वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सातवा

ग्रामगीता

अध्याय सातवा : आचार-प्राबल्य


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥


एका सज्जनें प्रश्न केला । लोकरहाटी कळली आम्हांला ।
पुढारी नेतेच सुधारती गांवाला । सत्य हें सारें ॥१॥

परि भल्यांनीच गोंधळ घातला । पुढारी पुढिलांचा अरि झाला ।
तयांच्या नगार्‍यापुढे कसला । आवाज आमचा ताण मारी ? ॥२॥

न्यायदेवता सिंहासनी बसविली । तीच अन्याय करून गेली । 
मग कैची सुव्यवस्था आली ? सांगा सांगा ॥३॥

सत्संगतीसि पंडित बोलाविला । त्यानेच गांवी कलह केला । 
शहाणा म्हणावा तोच निघाला । महामुर्ख जैसा ॥४॥

प्रसन्नतेकरिता ठेवलें गायन । तेथे ऐकावें लागलें रुदन । 
आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून । अडे ओरडे ॥५॥

घोडें शिकवाया आणला स्वार । तोचि पडला मोडोनि कंबर । 
कैसे बसतील मग इतर । घोडयावरि ? ॥‍६॥

इमानदार म्हणोनि पाहिला धनी । त्यानेच केली बेइमानी । 
आता विश्वास ठेवावा कोणीं । कोणावरि ? ॥७॥

मुलें शिकविण्या ठेविला मास्तर । त्यानेच केला दुर्व्यवहार । 
शिक्षकासीच शिक्षणाची जरूर । ऐसे झालें ॥८॥

औषधि द्याया आणिला डॉक्टर । त्याने रोग्यासि दिलें जहर । 
आतां कोणी करावा उपचार ? सांगा सांगा ॥९॥

ऐसें झालें आमुच्या गांवी । सांगा काय व्यवस्था करावी ? 
कोणांस हांक मारूनि घ्यावी । विश्वासाने ? ॥१०॥

जन मनांत येईल तें करिती । दारू पिती तमाशे नाचविती । 
पुढारीच पुढाकार घेती । ऐशा कामीं ॥११॥

गुंडास धरोनिया हातीं । करिती मनीं येईल त्याची फजीती । 
त्यावांचोनि पुढार्‍याची गति । म्हणती प्रगतिपथा येईना ॥१२॥

ऐसेंचि धरिलें त्यांनी मनीं । नाश केला गांवी फिरूनि । 
आता चोरचि झाले धनी । सज्जन मेले उपवासी ॥१३॥

गांव सगळेंचि बिघडलें । आपल्यापरीं स्वैर झालें । 
नाही कोणाचें वर्चस्व राहिलें । कोणावरि ॥१४॥

सांगा सांगा काय करावें ? तुम्ही म्हणतां गांव सुधारावें । 
कोण्या मार्गे आपण जावें । ऐशा स्थितीं ? ॥१५॥

आपण करावें कांही साधन । हसती टिंगल करोनि जन । 
म्हणती हा साधू आला कुठोन । पोट भरावया ॥१६॥

खराटा घेवोनि झाडझूड करावी । तेथेचि मलविसर्जना बसवी ।
म्हणती तुमची सेवा तुम्ही चालवावी । आम्ही करूं ऐसेंचि ॥१७॥

कांही सांगावें शहाणपण । म्हणती तुम्ही सांगणारे कोण ? 
खुशी वाटेल तैसें करोन । राहूं आम्ही ॥१८॥

ऐसी झाली गांवाची स्थिती । वाईट वाटतें हृदयाप्रति । 
सोडूनि जावें गांवा येई चित्तीं । परि जीवा आवडेना ॥१९॥

शेवटी आलों तुम्हांसि शरण । तुम्ही गांव केले आदर्श म्हणोन । 
कैसे वळविलें तेथील जन ? सांगा आम्हालागोनि ॥२०॥

मित्रा ! तूं विचारला प्रश्न बरवा । अति हर्ष झाला माझ्या जीवा ।
मी सांगेन धरोनि भावा । वर्म माझें ॥२१॥

प्रथम कळूं दे तुझी साधना । काय ठेवितोसि आपुली धारणा ? 
दिनचर्येंची कैसी रचना । आहे तुझ्या ? ॥२२॥

हेचि मुख्य खूण । जोंवरि वक्त्याचें न दिसे आचरण । 
तोंवरि लोक वागतील म्हणोन । समजूं नये ॥२३॥

लोकांसि जें जें शिकवावें । तें आधी आपणचि आचरावें । 
नुसतें पुढारी म्हणोनि मिरवावें । तेणें आदर न वाढे ॥२४॥

एकेक विषयाचें पुढारीपण । घेवोनि तैसें केलें आचरण । 
त्यांनीच बिघडवूं शकले गांव पूर्ण । गुंड व्यसनी व्यभिचारी ॥२५॥

तैसेचि गांव सुधाराया आपण । विशेष केलें पाहिजे आचरण । 
जेणें येईल अंगी आकर्षण । गावांस वेधून घेणारें ॥२६॥

येर पुढारी असोत सर्वहि । परंतु आपला मार्ग खुंटला नाही । 
लोक जणुं वाटचि पाहती सदाहि । कोण होतो पुढे म्हणोनि ॥२७॥

यासाठी निराशेचें नाही कारण । आचरणें साधावें पुढारीपण । 
सत्यचि प्रभावी सर्वांहून । ही अमोल खूण विसरूं नये ॥२८॥

ज्याने सत्याशीं नातें जोडलें । त्याचे अंगी गुरुत्वाकर्षण आलें । 
सांगण्याहूनिहि सामर्थ्य चाले । त्याच्या शुध्द जीवनाचें ॥२९॥

यासाठी प्रथम पाहिजे इंद्रियनिग्रह । खानापानादिकीं नियमाग्रह । 
सर्वचि विषयीं असंग्रह । आपुल्यासाठी म्हणोनि ॥३०॥

पवित्र मित आहार-विहार । निद्रा थोडी शांती फार । 
सदा प्रसन्नता मुखावर । बोलतां चालतां ॥३१॥

यमनियमादि तैसीं आसनें । साधोनिया आरोग्य राखणें । 
बुध्दि-बल-चातुर्यें वर्तनें । तेजोमय असावें ॥३२॥

आपुल्या कष्टावरीच जगावें । कुणाचे उपकार अंगी न घ्यावें । 
कमीत कमी खर्चाने रहावें । साध्या घरी ॥३३॥

अंग झाकण्यापुरते कपडे । शिवले असावेत साधे भाबडे । 
शौकपाणी न आवडे । राहावें ऐसें ॥३४॥

आपुलें परक्याचें हित । दोन्ही असावेत लक्षांत । 
जेणें परक्यासि वाटे पसंत । तैसा व्यवहार असावा ॥३५॥

आपुल्या कोणत्याहि कारभारीं । अन्याय न व्हावा कोणावरी । 
सावधानी असावी हृदयांतरी । सर्वकाळ सत्याची ॥३६॥

दयाक्षमा शांति नम्रता । प्रत्येक जागीं प्रामाणिकता । 
सरळपणा आणि प्रेमळता । ही दैवी संपत्ति साधावी ॥३७॥

सार्वजनिक कामीं जाऊनि । कष्टत जावें निःस्पृहपणीं । 
जाति-पक्ष-मित्रशत्रु म्हणूनि । पक्षपात कोठे नसावा ॥३८॥

असभ्य हेकट नसावें वर्तन । कर्कशता न दिसावी वागण्यांतून ।
कुणाचीहि निंदास्तुति ऐकोन । दुराग्रही मन न करावें ॥३९॥

प्रत्यक्ष दोष पाहिल्याविण । अथवा न समजतां विश्वसनीयांकडून । 
करूं नये न्यायदान । शोधल्यावाचून सर्व पक्ष ॥४०॥

सामुदायिक जबाबदारी । असेल जी जी नागरिकावरि । 
न चुकता पाळावी ती निर्धारी । स्वार्थ उरीं न ठेवितां ॥४१॥

न करावी कोणाची निंदास्तुति । आपण आदर्श करावी कृति । 
स्त्रियामुलेंवृध्दादि सर्वांसांगाती । वागावें प्रेमें विश्वासें ॥४२॥

राखावी शब्दांची किंमत । वेळेचें महत्त्व सदोदित । 
दुसर्‍याचें सुखदुःख आघातहित । आपणाइतुकेंचि जाणावें ॥४३॥

हें सर्व जंव पाहतील जन । म्हणतील हाचि आहे सज्जन । 
वाढेल तुमच्या कार्यांचें महिमान । हळूहळू ॥४४॥

लोकांसि कळेंल तुमचें वर्तन । अंतबार्ह्य सात्विक पूर्ण। 
मग पाहतील देवाप्रमाण । तुम्हांलागी ॥४५॥

मित्रा ! ऐसें जंव तूं करिशी । तंव लोक राहतील प्रसन्न तुजशीं ।
ऐकण्याची वाटेल खुशी । लोकांना तुझें ॥४६॥

म्हणतील तुम्हीं सांगावें । तैसेंचि आम्ही वागावें । 
तुमच्या बोलण्यांतून निघावें । तरि मरण होईल आमुचें ॥४७॥

तेव्हा प्रथम करावा विचार । आपण घ्यावा की नाही पुढाकार ।
एकदा पाऊल टाकतां समोर । मागे घेऊं नये कल्पांतीं ॥४८॥

ज्यासि वाटे जनसेवा करावी । त्याने प्रथम लोकलाज सोडावी ।
आपुल्या आत्माची ग्वाही घ्यावी । कार्य सत्य म्हणोनिया ॥४९॥

ज्यांत आहे सर्वांचें सुख । तें सत्कार्य न करितां राहावें विन्मुख ।
हें तों आहे घोर पातक । समजोनि घ्यावें ॥५०॥

साहेल तैसी करावी सुरवात । मुरवावया जनलोकांत । 
हृदयांत आणि इंद्रियांत । मेळ राहूं शके ऐसी ॥५१॥

क्रमाने पाऊल पुढे घ्यावें । कार्य करितां समाधान मानावें । 
विरोधकांसि उत्तर द्यावें । नम्रतेने ॥५२॥

लोकांसि बोलणें शिकवावें । तरि आपण उत्तमचि बोलावें । 
बोलण्यांत माधुर्य ओतावे । आपुल्या प्रेमें ॥५३॥

आपुल्या बोलण्याने उबगतील जन । ऐसें कधी न करावें भाषण । 
कोणचेंही पूर्ण ऐकल्याविण । न द्यावें मधून उत्तर ॥५४॥

आपुलें बोलणें प्रेमाचें । दुसर्‍याचें बोलणें क्रोधाचें ।
परि ते सहन करावे त्याचे । वार अंगीं ॥५५॥

दुसर्‍याने कितीही क्रोध केला । तरी हसोनि पाहिजे मावळिला । 
उत्तर देतां यावें शांतीनें त्याला । आपुल्यापरी ॥५६॥

शंका विचारावयाची दाटी । लागेल पदोपदीं पाठीं । 
सहन करोनि ही आटाआटी । पाय पुढे टाकावा ॥५७॥

एकदा झालिया निश्चय । मग लोकचि होती साहाय्य । 
कामें करावयाची सोय । सोपी होते ॥५८॥

आपोआपचि होतो निर्वाळा । तांडा जमतो भोंवती सगळा । 
निवडावा त्यांतूनि जिव्हाळा । आहे कोणा ॥५९॥

त्यांसचि साथी करावें । शक्तियुक्तीने मन भरावें । 
कार्य करावयासि सोपवावें । आपुल्या जैसें ॥६०॥

ऐसे मिळतां काही जन । आरंभ झाला सत्कार्या पूर्ण । 
मग सहजचि घ्यावें महत्पुण्य ।गांव-सेवेचें ॥६१॥

याहून नाही दुसरा उपाय । आपुल्या गांवाची लागया सोय । 
हाचि मंत्र आहे सिध्दांतमय ।गांव आपुलें सुधारावया ॥६२॥

हें ऐकोनिया माझे उत्तर । प्रश्नकर्ता बोलला चतुर । 
यासि लागतील दिवस फार । तोंवरि गांवाचे होईल कैसें ? ॥६३॥

आपण सांगितले जें साधन । तेंहि आहे महाकठिण । 
कोण साधील यमनियम आसन । ध्यानादि सर्व ? ॥६४॥

त्यासि वर्षेहि बरींच लोटतीं । तोंपर्यंत आमुची गात्रें शिथिल होतीं । 
मग कोण पाहील गांवाप्रति । उत्तम आहे की वाईट ? ॥६५॥

आम्हीं मध्येच गेलों मरून । मग इच्छा राहील अपूर्ण । 
काय सांगावें पुढे कोण । करील कार्य आमुचें ? ॥६६॥

यासाठी सांगा सोपा उपाय । ज्याने साधेल सर्व सोय । 
देऊं आम्ही खर्च जरी ये । त्यासाठी कांही ॥६७॥

मित्रा ! ऐक याचें उत्तर । तुज सोडोनि गांव व्हांवे सुंदर । 
ऐसी इच्छा धरिशील तीव्र । तरि ती वेडेपणाची ॥६८॥

माझें गांव सुंदर व्हावें । मी चोरजारचि राहावें । 
ऐसें विसंगत दिसतें आघवें । म्हणणें तुझें ॥६९॥

व्यक्तिशुध्दीविण दुसरा उपाय । काय आहे व्हाया साहाय्य ? । 
टिकविण्यास गांवीं उत्तम सोय । याविण मजला दिसेना ॥७०॥

तूं म्हणशील सत्तेने सुधारावें । तांबडतोब कायदे करावे । 
तुझ्यासारखे टाळतील आघवे । ते तैसेचि ठेवावे स्वार्थीजन ॥७१॥

हें म्हणणें कोण ऐकेल ? कितीहि उदार बोलले बोल । 
तरी जनमन ते ओळखील । छीथू करील आमुचीहि ॥७२॥

आणि तैसेंचि करूं जावें । तरि गांव कैसें सुधारावें ? । 
व्यक्ति मिळोनीच गांव आघवें । हें विसरतां सर्व फोल ॥७३॥

लोक सुधारणेच्या रेखा फाडती । पैसा देऊन करूं म्हणती । 
परि पैसा घेऊनि फसविती । ऐसें लोक उभेच तेथे ॥७४॥

करूं म्हणती व्याख्यानें देऊन । तरि लोकहि शिकती व्याख्यान । 
काय होय यांतूनि निष्पन्न ? जोंवरि मानव ना बदले ॥७५॥

त्यास मुख्य पाहिजे अंतःकरण । जिव्हाळ्याची सेवा पूर्ण । 
तरीच ग्राम होईल नंदनवन । अवडंबरावाचूनि ॥७६॥

वास्तविक त्यासि वेळहि नाहि । सवेंच चालेल सुधारणाहि । 
सुरू करोनि सांगत जाई । शिकवी मनासहित जना ॥७७॥

बोल बोल याचें उत्तर । तुझी तयारी आहे काय सत्त्वर ? 
नाहीतरि वेळ मात्र । गमावूं नकोस आमुचा ॥७८॥

तेव्हा तो निराशेने वदला । अपरिग्रह जरि आम्हीं केला । 
काय करील मुलाबाळाला ? मग काय झाला फायदा माझा ? ॥७९॥

कासया करावें एवढे कठीण ? चालूं द्या जैसे चालती जन ? 
आपणचि दुःखी होऊन । कां मरावें यासाठी ? ॥८०॥

ऐसें बोल ऐकतां प्रश्नकर्त्याचे । बोललों तुम्हीच गुंड गुंडाचे । 
पुन्हा त्यांतहि आमुचें । साहाय्य घेतां बुडवाया ॥८१॥

तुम्हीच गांव बुडविला । सांगायासि आले बोलबाला । 
ऐसाचि वाटे घात झाला । सर्व गांवदेशाचा ॥८२॥

तुमच्यावरूनि मज बोध झाला । देश अशांनीच गर्तेत घातला । 
शहाणे म्हणवून नाश केला । गांवाचा तुम्ही ॥८३॥

प्रथम जें तुम्ही ऐसें बोलले । जे जे जन सुधारण्यास आणले । 
त्यांनीच गांव बुडविलें । आमुचें सर्व ॥८४॥

हें म्हणणे सारें लटके । तुम्हांसीच द्यावे वाटे फटके । 
नाहीतरि करा आतां निकें । सांगतों तैसें ॥८५॥

तो भला कांही पाय घेईना । फसला मोह-कर्दमीं नाना । 
म्हणे आलों होतों आपुल्या दर्शना । लाभ होईल म्हणोनि ॥८६॥

गांवी येती साधु-महंत । कार्यकर्ते विद्वान पंडित । 
त्यांचे संगती तैसा तैसा शास्त्रार्थ । करावा हीच रुचि मज ॥८७॥

जैसे आम्हीं पोथीपुराण वाचतों । तैसीच त्याची चर्चा करतों । 
कोण शहाणा हें पाहतों । वरच्या वरि ॥८८॥

तैसा बोललों आपला ज्ञानचर्चा । नेहमीच चालती गप्पा आमुच्या । 
होतील कधीकाळीं मनाच्या । भावनाहि ऐशा ॥८९॥

तुम्हीं तर नेटचि लाविला । सांगतां सुरवातचि करावयाला । 
यास पाहिजे विचार केला । कांही वर्षें ॥९०॥

मी ऐकलें त्याचें म्हणणें । विव्हळ झालों जीवेंप्राणें । 
ऐसेहि जन निर्मिले भगवंताने ! वाटलें मना ॥९१॥

हात जोडले तयाप्रति । म्हणालों आता नको आपुली संगति । 
बहू ज्ञान दिलें तुम्हांप्रति । वस्तादाने ॥९२॥

परंतु यापेक्षा मूर्ख बरे । ते ऐकोनि घेती विचारे । 
आम्ही प्रयत्न करूं म्हणोनि सारे । घरी जाती सदभावें ॥९३॥

तुम्ही दिसतां पढतमूर्ख । दुसर्‍या दुखवोनि घेतां सुख । 
कळोनि न वळे याचें कौतुक । करावें तरि लाजिरवाणें ॥९४॥

परि आतां एक ध्यानी ठेवावें । याने आपुलें भलें कधीहि नव्हे । 
परि कुणातेंहि समाधान पावे । या चर्चेने क्रियायोगें ॥९५॥

असो मजसी जैसा प्रश्नकर्तां भेटला । तैसा का कोणी शहाणा उठला । 
तरि त्याने घातचि झाला । ग्रामसेवाकार्याचा ॥९६॥

बोलण्यांत ते अति शहाणे । परि कार्य त्यांचें ओंगळवाणें । 
कैसें गांव सुधारेल याने ? सांगा मज ॥९७॥

न सोडतांहि पेंढारीपण । त्यांना पाहिजे पुढारीपण । 
इच्छिती संन्याशाचा सन्मान । पत्नी घेऊनी खांद्यावरि ॥९८॥

साधूशी भाविकपणें बोलती । मूर्खापाशी महंत होती । 
व्यसनी लोकांमाजी मिळूनि जाती । व्यसनें भोगतां ॥९९॥

आपणा सर्वत्र मान मिळावा । धनाचाहि संग्रह व्हावा । 
आणि जरा न ताणहि न लागावा । ऐसा व्यापार हवा त्यांसि ॥१००॥

हेंचि ओळखावें धू्र्तपण । यासीच पढतमूर्ख म्हणती शास्त्रज्ञ । 
त्यालागी करूनहि प्रयत्न ।असाध्य त्यांचा खातारोग ॥१०१॥

त्यांपासोनि ग्राम वाचवावें । खरें सात्विकपण गांवी भरावें । 
सरळपणासाठीच प्रयत्न करावे । सुधारकांनी ॥१०२॥

यासि मज एक साधन सुचे । जे जे असतील गांवी ऐसे । 
आधी त्यांचेच लागावें कांसे । ससेमिरा घेऊनिया ॥१०३॥

जे जन बोलण्यांत जिंकती । आचरणांत मागे राहती । 
त्यांची घ्यावी चातुर्यें झडती । ग्राम हातीं घेवोनि ॥१०४॥

फुकी ज्ञानचर्चा नाही झाली । म्हणोनि ज्ञानशक्ति कमी पडली । 
ऐसी कधी न पडावी भुली । लोकांस माझ्या ॥१०५॥

अदंभ दया अभयादि गुण । त्यांसीच गीता म्हणे ज्ञानखूण । 
क्रियावान तोचि पंडित पूर्ण । सर्वभूतहितीं रत ॥१०६॥

लाख बोलक्यांहून थोर । एकचि माझा कर्तबगार । 
हें वचन पाळोनि सुंदर । गांव सुधारावें कार्याने ॥१०७॥

सुधारणेची करितां बोलणीं । म्हणावें, चला कामें करूं मिळोनि । 
घ्या हें टोपलें माती भरोनि । शिरावरि आपुल्या ॥१०८॥

सर्वांसीच लावावें काम । हाचि मार्ग सर्वात उत्तम ।
यानेच बनेल आदर्श ग्राम । सहाय्य देतां सत्कार्या ॥१०९॥

आदर्श न करितां जीवन । कैसा मिळेल आदर्शाचा मान ?
कैसा जगीं आदर्श होय निर्माण ? तुकडया म्हणे ॥११०॥

इति श्री ग्राम-गीता ग्रंथ । गुरू शास्त्र स्वानुभव-संमत । 
कथिला ग्रामोन्नतीचा आचारपथ । सातवा अध्याय संपूर्ण ॥१११॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥