ग्रामगीता
देवें निर्माण केली क्षिती । प्रजा वाढवी प्रजापति ।
मानवसमाज राहाया सुस्थितीं । धर्म सकळां निवेदिला ॥१॥
’धर्म ’ बोलावया शध्द एक । परि त्याचा विस्तार अलौकिक ।
लौकिक आणि पारमार्थिक । मिळोनिया ॥२॥
अनेक प्राणी जेथे राहती । त्या सर्वांची राहावी सुस्थिती ।
समान समाधानाची गति । त्यास धर्म म्हणावें ॥३॥
आत्मरूपाची धारणा । सर्वांठायी समभावना ।
विश्वकुटुंब ऐशा आचरणा । धर्म म्हणावे निश्चयें ॥४॥
आपुली साधावी उन्नति । सौख्य द्यावे इतरांप्रति ।
या उद्देशे जी जी संस्कृति । धर्म म्हणावे तिजलागी ॥५॥
परस्परांशी वागणूक । ज्यांत न्याय – नीति सम्यक ।
प्रत्येकांचे कर्तव्य चोख । धर्म ऐसें त्या नांव ॥६॥
कोणाचा द्रोह न करून । करावा ऐहिक उत्कर्ष पूर्ण ।
साधावे आत्मसमाधान । हाचि बाणा धर्माचा ॥७॥
सर्वांस असावा संतोष । दुःख न व्हावें प्राणीमात्रास ।
याचा सक्रिय कराया अभ्यास । धर्मनीति बोलली ॥८॥
भिन्न लोकांची भिन्न कामें । मिळोनी पुरती जीवनकर्मे ।
असोत भिन्न गुण भिन्न नामें । परि सुख सर्वांचे सहकारीं ॥९॥
नको सत्तेचा बडगा त्यासि । नको दंडभय सत्कर्मासि ।
आपापले कर्म सर्वासि । धर्म शिकवी सर्वांगें ॥१०॥
धार्मिक त्यासचि म्हणावें । सत्तेवाचूनि वागे बरवें ।
स्वयें आपुल्याचि स्वभावें । समरस होई सर्वांशी ॥११॥
नको वैद्य अथवा डॉक्टर । आपणचि राहे आरोग्यतत्पर ।
नको वकील न्यायाधीश दंडधर । न्यायव्यवहार सहजचि ॥१२॥
नको धाक तरवारीचा । चुकीस्तव तळमळे आत्मा साचा ।
साक्ष देतो अंकुश देवाचा । अंतरामाजीं ॥१३॥
ऐसें ज्याचे हृदयीं स्फुरण । तोचि खरा धर्मवान ।
बाह्य अवडंबर धर्मचिहन । तें तें गौण , धर्म नव्हे ॥१४॥
शुध्द सात्विकता प्रकट करावी । लौकिकीं तीच जागवावी ।
आपुल्या चारित्र्याने सांभाळावी । सुव्यवस्था जगाची ॥१५॥
व्यक्तिधर्म , कुटुंबधर्म । समाजधर्म , गांवधर्म ।
बळकट होई राष्ट्र्धर्म । प्रगतिपथाचा ॥१६॥
व्यक्ति व्हावी कुटुंबपूरक । कुटुंब व्हावें समाजपोषक ।
तैसेंचि ग्राम व्हावें राष्ट्रसहाय़क । राष्ट्र विश्वाशांतिदायी ॥१७॥
याकरितां जी जी रचना । तियेसि धर्म म्हणती जाणा ।
देशद्रोह अधार्मिकपणा । एकाच अर्थी ॥१८॥
मुख्य धर्माचें लक्षण । त्याग अहिंसा सत्य पूर्ण ।
अपरिग्रह ब्रम्हचर्य जाण । तारतम्ययुक्त ॥१९॥
निर्भयता शरीरश्रम । परस्परांशी अभेद प्रेम ।
पूरक व्हावया विद्या सत्कर्म । सकलांसाठी ॥२०॥
सर्व विश्वची व्हावें सुखी । ही धर्माची दृष्टी नेटकी ।
ती आणावी सर्व गांवलोकीं । तरीच लाभ ॥२१॥
विश्वाचा घटक देश । गांव हाचि देशाचा अंश ।
गांवाचा मूळपाया माणूस । त्यासि करावें धार्मिक ॥२२॥
व्यक्तिधर्म सर्वां कळावा । कुटुंबधर्म आचरणी यावा ।
ग्रामधर्म अंगी बाणावा । राष्ट्रधर्माच्या धारणेने ॥२३॥
व्यक्ति – व्यक्ति व्हावी धार्मिक । धर्म नव्हे एकांगी लटक ।
भौतिक आणि पारमार्थिक । विकास व्हावा सर्वांचा ॥२४॥
प्रत्येकासि शरीर , मन । वाणी , इंद्रियें , बुध्दि , प्राण ।
या सर्वांचें विकास साधन । तोचि धर्म ॥२५॥
ऐशा सदधर्माचें ज्ञान । आधी प्राप्त व्हावें सर्वांगीण ।
मगचि त्यासारिखे जीवन । जगतां येई या लोकीं ॥२६॥
यासाठीच आश्रमव्यवस्था । पूर्वजांची उत्तम प्रथा ।
आरंभी मिळे धर्माची संथा । पुढे जीवन धर्ममय ॥२७॥
मानव पशूयोनींतूनि आला । नराचा नारायण होणें त्याला ।
यासाठी संस्कार देऊनि सावरिला । क्रमाक्रमाने ॥२८॥
मानवाकडोनि जें जें घडतें । तें बरें – वाईट दोन्ही होतें ।
त्यांतूनि निवडावे लागतें । पापपुण्य ॥२९॥
त्यांचे सुधारोनि आचरण । द्यावें लागतें नवें वळण ।
जेणें आपलें करील उध्दरण । इतरां सहायक होऊनि ॥३०॥
यासाठी धर्मे नेमिले संस्कार । आश्रम गोविले जीवनीं चार ।
आयुष्य कल्पूनि वर्षे शंभर । विभागलें ते उन्नतिस्तव ॥३१॥
मानवजीवनीं करितां पर्दापण । ब्रम्हचर्याश्रम लागे जाण ।
जो सर्व आश्रमांचें मूलस्थान । पाया म्हणावा जीवनाचा ॥३२॥
ज्याचा ब्रह्मचर्याश्रम साधला । त्याचा पुढील काळ सुखी गेला ।
मग प्रत्येक आश्रम त्याला । उत्कर्षदायी होतसे ॥३३॥
या ब्रह्मचर्याश्रमचें साधन । चाले गर्भधारणेपासून ।
पोटांतचि असतां जीव पडोन । जतन करावा संस्कारें ॥३४॥
संस्कार दुष्परिणामकारी । न पडावे आंतील गर्भावरि ।
म्हणोनी मातापित्यांनी सदाचारी । राहावे सदभावें ॥३५॥
न करावें अश्लील भाषण । न बघावें दृष्य हीन ।
न राहावे व्यसनाधीन । दुर्गुणी अन्न न खावें ॥३६॥
आहारविहार सात्विक पूर्ण । उत्तमगुणी चिंतन वाचन ।
न ऐकावे शॄंगारगाय़न । गर्भवतीस घेवोनि ॥३७॥
येथोनि पाहिजे जतन केलें । पुढे मूल जन्मासि आलें ।
तेव्हापासूनि संस्कार घडले । पाहिजेत सत्कर्माचे ॥३८॥
घरीं पुत्ररत्न जन्मलें । कांही दिवस त्याचें कौतुक केलें ।
परि जन पुढे पाहूं लागले । कर्तव्य तयाचें ॥३९॥
मुलगा काय खेळणें खेळतो । काय बघतो कोठे जातो ।
कैसा बोलतो चालतो गातो । पाहती जन ॥४०॥
मुलास जैसें कळों लागलें । तैसें त्यास सांभाळणें अवश्य झालें ।
त्याचे समोर न पाहिजे बोलिले । दुर्विषय कोणीं ॥४१॥
त्यावरि उत्तम संस्कार घडावे । म्हणोनीच व्रतबंधादि बरवे ।
शिकवावे पाठ करोनि घ्यावे । उत्तम विषय ॥४२॥
मग जो तो त्यासि म्हणे । काय रे ! केलें की नाही वाचणे ? ।
कैसा फिरतोसि रानेंवनें । वेडया – पिशांसारिखा ? ॥४३॥
तुज नाही का संस्कार । घडावया सदगुणी व्यवहार ? ।
काय करिती पालक चतुर ? लक्ष नाही तुझ्यावरि ॥४४॥
सांगितली नाही का स्नानसंध्या । स्मरावयासि जगदवंद्या ? ।
नमस्कारिलें नाहीस का प्रतिपाद्यां । सकाळींसायंकाळी जाऊनि ? ॥४५॥
मग का फिरतोसि रानावना ? कैसा होशील शहाणा ? ।
उपदेश देती ऐसा , सदगुणा । वाढवाया जन थोर ॥४६॥
घडावया उत्तम संस्कार मायबाप शिकविती सदाचार ।
व्हावया उत्तम गुणी चतुर । मोठेपणी ॥४७॥
आठवर्षांचें आंतचि त्याला । पाहिजे उपनयन संस्कार केला ।
तोहि नको रूढीचा बांधला । नाटक नुसतें बटूचें ॥४८॥
उपनयन म्हणजे विद्येचें व्रत । ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात ।
गुरुजवळी करणें समर्पित । जीवन त्याचें घडवावय़ा ॥४९॥
तोहि गुरु असावा ब्रह्मचारी । अथवा वानप्रस्थ तरी ।
त्याने घ्यावी काळजी पुरी । मुलांचिया ब्रह्मचर्याची ॥५०॥
त्याचें राहणें खाणें पिणें । खेळ खेळणें ग्रंथ वाचणे ।
लक्ष ठेवावें आचार्याने । मनोरंजनादिकावरि ॥५१॥
जरा चुकलिया चुकतचि जातें । मग सावरेना कांही केल्य़ा तें ।
इंद्रियां वळण जैसे लागतें । तैसेंचि होतें जन्मभरि ॥५२॥
म्हणूनि गुरुआश्रमीं नियम । प्रत्येक आचरणी संयम ।
छात्रालयी हीच उत्तम । दॄष्टी असावी सर्वत्र ॥५३॥
मुलगा अभ्यासा लागला । कीं सात्विक खाणें असावें त्याला ।
खारट आंबट तिखट मसाला । देऊं नये भोजनीं ॥५४॥
चमचमीत चुरचुरीत । अति मधुर तळीव पदार्थ ।
अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित । भोजनासि न द्यावें ॥५५॥
साधें ताजे अन्न द्यावें । वेळेवरि झोपवावें जागवावें ।
झोपतां जागतां जवळी नसावें । स्पर्शणारें कोणी ॥५६॥
कराया लावावें प्रातर्ध्यान । सांयकाळीं प्रार्थना पूर्ण ।
झोपतां जागतां चिंतन । आदर्श महापुरूषांचें ॥५७॥
नित्य नियमें उषःपान । सुर्यनमस्कार आसन ।
पोहणें आणि निंबसेवन । आरोग्यदायी जें सोपें ॥५८॥
शीतजलें करवावें स्नान । सकाळीं रानींवनीं गमन ।
करवावें नेहमी पठणपाठण । चारित्र्यवंतांचें ॥५९॥
शौकिन राहणी वर्जावी । सुगंधी अत्तरें फुलेंहि त्यजावीं ।
कोणी बाल न ठेवी तेल न लावी । ऐसें करावें ॥६०॥
बघूं न द्यावें दर्पणीं तोंड । वाढूं न द्यावें पोषाखाचें बंड ।
पान बिडी चहाचे थोतांड । सर्वतोपरी वर्जावें ॥६१॥
कोणीहि न घ्यावे मादक द्रव्य । तोंडी नसावें नाटकीं काव्य ।
समजावूनि द्यावें सेव्यासेव्य । उपवासहि करवावा ॥६२॥
कराया सांगावें आपुलें काम । दुसर्यासाठीहि परिश्रम ।
शिकवावें बंधुभगिनी – प्रेम । सेवाधर्म शिकवावा ॥६३॥
बसवूं नये मुलींसह शिक्षणीं । तेथे संमिश्र नाटकें कोठोनि ? ।
स्त्रैणांसंगती शृंगारगायनी । क्षणभरीहि बसों न द्यावें ॥६४॥
मुलाचें वय जसजसें वाढे । तोडावे स्त्रियाचें संबंध गाढे ।
नेहमी चरित्रवंतांचे धडे । द्यावेत तयासि ॥६५॥
विवाहादि कार्ये न दाखवावीं । शॄंगारकाव्यें न शिकवावीं ।
व्यायामदंगलीं खेळवावी । मुले निर्भयत्वें ॥६६॥
अश्लीलता कोठेहि न दिसावी । दिनचर्या आदर्श असावी ।
सकाळीं सायंकाळी द्यावीं । बौध्दिकें ब्रह्मचर्याची ॥६७॥
सांगावे ब्रह्मचर्याचें महिमान । ब्रह्मचर्याचा उद्देश कोण ।
काय सेविल्या होतें रक्षण । ब्रह्मचर्याचें ॥६८॥
ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्माचरण । ब्रह्मतेजाचें साधन ।
विद्याप्राप्तीचें वर्तन । वीर्यरक्षण ब्रह्मचर्य ॥६९॥
ब्रह्मचर्यासमान कोण । जगीं महत्त्वाचें साधन ? ।
जो ब्रह्मचर्य करी पालन । तो देवासमान होतसे ॥७०॥
रिध्दिसिध्दी त्याच्या दासी । देव धांवती त्याच्या हांकेसि ।
सूर्यासमान कांति तयासि । लाभतसे निरोगी ॥७१॥
भीष्मचा व्रतनिश्चय । कार्तिकेयाचें चातुर्य ।
शुकाचा ज्ञानयोग निर्भय । लाभे ब्रह्मचर्याने ॥७२॥
अवधूताची दृष्टी विशाल । हनुमंताचे महाबल ।
ब्रह्मचारी पावे महाचपल । वज्रदेह ॥७३॥
सर्व बळांत वीर्यबळ । वीर्य नाही तो दरिद्री दुर्बळ ।
रोगांचिया मुखींचा कवळ । नेहमी होतो ॥७४॥
ज्याने वीर्य सांभाळलें । यश तयासि माळ घाले ।
वीर्य क्षीण होतां मॄत्युने केले । शिकार त्यासि ॥७५॥
वीर्यअंगी आहे ओज । वीर्याअंगी नवें तेज ।
वीर्याअंगी आरोग्यबीज । बुध्दिसामर्थ्यहि ॥७६॥
ऐका वीर्य कैसें बनतें । चाळीस शेर अन्न पचतें ।
त्याचें एक शेर रक्त होतें । वीर्य त्याचें दोन तोळे ॥७७॥
पुरुष रोज एक शेर जेवला । तरी एक महिना तीस शेरांला ।
त्यांत दीड तोळा उपजला । वीर्यरसबिंदु ॥७८॥
तो नष्ट होय एका क्षणीं । केवढी थोर केली हानि !
द्रव्य मिळविलें कष्ट करोनि । केली धुळधाणी हौसेने ॥७९॥
ब्रह्मचारी पतन पावला । महिन्याची कमाई खोवतो क्षणाला ।
केवढा हा तोटा झाला । आयुष्याचा ? ॥८०॥
सातां दिशा अन्नरस होई । तो साता दिसां रक्तपण घेई ।
रक्तामधूनि मांस होई । थोडें थोडें ॥८१॥
त्यांतूनि मेद आणि हाडें ।साता दिसां मज्जा वाढे ।
मग वीर्य निपजे थोडथोडें । सप्ताहानंतरी ॥८२॥
बेचाळीस दिवसानंतर । वीर्य शुक्रधातु शक्तिकर ।
त्यासि किती प्रयास दिवसरात्र । अन्नखर्च कितीतरी ॥८३॥
तें अमोल वीर्य देहातील रत्न । ज्यावरि देहाचें जीवन ।
ते आरोग्यदायी अमृतकण । तेज वाढे रोमरोमीं ॥८४॥
म्हणून यासि सांभाळावे । ओज सामर्थ्य वाढवावें ।
सूर्यचंद्रापरी शोभावें । ब्रह्मचर्याने ॥८५॥
ऐसें शिकवावें बाळां तरुणां । बौध्दिक द्यावें सर्व जना ।
बुध्दि बनतां वेळ लागेना । जीवन आदर्श व्हावया ॥८६॥
गुरुजनीं ऐसे द्यावेत धडे । आपुला आदर्श ठेवोनि पुढे ।
विद्यार्थी तयार होतां चहूकडे । राष्ट्र होई तेजस्वी ॥८७॥
चोवीस वर्षे ऐसीं गेलीं । त्याची जीवन – सफलता झाली ।
गृहस्थपणें गुढी उभारली । सत्कार्याची त्यापुढे ॥८८॥
ब्रह्मचारी घे गृहस्थपण । शंभर वर्षे जगे तयाचें संतान ।
रोगराई दुबळेपण । तया न बाधे सर्वथा ॥८९॥
यानेच गांव होईल आदर्श । बलवान बनेल सर्व देश ।
मानवासमाजाचा उत्कर्ष । होईल सर्वतोपरी ॥९०॥
हें साधाया पहिला उपक्रम । पाहिजे ब्रह्मचर्याश्रम ।
जेणें प्रजा होई कार्यक्षम । स्वतःसाठी तैसी राष्ट्रासाठी ॥९१॥
राष्ट्रासाठी जीवन बनविणें । त्यासि चारित्र्ययोग संपादणे ।
आरोग्यबल शरीरीं राखणें । ब्रह्मचर्यायोगें ॥९२॥
परस्परांत प्रेम राखणें । समाजाकरितां तत्पर होणें ।
त्यासाठीहि आधी जीवन बनविणे । हाचि पाया आवश्यक ॥९३॥
जे हे नियम मुलांसाठी । तीच मुलींकरितां रहाटी ।
वयाचीच मुख्य़ विषमता पोटी । राही तयांच्या ॥९४॥
भारतीं झाल्या ब्रह्मचारिणी । विद्यासंपन्न तेजस्विनी ।
त्यांचे आश्रम स्वतंत्र स्थानी । आदर्शरूप ॥९५॥
जोंवरि हे होते आश्रम । तोंवरि राष्ट्र बलवान उत्तम ।
वाढूनि व्यसनें विषयप्रेम । पतन झाले समाजाचें ॥९६॥
धर्माचा पाया विद्यार्थीधर्म । तयासाठी ब्रह्मचर्याश्रम ।
त्यानेच जीवन होईल उत्तम । व्यक्तीचें आणि राष्ट्राचें ॥९७॥
म्हणोनि साधा या व्रतनियमाला । असेचि आश्रम काढा गांवाला ।
शिकवा आपुल्या भावी पिढीला । लक्ष देऊनि मित्रहो ! ॥९८॥
मी हें जाणतो मागील वर्म । त्याकाळीं सुलभ श्रध्दा संयम ।
तैसे आज करितां आश्रम । कठीण जाईल गांवासि ॥९९॥
उपभोग सकलांचे वाढले । राहणीमाजीं अंतर पडलें ।
सभोवताली तार चढले । विषयसतारीचे ॥१००॥
मुलींचें विद्यालय अलग नाही । विधवाहि शृंगाराविण न राही ।
धाक कोणाचा कोणाहि । उरला दिसेना ॥१०१॥
नटवेष घुसले जीवनीं । भुलविलें चित्रपट – कादंबर्यांनी ।
अध्यापक तोचि विलासी व्यसनी । शॄंगारकाव्य शिकवितो ॥१०२॥
रस्तोरस्तीं खाद्य पेयें । वैभवशाली विद्यालयें ।
चैन हेंच जणू जीवन ध्येय । कोणीं सोय लावावी कोणा ? ॥१०३॥
ऐसे वातावरण जरी असलें । तरी ह्रदयवंताने पाहिजे सुधारलें ।
आपुलें गांव बिघडू दिलें । ऐसे न करावें सुज्ञाने ॥१०४॥
नियमित मुलांचें वर्तन । नियमित ठेवावें खानपान ।
नियमित ब्रह्मचर्याचें पालन । घडलेंच पाहिजे ॥१०५॥
सर्व भुक्तिमुक्तिसि कारण । असे ब्रह्मचर्य धर्मज्ञान ।
म्हणोनि विनवितों श्रोतेजन । इकडे दुर्लक्ष न व्हावें ॥१०६॥
ऐसे साधाल जेवढयापरीं । संतान बळकट होई संसारीं ।
गांवाचे स्वास्थ वाढेल निर्धारीं । तुकडया म्हणे ॥१०७॥
इति श्री ग्रामगीता ग्रंथ । गुरू – शास्त्र – स्वानुभव – समंत ।
धर्म ब्रह्मचर्य निवेदिले येथ । दुसरा अध्याय संपूर्ण ॥१०८॥
॥ सद्गुरूनाथ महाराज की जय ॥