(चाल : चंद्रकांत राजाची कन्या...)
कसा निभवशी काळ कळेना, मज सद्गुरु माते !
मृत्यु बरा परि चिंता नलगे, ने अपुल्या पंथे ॥धृ.॥
कामादिक हे शत्रु गांजिती, वरचेवर भारी ।
किति सोसू आपदा आई गे ! बनलो अविचारी ॥१॥
नष्ट प्राप्तिला कष्ट करीता, तनु गेली सारी ।
सुखदुःखाची वाट पाहता, भय झाले भारी ॥२॥
जिकडे तिकडे प्रपंच लहरी, उठती घनघोरी ।
आयुष्याची कमती झाली, ना पुरती दोरी ॥३॥
तुकड्यादासा आस लावुनी, का फसवी केली ?
ब्रीद तुझे गे ! थोर म्हणउनी, वरचेवर झेली ॥४॥