वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय अठ्ठाविसावा

ग्रामगीता

अध्याय अठ्ठाविसावा : प्रार्थना व विश्वधर्म

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

सर्व धर्माचा समन्वय । विश्वशान्तीचा उपाय ।
लोकसुधारणेचें विद्यालय । सामुदायिक प्रार्थना ॥१॥

ऐसें झालें प्रतिपादन । परि आमुचां ऐका प्रश्न । 
सर्व धर्मांची प्रार्थनापध्दति भिन्न । ते होतील एक कैसे ? ॥२॥

कैसा रुचेल एक पाठ ? प्रत्येकाची वेगळीच वाट । 
कैसे बसतील एकवट । भक्त भिन्न देवांचे ? ॥३॥

दुसर्‍या धर्मीयांमाजीं बसतां । झाली वाटे धर्मभ्रष्टता । 
यासाठी उपाय सांगा कोणता । सामुदायिकतेसि ? ॥४॥

श्रोतियांचा ऐकोनि प्रश्न । संक्षेपें करितों उपाय कथन । 
लोकां पटवावें तत्त्वज्ञान । सदधर्माचें नानापरी ॥५॥

जगीं दिसती विभिन्न धर्म । परि सर्वांचें एकचि वर्म । 
विश्वधारणेचा मार्ग उत्तम । सदधर्म तोचि ॥६॥

व्हावी विश्वाची उत्तम धारणा । शांति लाभावी सर्वजना । 
या एकाच उद्देशाने प्रयत्न नाना । केले धर्मप्रवर्तकांनी ॥७॥

’ सर्व विश्व आर्य करीन ’ । ’ तिन्ही लोक आनंदें भरीन ’ । 
हें संतऋषींचें विशाल बंधुपण । नव्हतें स्वार्थासाठी ॥८॥

लोक प्रतिमापूजक नसावे । त्यांनी एका ईश्वरासि प्रार्थावें । 
हा महंमदाचा उपदेश नव्हे । एकाच देशासाठी ॥९॥

येशू ख्रिस्ताने प्रेमपाठ दिला । प्राणहि पणास लावला । 
तेथे अन्य मानव नाही वगळला । कळपांतूनि देवाच्या ॥१०॥

बुध्द आणि महावीर । श्रीकृष्ण आणि झरतुष्ट्र । 
यांनाहि सर्वांचीच फिकीर । विश्व सुखी होवो म्हणोनि ॥११॥

त्या त्या देशधर्माच्या संतीं । हीच व्यापक धरोनि वृत्ति । 
विशाल मानवसमाजाप्रति । सेवा दिली आपुली ॥१२॥

अन्य देशांचे आणि भाषांचे । झालेले आणि होणारे साचे । 
थोर पुरुष गौरविले त्यांनी वाचें । आपुल्या ग्रंथीं ॥१३॥

धर्मभ्रष्टतेची कल्पना । ही मान्यचि नव्हती धर्माचार्यांना । 
सर्व विश्वाचीच त्यांना । काळजी होती समान ॥१४॥

सर्व विश्वाचा एकचि देव । त्याचीं मुलें सर्वचि जीव । 
जरी वेगवेगळें दिलें नांव । तरी भाव हाचि त्यांचा ॥१५॥

हिंदूंचा देव हिंदुत्व धरी । मुसलमानांचा मुस्लिम करी । 
ख्रिश्चनाचा ख्रिस्त्यांनाचि तारी । ऐसें म्हणणें आकुंचित ॥१६॥

सर्वांत उच्च ऐसी भावना । जगच्चालकाची कल्पना । 
तेथे कैचा उरे भिन्नपणा ? आप-पर कोण ? ॥१७॥

भिन्न मार्ग-मार्गी असती । परि देव नाही भिन्नस्थिती । 
मूळ धर्माचीहि नाही गति । भिन्नत्वाची ॥१८॥

सर्वचि म्हणती जगत सारें । केलें आमच्या ईश्वरें । 
धर्माचा आदेश श्रेष्ठाद्वारें । दिला आम्हां ॥१९॥

ऐसे सर्वाधिपति ईश्वर । काय जगीं असती शंभर ? 
एकचि जगच्चालक परमेश्वर । तोचि सर्वांचा ॥२०॥

अल्ला, गॉड, अर्हत, देव । अहूरमज्द, निर्वाण, शिव । 
परमेश्वरासि ठेवा नांव । एक गुरुदेव तोचि माझा ॥२१॥

जगासि सुखी उन्नत करावें । हेंचि त्या जगन्नियंत्या रुचावें । 
मग धर्माचें रूप याहूनि असावें । भिन्न कैसें ? ॥२२॥

आपणाऐसें सर्वांचें सुखदु:ख । जाणोनि वागावें उपकारक । 
सर्व धर्मी हाचि आदेश एक । दुमदुमताहे ॥२३॥

यांचा करूं जातां विचार । सर्व पंथधर्म भक्तिप्रकार । 
एकतत्त्वी कळती साचार । भेद भक्तांनी कां घ्यावा ? ॥२४॥

ज्याची बुध्दि अल्पबल । ते घरांत करिती घरकुल । 
परि हें विश्व एकचि दल । मानवांचें ॥२५॥

एकचि भूमि सर्वांकरितां । एकचि हवापाणी, सुख-व्यथा । 
पंचभूतांचीच सर्वथा । शरीरें सर्वांची ॥२६॥

एकचि जीवनाचें मूळ । एकचि शेवटचें स्थळ । 
एकचि सेवाधर्म निर्मळ । नाना रूपीं ॥२७॥

सर्वांच्या नेत्रीं एकचि ज्योति । सर्वांच्या अंगीं एकचि शक्ति । 
सर्वांठायीं एकाचीच व्याप्ति । तेथे भिन्न कोण आले ? ॥२८॥

मुस्लिम ख्रिस्ती जमात कांही । आकाशांतून आली नाही । 
त्यांचे पूर्वीहि होती मही । मानवांनी नटलेली ॥२९॥

एकाचें जग देवाने केलें । आणि एकासि भुतांनी जीवन दिलें । 
ऐसें मानतां जग वेगळालें । दिसेना पंथधर्मांचें ॥३०॥

धर्मात नाही हिंदु मुसलमान । धर्मांत नाही पारशी-खिश्चन । 
धर्मांत नाही शिख-जैन । पाहतां मुळीं ॥३१॥

लोक धर्मांची व्याख्याच विसरले । धर्में हिंदु मुसलमान झाले । 
मूळचें मानवपणहि आपुले । हरविलें त्यांनी ॥३२॥

देशभाषेचे बुरखे घातले । हवापाण्याने रिवाज बदलले । 
त्या बहिरंगासीच धर्म म्हणों लागले । अल्पज्ञानी ॥३३॥

देशाचारी राहणी झाली । हवापाण्यापरी विशेषता आली । 
उत्पादनापरी आरंभिली । भोजन-व्यवस्था ॥३४॥

म्हणोनि काय मानवत्वहि बदललें ? सत्यसिध्दान्ती अंतर पडलें ? 
पाप-दु:खहि उचित वाटलें । उलटें कोणा ? ॥३५॥

हें म्हणणें मला आवडेना । मी एकचि मानतों सर्वांना । 
आधी मानवता सर्वांचा बाणा । पंथभेदांना स्थान मग ॥३६॥

भिन्न राहणी भिन्न उपासना । म्हणोनि का पारखा मानवपणा ? 
जरी भिन्न पध्दतींनी केली प्रार्थना । तरी काय झालें ? ॥३७॥

एकाचि सागराची वाफ । होऊनि आली पाणीरूप । 
थेंब कामें करोनि खूप । जातील शेवटीं एका स्थळीं ॥३८॥

तैसेचि आहे मानवांचें । मानव कोणत्याहि धर्माचें । 
परंतु समाजरचनेसाठी त्यांचे । महत्त्व सारिखें ॥३९॥

आदि-अंतीं सर्वचि एक । मध्ये समाजसेवेचें कौतुक । 
त्याचेंहि मूल्य समान देख । मानवधर्म-दृष्टीने ॥४०॥

धर्म सांगे पुजारी व्हावें । धर्मचि सांगे भंगी व्हावें । 
धर्म म्हणतो गावें-नाचावें । सर्वांसाठी ॥४१॥

ऐसें वेगवेगळें कर्म केलें । तरी परकेपण नाही ठेविलें । 
सर्व मिळोनि एक झाले । तोचि धर्म ॥४२॥

धर्मामाजीं सर्व येतें । परंतु तारतम्य पाहिजे तेथे । 
मानवाशीं होय विद्रोह ते । न करावें धर्म म्हणे ॥४३॥

धर्माची आखणी मानवता । मानवतेसाठी करावी व्यवस्था । 
कोठेहि होतां अव्यवस्था । धावोनि जावें ॥४४॥

ही व्यवस्था जेव्हा अपुरी पडली । तेव्हाचि गट वृत्ति निर्माण झाली । 
व्यक्तिमत्वाचीं प्रलोभनें वाढलीं । भिन्न मार्गांनी ॥४५॥

विश्वाचे ऐसे झाले तुकडे । कोणीहि गेला कोणीकडे । 
नांवरूप धरोनि वेडेंवाकडें । फुटला धर्म ॥४६॥

देशकालादिकासि बघून । केलीं साधनें निर्माण । 
त्या फांद्यांनाचि धर्मवृक्ष मानून । आखणी झाली गटांची ॥४७॥

म्हणोनि पडलें विभिन्न नाम । हिंदु-मुसलमान-ख्रिश्चन धर्म । 
जैन-शिख-महानुभाव-ब्राह्म । नामें धर्मामाजीं ॥४८॥

अजोनि खुंटली नाही संख्या । जेवढी पंथसंप्रदाय-व्याख्या । 
सर्वांसीच धर्मनामाअख्या । पुढे लागे ॥४९॥

घराघराचा अलग धर्म । धर्म एकेक व्यवहारकर्म । 
’आपलें जगणें’ हेंचि सत्याचें वर्म । ऐसा भ्रम जाहला ॥५०॥

ऐसी जंव वाढली प्रथा । तंव झाली सर्वांसीच व्यथा । 
मग म्हणती विरोधी धर्मपंथां । केलें पाहिजे शासन ॥५१॥

हें आवराया निर्मिली सत्ता । सामदामदंडभेद-प्रथा । 
हा राजधर्महि लावण्यासि व्यवस्था । मानवांची ॥५२॥

जे धर्ममार्गी संघटित झाले । त्यांनी न्यायसत्र आरंभिलें । 
आपापल्या परींनी केलें । स्थापन राज्य ॥५३॥

राज्य केलें धर्मासाठी । परि उपभोगचि लागला पाठीं । 
लागली अहंतेची आटाआटी । आसक्तीमुळे ॥५४॥

मग धर्मचि वगळून गेला । राजकारण धर्म झाला । 
त्यासाठी गलबला वाढला । सर्व देशीं ॥५५॥

विसरोनि सेवाधर्माचें अधिष्ठान । राज्य करावें हेंचि मोठेपण । 
राबवावें मानवां पूर्ण । ऐसें झालें ॥५६॥

मग मानवाच्या सुखासाठी । मानव द्यावेत बळी संकटी । 
पडली ऐसीच राहटी । लोकांमाजीं ॥५७॥

गेलें प्रेमाचें समजावणें । लागलें तलवारीस धार देणें । 
जो करील हिंसा अधिकतेने । तो विजयी ठरला धर्मवान ॥५८॥

सत्ताबळ संख्याबळ । त्यावरि धर्म ठरला प्रबळ । 
तेथे सत्याचें फुटलें कपाळ । शक्तियोगें ठरतां धर्म ॥५९॥

मग धर्मचि झालें हतियार । धर्माकरितां युध्द संहार । 
धर्मयुध्दाचें बंड थोर । वाढलें लोकीं ॥६०॥

सत्य त्याग सेवेसि कोणी पुसेना । आपुलींच मतें मिरविती नाना । 
ऐसा हा झाला धिंगाणा । पृथ्वीवरि ॥६१॥

बिघडोनि गेली धर्माची रीति । ती सुधारावया अपुरी शक्ति । 
म्हणोनि देवादिकांनाहि हातीं । शस्त्रें धरावीं लागली ॥६२॥

तें धर्मयुध्द न्यायाचें होतें । उन्मत्तता मुळीच नसे जेथे । 
’बळी तो कान पिळी’ हें तेथे । लावणें हा अधर्म ॥६३॥

न्यायदानांत द्वेषपाप नसतें । परि जेव्हा आसक्ति देशाची घेरते । 
तेव्हा माणसाची बुध्दि जाते । विनाशाप्रति ॥६४॥

मग युध्द राष्ट्राची अरेरावी । घमेंड कुटिलतेच्या उठाठेवी । 
अधर्म तो जरि असेल युध्दचवी । कोणाचीहि अन्यायी ॥६५॥

माणूस माणसासि मारी । अपराध नसतां दमन करी । 
तें युध्दहि परि दुराचारी । बोलिलें शास्त्रीं धर्मांचेंहि ॥६६॥

हा न्याय जेव्हा सकळांना कळे । तेव्हा थांबे युध्दाचें वारें सगळें । 
मानवसमाज माणुसकीशीं मिळे । न्यायदेवतेपुढे ॥६७॥

जें युध्दांचें तेंचि लहान झगडयांचें । तैसेंचि कुटुंबांमधील कलहांचें । 
हें सारें प्रदर्शन अज्ञानाचें । वेगळाल्यापरीं ॥६८॥

धर्म, पंथ आणि पक्ष, देश । यांच्या नशेचा अभिनिवेश । 
धर्मवेडें करोनि मानवास । न्यायमार्गें जाऊं नेदी ॥६९॥

जेव्हा मुसलमान राज्य करी । तेव्हा देवळें पाडोनि मशिदी उभारी । 
आपण शहाणे म्हणोनि वाजवी भेरी । लौकिकामाजीं ॥७०॥

त्याची सत्ता विलया गेली । तेव्हा हिंदूने मसजिद पाडली । 
आपलीशी करोनि सोडली । दुसर्‍या पंथीं ॥७१॥

जेव्हा ख्रिश्चनाचें बंड आलें । तेव्हा त्याने चर्च वाढवले । 
आपुलें जाळें पसरोनि दिलें । मनमाने त्यांनी ॥७२॥

रागद्वेषांचें समाधान । अभिलाषापूर्तीचें साधन । 
म्हणोनि केलें युध्द वा दमन । सूडबुध्दीने ॥७३॥

हा तो नव्हे धर्मविचार । हा आहे शक्तीचा व्यवहार । 
धर्मात मान्य नाहीच संहार । निरपराध मानवांचा ॥७४॥

धर्मांत आहे सुव्यवस्था । शांति, बुध्दि, न्यायप्रियता । 
अहिंसेने समजावितां । होतो धर्म श्रेष्ठ ऐसा ॥७५॥

मानव मानवासाठी कष्टतो । दुसर्‍याच्या सुखीं सुखावे, श्रेष्ठ तो । 
परि मानवास मानव संहारतो । अधर्म याहूनि कोणता ? ॥७६॥

हेंचि जयांना अंतरीं कळलें । तेचि महामानव समजले गेले । 
मग कोणतेहि पंथ धर्म जरी असले । सर्व चांगले आम्हांलागी ॥७७॥

सर्वचि धर्मपंथांचे देव । धर्मप्रवर्तक महामानव । 
यांचा ऐसाचि असे भाव । व्हावे मानव सर्व सुखी ॥७८॥

जगीं नांदावी सुखशांति । सर्वांनी आचरावी बंधुप्रीति । 
यासाठीच झटले असती । महापुरुष अभेदत्वें ॥७९॥

धरोनि हाचि विशाल हेत । कालानुसार काढिले पंथ । 
केला उपदेश लिहिले ग्रंथ । परोपरीं त्यांनी ॥८०॥

याचसाठी आजवरि झालीं । कुराणें पुराणें धर्ममतेंहि भलीं । 
परि अहूनिहि नाही आकळली । खोली याची सर्वांना ॥८१॥

पूर्वीपासूनि प्रयत्न झाले । न कळणारांनी विरोधिलें । 
अजूनहि प्रयत्न चालले । याचि मार्गाचे ॥८२॥

आम्ही आहोंत प्रयत्नवादी । देवादिकांचे विशाल संवादी । 
जगासि तैसी लाभो सदबुध्दि । म्हणोनि प्रार्थना आरंभिली ॥८३॥

यांत नवीन नाही गोविलें । पूर्वीच्या धर्माचें हृदगत भलें । 
तेंचि एकत्र करोनि ठेविलें । वेगळया स्वरूपें ॥८४॥

सर्वचि थोरांचे थोर विचार । सर्वाच्या पध्दतींचा सार । 
करोनि ठेविला गुच्छाकार । समाजापुढे ॥८५॥

ज्यांत परस्परांचें समाधान । जेणें सकलांचें सुंदर जीवन । 
तेंचि साधावया अनुसंधान । प्रार्थना केली ॥८६॥

समन्वयकारी प्रार्थनापाठ । ही नव्हे पोलादी चौकट । 
येथे प्रत्येकासि वाव असे स्पष्ट । आपुलें गोवाया ॥८७॥

तात्त्विकता कुठूनहि घ्यावी । आपुलीच ’ एक टांग ’ नसावी । 
सर्वांच्या समाधानाची ठेवावी । सहनशील बुध्दि ॥८८॥

ऐसी प्रार्थनाच शान्ति-प्रभावी । शान्तीसाठी विशालता हवी । 
विशालतेसाठी सोय व्हावी । परस्परांची ॥८९॥

परस्परांच्या हृदयांसि स्पर्शता । जवळ येईल आत्मीयता । 
तेणेंचि विश्वासि प्रेमें जिंकतां । होईल प्राप्ति सुखशांतीची ॥९०॥

धर्म-पंथ-देशांचें भांडण । न मिटे ऐक्य-प्रेमाविण । 
तें प्रेम साधाया प्रार्थनेसमान । पातळी नाही उत्तम ॥९१॥

सर्वचि धर्मीं प्रार्थनातत्व । सात्विकतेंतचि टिकाऊ एकत्व । 
याचें जाणोनिया महत्त्व । आणावें सर्वां एके ठायीं ॥९२॥

परस्परांचा संबंध नव्हता । म्हणोनि पध्दतींत बदल होता । 
त्यांस आतां जवळ आणतां । पाप कैसें ? ॥९३॥

सर्व विश्वाची एकचि प्रार्थना । सर्व विश्वाचा एकचि बाणा । 
सर्व विश्वांतचि एकपणा । कां न यावा ? ॥९४॥

न येण्याचें एकचि कारण । आकुंचित आमुचें ज्ञान । 
म्हणोनि आपापल्या परीने मंडण । केलें असे धर्मांचेंहि ॥९५॥

देवापासूनि एक होती । तेचि विशाल मन करिती । 
अल्प ज्ञानियापाशी फजीती । मानवधर्माची ॥९६॥

ते समजती भ्रष्टाकार । इतर तुच्छ आपण थोर । 
त्यांना स्वत:चाहि धर्म-विचार । कळला नाही ॥९७॥

प्रार्थनीं सर्वांनी फड मांडावे । प्रार्थना संपतांचि वितंडावें । 
ते प्रार्थी नव्हेत पेंढारी म्हणावे । स्वार्थी ऐसे ॥९८॥

लोक स्वार्थांनी दुरावले । आपसांत लढूं लागले । 
ते उपासनेने जवळ आले । होईल ऐसें ॥९९॥

त्यासाठी त्यांना ज्ञान द्यावें । धर्मसमानत्व शिकवावें । 
न पटे तोंवरि प्रार्थनेसि लावावें । स्वधर्माच्याचि ॥१००॥

भिन्न धर्मांनी भिन्न प्रार्थना केली । परि प्रार्थनातत्त्वें प्रतिपादिलीं । 
तरी आदरभावना सर्वत्र वाढली । होईल ऐसें ॥१०१॥

याने तयार होईल भूमिका । प्रत्येक धर्म आपणासारिखा । 
तेणें विश्व शान्तिसुखा । पावेल एक होऊनि ॥१०२॥

म्हणोनि धरिली ही साधना । साधा सामुदायिक प्रार्थना । 
सामुदायिक होण्याचीच धारणा । आरंभिली सात्विक ॥१०३॥

ईश्वराची जी मनोकामना । एकापसोनि अनेकपणा । 
अनेकान्तरीं एकत्व भावना । उपभोगावी या द्वारें ॥१०४॥

सर्वांनी चहूकडोनि यत्न करावे । आपल्यापरीने जवळ यावें । 
सिध्दान्तांचें गोडवे गावे । म्हणजे वेळ न लागे ॥१०५॥

सिध्दान्तरूप तत्त्वज्ञान । लोकांमाजीं रुजविल्याविण । 
न होय पंथद्वेषादिकांचें उच्चाटन । नेहमीकरितां ॥१०६॥

सामुदायिक प्रार्थनारूपें । हें तत्त्व रुजविणें असे सोपें । 
म्हणोनि लागा खटाटोपें । कार्यासि या गांवोगांव ॥१०७॥

गांवोगांवीं धर्मसमभाव । मग आपैसेंचि सुखावे विश्व । 
पृथ्वीसि लाभेल स्वर्ग-गौरव । तुकडया म्हणे ॥१०८॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
धर्मसमन्वय कथिला येथ । अठ्ठाविसावा अध्याय संपूर्ण ॥१०९॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥