशा गटांवरि । 
खरें ज्ञान न देती स्वार्थभरीं । जनतेलागी ॥१३॥

ऐसें हें जोंवरि चाले । तोंवरि गांव भ्रमीं बुडालें । 
सुधारणेच्या मार्गी आले । दरी-दरकुटे ॥१४॥

यासाठी एकचि उपाय । आपण न ठेवावे अलग ठाय । 
त्यांच्यांत जावें मिळोनि निर्भय । समुदाय साधाया ॥१५॥

असो कोणाचा कोणता पंथ । असो कोणीहि बुवा महंत । 
सर्वा आपुलेचि मानोनि सतत । जावें मिळोनि सर्वांशीं ॥१६॥

पंच महोत्सवचि आपुले । येर ते तुच्छ मानतां चुकलें । 
आपण अलग पडतां कसलें । साधेल ऐक्य ? ॥१७॥

म्हणोनि निर्वाळा सांगतो । जेव्हा संतजयंति पुण्यदिन येतो । 
तेव्हा सगळयांमिळोनि करावा तो । सार्वजनिक स्थानीं ॥१८॥

मग तो असो कोण्या पंथाचा । वेगळी न ठेवावी वाचा । 
संतसज्जन सखा विश्वाचा । म्हणोनिया ॥१९॥

सर्व पंथांचे उत्सव । ज्यांत दिसेल सत्यगौरव । 
त्यांतूनि विशालतेचे भाव । भरावे लोकीं ॥२०॥

एकलकोंडे राहूं नये । घरींच उत्सव करूं नये । 
सर्वांचें सहकार्य घ्यावें । हेंचि मर्म संघटनेचें ॥२१॥

उत्सवाचा व्हावा परिणाम । म्हणोनि प्रभावी ठेवावे कार्यक्रम । 
थोरांचें भाषण भजन उत्तम । करावें तेथे ॥२२॥

करितां संतांचा गुणगौरव । सांगूं नये चमत्कारलाघव । 
पाडवा उत्तम वागणुकीचा प्रभाव । समाजावरि ॥२३॥

संत ज्ञानेश्वर, तुकाराम । नामदेव, सांवता, चोखा अनुपम । 
एकनाथ, दामाजी भागवतोत्तम । वर्णावे लोकीं ॥२४॥

सजन कसाई, रविदास चांभार । सेना, संताजी, गोराकुंभार । 
कृष्णदयार्णव, वामन, श्रीधर । संतकवीहि ॥२५॥

रामदास, तुलसीदास । केशवदास, कबीरदास । 
सुंदरदास, विष्णुदास । सूरदासादि ॥२६॥

शंकराचार्य, रामानुजाचार्य । मध्वाचार्य, वल्लाभाचार्य । 
राधास्वामी, बसवाचार्य । रमणमहर्षि, श्रीचक्रधर ॥२७॥

शहादत्त, गोरखनाथ । गोविंदनाथ, दयाळनाथ । 
नरसी मेहता, रामतीर्थ । श्रीसमर्थ आडकोजी ॥२८॥

महात्मा मंसूर, महंमद । कवेंरराम, शेखफरीद । 
झरतुष्ट्र आणि गौतमबुध्द । विवेकानंद प्रभावी ॥२९॥

गुरु गोविंदसिंह, नानकदेव । महाचैतन्य गौरांगदेव । 
रामकृष्ण परमहंसदेव । जैन महावीर स्वामी ॥३०॥

महात्मा येशु, टालस्टाय । मार्क्स, साक्रेटीस निर्भय । 
महात्मागांधी, राममोहनराय । दयानंदादि महाज्ञानी ॥३१॥

भक्त मीराबाई, मुक्ताबाई । कान्होपात्रा, जनाबाई । 
रंगनायकी, बहिणाबाई । एनिबेझंट, निवेदिता ॥३२॥

ऐसे जे जे योग्य प्रभावें । त्यांचें चारित्र्य समजोनि द्यावें । 
त्यांनी समाजकार्या गौरवें । काय दाविलें जनतेसि ॥३३॥

ऐसियांची पुण्यतिथि आदि करावी । सर्वांची प्रार्थना घ्यावी । 
उत्तम वक्त्यांनी चरित्रें बोलावीं । परिणाम होईल त्या शब्दीं ॥३४॥

त्यांची विशालता समजोनि द्यावी । समान भावना अनुसरवावी । 
समाजानेहि तैशीच करावी । प्रगति आपुली म्हणोनि ॥३५॥

संत देहांनी भिन्न असती । परि ध्येयधोरणानें अभिन्न स्थिति । 
साधनें जरी नाना दिसती । तरी सिध्दान्तमति सारिखी ॥३६॥

ऐसें सांगतां अभ्यासें वर्णूंन । भिन्न संप्रदायांचें होईल मिलन । 
होईल बुवाबाजीचेंहि खंडन । सर्वतोपरीं ॥३७॥

नाहीतरि पंथांचे पडती गट । सहकार्याचा भंगे तट । 
पोटभरू दांभिकांचे पोट । चालतसे तयावरि ॥३८॥

आपापल्या भाविक जना । भुलविती उत्सवादिकीं नाना । 
अंधश्रध्देने होय धिंगाणा । ग्रामजीवनाचा ॥३९॥

म्हणोनि आणावे मैदानावरी । आकुंचितपण सारोनि दुरी । 
मग सत्यचि बोलेल वैखरी । सर्वामुखीं मंगल ॥४०॥

गांवीं येवोत संत कोणी । बोध करवावा प्रार्थनीं । 
अथवा सार्वजनिक स्थानीं । सर्वांसाठीं उत्सवादिकीं ॥४१॥

तेथे न सांगवेल भाकडकथा । न पाळवेल अनिष्टप्रथा । 
मार्ग लाभेल आइता । लोकां सत्य ज्ञानाचा ॥४२॥

ज्ञानाचिया भूमिकेवरि । फारशा भेदासि न उरे उरी । 
मिळते जुळते बोल बहुपरी । निघती सर्वांचे ॥४३॥

तेणें निरसेल भेद-कल्पना । तात्त्विकताचि कळेल जना । 
पंथबाजीच्या उच्चाटना । उपाय हा अमोलिक ॥४४॥

जेथे लोक समभावनेने बैसले । तेथे यथार्थचि चर्चा चाले । 
देव-संत-धर्म-ऐक्य साधे भलें । हळुहळू तेणें ॥४५॥

म्हणोनि ऐसे वारंवार । प्रसंग आणावे गांवीं सुंदर । 
साधुसज्जन जुळवावे अपार । भिन्न भिन्न पंथांचे ॥४६॥

ऐक्य दृष्टीने संतोत्सव । करावे उत्साहें गांवोगांव । 
जेणें तीर्थाचा गौरव । लाभेल गांवा ॥४७॥

तीर्थी निर्मल साधुवृंद । तेथे तत्त्वचिंतानुवाद । 
जनास होईल तत्त्वबोध । म्हणूनीच महत्त्व तीर्थाचें ॥४८॥

एरव्ही ’ तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनीं ’ । 
ऐसीच वदली संतवाणी । गर्जोनिया ॥४९॥

तैसें आज मार्गदर्शन । जया तीर्थी न होय पूर्ण । 
तेथे धाव घेवोनि कोण । लाभ या जना ? ॥५०॥

यात्रेस जावें तरि सेवेसाठी । विचारस्फूर्ति आणाया गांठीं । 
तेणें गांव करावें उठाउठीं । यात्रारूप आपुलें ॥५१॥

परंतु यात्रा करिती चारोधाम । लोकां मागती न करितां काम । 
यांत न घडे पुण्यकर्म । वाउगा भ्रम अहंकार ॥५२॥

गांवीं उपाशी ठेवोनि बाळां । जावें कासया कुंभमेळां ? 
देव गांवीं थोडा तीर्थी निराळा । ऐसें नाही ॥५३॥

परि लोक सती पडाया जाती । पंडयादिकांच्यां जाळीं गुंतती । 
मेंढरापरी धांवोनि मरती । रूढीमागे ॥५४॥

पंढरीपासून सहा कोसांवरि । सांवता राहिला जन्मभरि । 
देव मिळविला न करितां वारी । गांवींच त्याने ॥५५॥

जनता-जनार्दनाच्या सेवेचें । काम करितां इमानें साचें । 
गांवींच पुण्य पंढरीचें । धांव घेंई आपैसें ॥५६॥

वसती जेथे ऐसे संत सेवक । तें गांवचि तीर्थ होय सुरेख । 
स्फूर्ति घेवोनि जाती लोक । कराया गांवें भूवैकुंठ ॥५७॥

जेथे प्रेम आणि पावित्र्य । त्यासीच नाम तीर्थक्षेत्र । 
कासया जावें गोंधळ विचित्र । बघाया तीर्थी ? ॥५८॥

गांवाचें सार्वजनिक स्थान । तेंचि समजावें तीर्थ महान । 
तेथेचि लागावें तन-मन-धन । दानशूरांचें ॥५९॥

तीर्थी कोणी खर्च न करावा । आधी गांवमार्ग सुधारावा । 
तरीच तीर्थाचा पुण्यठेवा । गांवीं मिळेल सेवेने ॥६०॥

वांचवूनि ग्रामसंपत्ति । गांवाची पवित्र घडवावी मूर्ति । 
मग न जातांहि क्षेत्रीं तीर्थी । पुण्य लाभे ग्रामोध्दारें ॥६१॥

सप्ताह, एक्के, यज्ञ, उत्सव । यासाठी वर्गणी होते ती सर्व । 
कांही वर्षें सुधाराया गांव । याच कामीं लावावी ॥६२॥

जयंति असो वा पुण्यतिथि । सप्ताह असो वा हवनें, पंगती । 
पाहावी गांवाची राष्ट्राची स्थिति । तैसेंचि करावें पुण्यकर्म ॥६३॥

सर्व पंथीयांनी मिळावें । सर्वांच्या हिताचें कार्य उभारावें । 
हेकटपणें भरी न भरावें । भलतियाचि ॥६४॥

नाहीतरि महानुभाव पळे रानीं । देवीभक्त सज्ज होती बलिदानीं । 
कोणी द्रव्य उधळती शिगर रचोनि । एकलकोंडे ॥६५॥

कोणी वर्गणी गोळा करून । देवीसि देती पशूंची दावण । 
परि रोग न जाती ग्रामसफाईविण । ऐसे उत्सव केलियाने ॥६६॥

कोणी गांवच्या यात्रेमाजीं । नाना अनिष्ट कामकाजीं । 
पैसा उधळोनि पेरती समाजीं । जहरचि जैसें ॥६७॥

त्यासाठी करावी यात्रा-कमेटी । यात्रा-मेळा-उत्सव-पर्वणी-हाटीं । 
करावया सुधारणा उठाउठीं । राष्ट्रीयतेच्या ॥६८॥

ग्रामोन्नतीचीं आयोजनें करावीं । शक्तिबुध्दीने राष्ट्रीयता भरावी । 
आपुल्या गांवाची कीर्ति जावी । दिगंतरीं तीर्थाऐसी ॥६९॥

गांवीं अथवा गांवाजवळी । यात्रा-मेळा असे ज्या काळीं । 
तेथे सेवा करावी सगळी । स्वयंसेवक होऊनि ॥७०॥

तैसेंचि आपुल्या गांवचें वैशिष्टय । तें जगापुढे मांडाया स्पष्ट । 
प्रदर्शन, संमेलन, यात्रादि इष्ट । सुरू करणें आपुल्या गांवीं ॥७१॥

सुंदर मार्ग सरळ निर्मळ । स्वच्छ आरोग्यदायी जळ । 
ग्रामरचनेंतील आदर्श सकळ । वर्तावेत तेथे ॥७२॥

शौचकूप मुत्र्या चहूं बाजूंनी । नाना वस्तूंच्या ठेवाव्या श्रेणी । 
जेणें देश चढे उच्च स्थानीं । वैभवाच्या ॥७३॥

नाना मनोरंजनें चालवावीं । परि व्यसनें तमाशे येऊं न द्यावीं । 
लोकांस हळुहळु लावीत जावी । रुचि राष्ट्रीयतेची ॥७४॥

उद्योगाच्या सुंदर कला । वाद्यकलादि व्यवहारकला । 
माणुसकीच्या आचारकला । योजाव्या तेथे ॥७५॥

माणसाने मार्गी कैसें चालावें । कैसें बसावें कैसें बोलावें । 
आपुलें वर्तन कैसें ठेवावें । घरांत आणि समुदायांत ॥७६॥

याचा सुंदर पाठ द्यावा । सर्वांचें ऐक्य शिकवावें गांवा । 
यात्रा-उत्सवें संचार व्हावा । नवतेजाचा सर्वांमाजीं ॥७७॥

अनिष्ट प्रथा बंद कराया । सेवकें झिजवावी काया । 
यात्राशुध्दीच्या नाना उपाया । अवलंबावें ॥७८॥

स्वामी दयानंद महाराज । तैसा त्यांचा आर्यसमाज । 
यांनीहि केलें झटूनि काज । सुधारणेचें यात्रिकांच्या ॥७९॥

गाडगे बाबा वैराग्यमूर्ति । तैसीच सेवामंडळ-समिति । 
यात्राशुध्दीसाठी उत्तम रीतीं । प्रयत्नशील सर्वदा ॥८०॥

त्या प्रकारें गांवचे सज्जन । मिळवोनि करावें यात्रा-नियोजन । 
यात्रा म्हणतां ’ या तरा ’ ही खूण । पटावी लोकां ॥८१॥

प्रचंड समुदाय जमवावा । उत्तम सदुपदेश करावा । 
संत-नेत्यांनी लौकिक वाढवावा । लोक-जीवनाचा ॥८२॥

हजारो लोक जरी जमले । तरी आरोग्य जराहि नाही भंगलें । 
लोक सहजपणें आले-गेले । ऐसी व्हावी व्यवस्था ॥८३॥

गेले ऐकोनि कथा-कीर्तन । घेतलें जीवनाचें सामान । 
भेटले परस्परांशीं आदरें पूर्ण । देवाण-घेवाण उत्तम ॥८४॥

याची असावी रूपरेषा । कराव्या नाना समित्या ऐशा । 
जनतेमाजीं सुधारणा आपैशा । घडोनि यावया ॥८५॥

नाना प्रदर्शनें उपयुक्त । नाना चढाओढीहि त्यांत । 
तैसेचि लोकशिक्षणाचे समस्त । कार्यक्रम योजावे ॥८६॥

यात्रादिकांच्या निमित्ताने । घ्यावीं भिन्न पंथीयांचींहि संमेलनें । 
संत-विद्वानांचीं ठेवावीं भाषणें । निर्भेळ विचारांचीं ॥८७॥

न दुखवितां कोणाचा भाव । त्यांच्या सत्तत्त्वाचा करावा गौरव । 
समारोप करावा लक्षूनि एकत्व । मूळचें सत्य ॥८८॥

तेथे भिन्नपण विरोन जाय । दांभिकतेचा न चले उपाय । 
विचित्रपणें वेगळा राहे । वाहोनि जाय प्रवाहीं तो ॥८९॥

हिरा आणि कांचवटी । कळों लागेल खरीखोटी । 
जाहीरपणें विचार-कसोटी । लागतां ऐसी ॥९०॥

कोण संत कोण असंत । काय मिथ्या काय सत्य । 
तें जाणोनि धरितील पंथ । समन्वयाचा सर्व जन ॥९१॥

हत्ती दिसों लागतां सगळा । मग कोणीहि एकांगी आंधळा । 
भुलवूं न शके वेगवेगळा । भागचि हत्ति म्हणवोनि ॥९२॥

ज्या संत-देवांच्या नांवांवरि । पंथ वाढले परोपरी । 
त्यांचे सत्य संदेश घरोघरीं । पोहोचतांचि सर्व साधे ॥९३॥

जैसा गुरु गोविंदसिंहानी । ग्रंथसाहेब रचिला जनीं । 
भिन्न संतांची एकत्र वाणी । झाली संघटनीं पोषक ॥९४॥

महिपतींनी संत-चरित्र । मांडोनि सदभावें एकत्र । 
भाविकजनीं ओविलें सूत्र । एकपणाचें जयापरी ॥९५॥

ज्ञानेश्वरादि संतीं केला । पंढरपुरीं गोपालकाला । 
सर्व पंथांच्या संतांचा झेला । गुंफियेला ज्या भावें ॥९६॥

तैसें संतांचें संमेलन । आणि सर्व संत-स्मृतिदिन । 
पाळतां गांवीं जन-ऐक्य पूर्ण । सहजचि साधतसे ॥९७॥

सर्व नद्या सागरीं मिळोन । पावती महान तीर्थपण । 
तैसे सर्व पंथ ऐक्य साधून । करिती गांवा तीर्थरूप ॥९८॥

कोणत्याहि संतांचा करावा उत्सव । परि चमत्कारांचा नको गौरव । 
द्यावा कर्तव्यमार्गासि उठाव । त्यांच्या जीवना स्मरोनि ॥९९॥

ऐसे कार्योत्सव चालतां गांवीं । तीच भू पंढरी समजावी । 
जेथे नरनारी प्रसन्न बरवीं । दु:खी कोणी असेना ॥१००॥

ऐसें न करितां आपुल्या गांवीं । तीर्थी घडलीं जरी आघवीं । 
तरी मुक्ति न पावे जीवीं । तुकडया म्हणे ॥१०१॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
यात्रा-मेळयांचा शुध्द संकेत । चोविसावा अध्याय संपूर्ण ॥१०२॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥