ग्रामगीता
अध्याय सातवा : आचार-प्राबल्य
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
एका सज्जनें प्रश्न केला । लोकरहाटी कळली आम्हांला ।
पुढारी नेतेच सुधारती गांवाला । सत्य हें सारें ॥१॥
परि भल्यांनीच गोंधळ घातला । पुढारी पुढिलांचा अरि झाला ।
तयांच्या नगार्यापुढे कसला । आवाज आमचा ताण मारी ? ॥२॥
न्यायदेवता सिंहासनी बसविली । तीच अन्याय करून गेली ।
मग कैची सुव्यवस्था आली ? सांगा सांगा ॥३॥
सत्संगतीसि पंडित बोलाविला । त्यानेच गांवी कलह केला ।
शहाणा म्हणावा तोच निघाला । महामुर्ख जैसा ॥४॥
प्रसन्नतेकरिता ठेवलें गायन । तेथे ऐकावें लागलें रुदन ।
आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून । अडे ओरडे ॥५॥
घोडें शिकवाया आणला स्वार । तोचि पडला मोडोनि कंबर ।
कैसे बसतील मग इतर । घोडयावरि ? ॥६॥
इमानदार म्हणोनि पाहिला धनी । त्यानेच केली बेइमानी ।
आता विश्वास ठेवावा कोणीं । कोणावरि ? ॥७॥
मुलें शिकविण्या ठेविला मास्तर । त्यानेच केला दुर्व्यवहार ।
शिक्षकासीच शिक्षणाची जरूर । ऐसे झालें ॥८॥
औषधि द्याया आणिला डॉक्टर । त्याने रोग्यासि दिलें जहर ।
आतां कोणी करावा उपचार ? सांगा सांगा ॥९॥
ऐसें झालें आमुच्या गांवी । सांगा काय व्यवस्था करावी ?
कोणांस हांक मारूनि घ्यावी । विश्वासाने ? ॥१०॥
जन मनांत येईल तें करिती । दारू पिती तमाशे नाचविती ।
पुढारीच पुढाकार घेती । ऐशा कामीं ॥११॥
गुंडास धरोनिया हातीं । करिती मनीं येईल त्याची फजीती ।
त्यावांचोनि पुढार्याची गति । म्हणती प्रगतिपथा येईना ॥१२॥
ऐसेंचि धरिलें त्यांनी मनीं । नाश केला गांवी फिरूनि ।
आता चोरचि झाले धनी । सज्जन मेले उपवासी ॥१३॥
गांव सगळेंचि बिघडलें । आपल्यापरीं स्वैर झालें ।
नाही कोणाचें वर्चस्व राहिलें । कोणावरि ॥१४॥
सांगा सांगा काय करावें ? तुम्ही म्हणतां गांव सुधारावें ।
कोण्या मार्गे आपण जावें । ऐशा स्थितीं ? ॥१५॥
आपण करावें कांही साधन । हसती टिंगल करोनि जन ।
म्हणती हा साधू आला कुठोन । पोट भरावया ॥१६॥
खराटा घेवोनि झाडझूड करावी । तेथेचि मलविसर्जना बसवी ।
म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी । आम्ही करूं ऐसेंचि ॥१७॥
कांही सांगावें शहाणपण । म्हणती तुम्ही सांगणारे कोण ?
खुशी वाटेल तैसें करोन । राहूं आम्ही ॥१८॥
ऐसी झाली गांवाची स्थिती । वाईट वाटतें हृदयाप्रति ।
सोडूनि जावें गांवा येई चित्तीं । परि जीवा आवडेना ॥१९॥
शेवटी आलों तुम्हांसि शरण । तुम्ही गांव केले आदर्श म्हणोन ।
कैसे वळविलें तेथील जन ? सांगा आम्हालागोनि ॥२०॥
मित्रा ! तूं विचारला प्रश्न बरवा । अति हर्ष झाला माझ्या जीवा ।
मी सांगेन धरोनि भावा । वर्म माझें ॥२१॥
प्रथम कळूं दे तुझी साधना । काय ठेवितोसि आपुली धारणा ?
दिनचर्येंची कैसी रचना । आहे तुझ्या ? ॥२२॥
हेचि मुख्य खूण । जोंवरि वक्त्याचें न दिसे आचरण ।
तोंवरि लोक वागतील म्हणोन । समजूं नये ॥२३॥
लोकांसि जें जें शिकवावें । तें आधी आपणचि आचरावें ।
नुसतें पुढारी म्हणोनि मिरवावें । तेणें आदर न वाढे ॥२४॥
एकेक विषयाचें पुढारीपण । घेवोनि तैसें केलें आचरण ।
त्यांनीच बिघडवूं शकले गांव पूर्ण । गुंड व्यसनी व्यभिचारी ॥२५॥
तैसेचि गांव सुधाराया आपण । विशेष केलें पाहिजे आचरण ।
जेणें येईल अंगी आकर्षण । गावांस वेधून घेणारें ॥२६॥
येर पुढारी असोत सर्वहि । परंतु आपला मार्ग खुंटला नाही ।
लोक जणुं वाटचि पाहती सदाहि । कोण होतो पुढे म्हणोनि ॥२७॥
यासाठी निराशेचें नाही कारण । आचरणें साधावें पुढारीपण ।
सत्यचि प्रभावी सर्वांहून । ही अमोल खूण विसरूं नये ॥२८॥
ज्याने सत्याशीं नातें जोडलें । त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आलें ।
सांगण्याहूनिहि सामर्थ्य चाले । त्याच्या शुध्द जीवनाचें ॥२९॥
यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह । खानापानादिकीं नियमाग्रह ।
सर्वचि विषयीं असंग्रह । आपुल्यासाठी म्हणोनि ॥३०॥
पवित्र मित आहार-विहार । निद्रा थोडी शांती फार ।
सदा प्रसन्नता मुखावर । बोलतां चालतां ॥३१॥
यमनियमादि तैसीं आसनें । साधोनिया आरोग्य राखणें ।
बुध्दि-बल-चातुर्यें वर्तनें । तेजोमय असावें ॥३२॥
आपुल्या कष्टावरीच जगावें । कुणाचे उपकार अंगी न घ्यावें ।
कमीत कमी खर्चाने रहावें । साध्या घरी ॥३३॥
अंग झाकण्यापुरते कपडे । शिवले असावेत साधे भाबडे ।
शौकपाणी न आवडे । राहावें ऐसें ॥३४॥
आपुलें परक्याचें हित । दोन्ही असावेत लक्षांत ।
जेणें परक्यासि वाटे पसंत । तैसा व्यवहार असावा ॥३५॥
आपुल्या कोणत्याहि कारभारीं । अन्याय न व्हावा कोणावरी ।
सावधानी असावी हृदयांतरी । सर्वकाळ सत्याची ॥३६॥
दयाक्षमा शांति नम्रता । प्रत्येक जागीं प्रामाणिकता ।
सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी संपत्ति साधावी ॥३७॥
सार्वजनिक कामीं जाऊनि । कष्टत जावें निःस्पृहपणीं ।
जाति-पक्ष-मित्रशत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे नसावा ॥३८॥
असभ्य हेकट नसावें वर्तन । कर्कशता न दिसावी वागण्यांतून ।
कुणाचीहि निंदास्तुति ऐकोन । दुराग्रही मन न करावें ॥३९॥
प्रत्यक्ष दोष पाहिल्याविण । अथवा न समजतां विश्वसनीयांकडून ।
करूं नये न्यायदान । शोधल्यावाचून सर्व पक्ष ॥४०॥
सामुदायिक जबाबदारी । असेल जी जी नागरिकावरि ।
न चुकता पाळावी ती निर्धारी । स्वार्थ उरीं न ठेवितां ॥४१॥
न करावी कोणाची निंदास्तुति । आपण आदर्श करावी कृति ।
स्त्रियामुलेंवृध्दादि सर्वांसांगाती । वागावें प्रेमें विश्वासें ॥४२॥
राखावी शब्दांची किंमत । वेळेचें महत्त्व सदोदित ।
दुसर्याचें सुखदुःख आघातहित । आपणाइतुकेंचि जाणावें ॥४३॥
हें सर्व जंव पाहतील जन । म्हणतील हाचि आहे सज्जन ।
वाढेल तुमच्या कार्यांचें महिमान । हळूहळू ॥४४॥
लोकांसि कळेंल तुमचें वर्तन । अंतबार्ह्य सात्विक पूर्ण।
मग पाहतील देवाप्रमाण । तुम्हांलागी ॥४५॥
मित्रा ! ऐसें जंव तूं करिशी । तंव लोक राहतील प्रसन्न तुजशीं ।
ऐकण्याची वाटेल खुशी । लोकांना तुझें ॥४६॥
म्हणतील तुम्हीं सांगावें । तैसेंचि आम्ही वागावें ।
तुमच्या बोलण्यांतून निघावें । तरि मरण होईल आमुचें ॥४७॥
तेव्हा प्रथम करावा विचार । आपण घ्यावा की नाही पुढाकार ।
एकदा पाऊल टाकतां समोर । मागे घेऊं नये कल्पांतीं ॥४८॥
ज्यासि वाटे जनसेवा करावी । त्याने प्रथम लोकलाज सोडावी ।
आपुल्या आत्माची ग्वाही घ्यावी । कार्य सत्य म्हणोनिया ॥४९॥
ज्यांत आहे सर्वांचें सुख । तें सत्कार्य न करितां राहावें विन्मुख ।
हें तों आहे घोर पातक । समजोनि घ्यावें ॥५०॥
साहेल तैसी करावी सुरवात । मुरवावया जनलोकांत ।
हृदयांत आणि इंद्रियांत । मेळ राहूं शके ऐसी ॥५१॥
क्रमाने पाऊल पुढे घ्यावें । कार्य करितां समाधान मानावें ।
विरोधकांसि उत्तर द्यावें । नम्रतेने ॥५२॥
लोकांसि बोलणें शिकवावें । तरि आपण उत्तमचि बोलावें ।
बोलण्यांत माधुर्य ओतावे । आपुल्या प्रेमें ॥५३॥
आपुल्या बोलण्याने उबगतील जन । ऐसें कधी न करावें भाषण ।
कोणचेंही पूर्ण ऐकल्याविण । न द्यावें मधून उत्तर ॥५४॥
आपुलें बोलणें प्रेमाचें । दुसर्याचें बोलणें क्रोधाचें ।
परि ते सहन करावे त्याचे । वार अंगीं ॥५५॥
दुसर्याने कितीही क्रोध केला । तरी हसोनि पाहिजे मावळिला ।
उत्तर देतां यावें शांतीनें त्याला । आपुल्यापरी ॥५६॥
शंका विचारावयाची दाटी । लागेल पदोपदीं पाठीं ।
सहन करोनि ही आटाआटी । पाय पुढे टाकावा ॥५७॥
एकदा झालिया निश्चय । मग लोकचि होती साहाय्य ।
कामें करावयाची सोय । सोपी होते ॥५८॥
आपोआपचि होतो निर्वाळा । तांडा जमतो भोंवती सगळा ।
निवडावा त्यांतूनि जिव्हाळा । आहे कोणा ॥५९॥
त्यांसचि साथी करावें । शक्तियुक्तीने मन भरावें ।
कार्य करावयासि सोपवावें । आपुल्या जैसें ॥६०॥
ऐसे मिळतां काही जन । आरंभ झाला सत्कार्या पूर्ण ।
मग सहजचि घ्यावें महत्पुण्य ।गांव-सेवेचें ॥६१॥
याहून नाही दुसरा उपाय । आपुल्या गांवाची लागया सोय ।
हाचि मंत्र आहे सिध्दांतमय ।गांव आपुलें सुधारावया ॥६२॥
हें ऐकोनिया माझे उत्तर । प्रश्नकर्ता बोलला चतुर ।
यासि लागतील दिवस फार । तोंवरि गांवाचे होईल कैसें ? ॥६३॥
आपण सांगितले जें साधन । तेंहि आहे महाकठिण ।
कोण साधील यमनियम आसन । ध्यानादि सर्व ? ॥६४॥
त्यासि वर्षेहि बरींच लोटतीं । तोंपर्यंत आमुची गात्रें शिथिल होतीं ।
मग कोण पाहील गांवाप्रति । उत्तम आहे की वाईट ? ॥६५॥
आम्हीं मध्येच गेलों मरून । मग इच्छा राहील अपूर्ण ।
काय सांगावें पुढे कोण । करील कार्य आमुचें ? ॥६६॥
यासाठी सांगा सोपा उपाय । ज्याने साधेल सर्व सोय ।
देऊं आम्ही खर्च जरी ये । त्यासाठी कांही ॥६७॥
मित्रा ! ऐक याचें उत्तर । तुज सोडोनि गांव व्हांवे सुंदर ।
ऐसी इच्छा धरिशील तीव्र । तरि ती वेडेपणाची ॥६८॥
माझें गांव सुंदर व्हावें । मी चोरजारचि राहावें ।
ऐसें विसंगत दिसतें आघवें । म्हणणें तुझें ॥६९॥
व्यक्तिशुध्दीविण दुसरा उपाय । काय आहे व्हाया साहाय्य ? ।
टिकविण्यास गांवीं उत्तम सोय । याविण मजला दिसेना ॥७०॥
तूं म्हणशील सत्तेने सुधारावें । तांबडतोब कायदे करावे ।
तुझ्यासारखे टाळतील आघवे । ते तैसेचि ठेवावे स्वार्थीजन ॥७१॥
हें म्हणणें कोण ऐकेल ? कितीहि उदार बोलले बोल ।
तरी जनमन ते ओळखील । छीथू करील आमुचीहि ॥७२॥
आणि तैसेंचि करूं जावें । तरि गांव कैसें सुधारावें ? ।
व्यक्ति मिळोनीच गांव आघवें । हें विसरतां सर्व फोल ॥७३॥
लोक सुधारणेच्या रेखा फाडती । पैसा देऊन करूं म्हणती ।
परि पैसा घेऊनि फसविती । ऐसें लोक उभेच तेथे ॥७४॥
करूं म्हणती व्याख्यानें देऊन । तरि लोकहि शिकती व्याख्यान ।
काय होय यांतूनि निष्पन्न ? जोंवरि मानव ना बदले ॥७५॥
त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण । जिव्हाळ्याची सेवा पूर्ण ।
तरीच ग्राम होईल नंदनवन । अवडंबरावाचूनि ॥७६॥
वास्तविक त्यासि वेळहि नाहि । सवेंच चालेल सुधारणाहि ।
सुरू करोनि सांगत जाई । शिकवी मनासहित जना ॥७७॥
बोल बोल याचें उत्तर । तुझी तयारी आहे काय सत्त्वर ?
नाहीतरि वेळ मात्र । गमावूं नकोस आमुचा ॥७८॥
तेव्हा तो निराशेने वदला । अपरिग्रह जरि आम्हीं केला ।
काय करील मुलाबाळाला ? मग काय झाला फायदा माझा ? ॥७९॥
कासया करावें एवढे कठीण ? चालूं द्या जैसे चालती जन ?
आपणचि दुःखी होऊन । कां मरावें यासाठी ? ॥८०॥
ऐसें बोल ऐकतां प्रश्नकर्त्याचे । बोललों तुम्हीच गुंड गुंडाचे ।
पुन्हा त्यांतहि आमुचें । साहाय्य घेतां बुडवाया ॥८१॥
तुम्हीच गांव बुडविला । सांगायासि आले बोलबाला ।
ऐसाचि वाटे घात झाला । सर्व गांवदेशाचा ॥८२॥
तुमच्यावरूनि मज बोध झाला । देश अशांनीच गर्तेत घातला ।
शहाणे म्हणवून नाश केला । गांवाचा तुम्ही ॥८३॥
प्रथम जें तुम्ही ऐसें बोलले । जे जे जन सुधारण्यास आणले ।
त्यांनीच गांव बुडविलें । आमुचें सर्व ॥८४॥
हें म्हणणे सारें लटके । तुम्हांसीच द्यावे वाटे फटके ।
नाहीतरि करा आतां निकें । सांगतों तैसें ॥८५॥
तो भला कांही पाय घेईना । फसला मोह-कर्दमीं नाना ।
म्हणे आलों होतों आपुल्या दर्शना । लाभ होईल म्हणोनि ॥८६॥
गांवी येती साधु-महंत । कार्यकर्ते विद्वान पंडित ।
त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ । करावा हीच रुचि मज ॥८७॥
जैसे आम्हीं पोथीपुराण वाचतों । तैसीच त्याची चर्चा करतों ।
कोण शहाणा हें पाहतों । वरच्या वरि ॥८८॥
तैसा बोललों आपला ज्ञानचर्चा । नेहमीच चालती गप्पा आमुच्या ।
होतील कधीकाळीं मनाच्या । भावनाहि ऐशा ॥८९॥
तुम्हीं तर नेटचि लाविला । सांगतां सुरवातचि करावयाला ।
यास पाहिजे विचार केला । कांही वर्षें ॥९०॥
मी ऐकलें त्याचें म्हणणें । विव्हळ झालों जीवेंप्राणें ।
ऐसेहि जन निर्मिले भगवंताने ! वाटलें मना ॥९१॥
हात जोडले तयाप्रति । म्हणालों आता नको आपुली संगति ।
बहू ज्ञान दिलें तुम्हांप्रति । वस्तादाने ॥९२॥
परंतु यापेक्षा मूर्ख बरे । ते ऐकोनि घेती विचारे ।
आम्ही प्रयत्न करूं म्हणोनि सारे । घरी जाती सदभावें ॥९३॥
तुम्ही दिसतां पढतमूर्ख । दुसर्या दुखवोनि घेतां सुख ।
कळोनि न वळे याचें कौतुक । करावें तरि लाजिरवाणें ॥९४॥
परि आतां एक ध्यानी ठेवावें । याने आपुलें भलें कधीहि नव्हे ।
परि कुणातेंहि समाधान पावे । या चर्चेने क्रियायोगें ॥९५॥
असो मजसी जैसा प्रश्नकर्तां भेटला । तैसा का कोणी शहाणा उठला ।
तरि त्याने घातचि झाला । ग्रामसेवाकार्याचा ॥९६॥
बोलण्यांत ते अति शहाणे । परि कार्य त्यांचें ओंगळवाणें ।
कैसें गांव सुधारेल याने ? सांगा मज ॥९७॥
न सोडतांहि पेंढारीपण । त्यांना पाहिजे पुढारीपण ।
इच्छिती संन्याशाचा सन्मान । पत्नी घेऊनी खांद्यावरि ॥९८॥
साधूशी भाविकपणें बोलती । मूर्खापाशी महंत होती ।
व्यसनी लोकांमाजी मिळूनि जाती । व्यसनें भोगतां ॥९९॥
आपणा सर्वत्र मान मिळावा । धनाचाहि संग्रह व्हावा ।
आणि जरा न ताणहि न लागावा । ऐसा व्यापार हवा त्यांसि ॥१००॥
हेंचि ओळखावें धू्र्तपण । यासीच पढतमूर्ख म्हणती शास्त्रज्ञ ।
त्यालागी करूनहि प्रयत्न ।असाध्य त्यांचा खातारोग ॥१०१॥
त्यांपासोनि ग्राम वाचवावें । खरें सात्विकपण गांवी भरावें ।
सरळपणासाठीच प्रयत्न करावे । सुधारकांनी ॥१०२॥
यासि मज एक साधन सुचे । जे जे असतील गांवी ऐसे ।
आधी त्यांचेच लागावें कांसे । ससेमिरा घेऊनिया ॥१०३॥
जे जन बोलण्यांत जिंकती । आचरणांत मागे राहती ।
त्यांची घ्यावी चातुर्यें झडती । ग्राम हातीं घेवोनि ॥१०४॥
फुकी ज्ञानचर्चा नाही झाली । म्हणोनि ज्ञानशक्ति कमी पडली ।
ऐसी कधी न पडावी भुली । लोकांस माझ्या ॥१०५॥
अदंभ दया अभयादि गुण । त्यांसीच गीता म्हणे ज्ञानखूण ।
क्रियावान तोचि पंडित पूर्ण । सर्वभूतहितीं रत ॥१०६॥
लाख बोलक्यांहून थोर । एकचि माझा कर्तबगार ।
हें वचन पाळोनि सुंदर । गांव सुधारावें कार्याने ॥१०७॥
सुधारणेची करितां बोलणीं । म्हणावें, चला कामें करूं मिळोनि ।
घ्या हें टोपलें माती भरोनि । शिरावरि आपुल्या ॥१०८॥
सर्वांसीच लावावें काम । हाचि मार्ग सर्वात उत्तम ।
यानेच बनेल आदर्श ग्राम । सहाय्य देतां सत्कार्या ॥१०९॥
आदर्श न करितां जीवन । कैसा मिळेल आदर्शाचा मान ?
कैसा जगीं आदर्श होय निर्माण ? तुकडया म्हणे ॥११०॥
इति श्री ग्राम-गीता ग्रंथ । गुरू शास्त्र स्वानुभव-संमत ।
कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ । सातवा अध्याय संपूर्ण ॥१११॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥