वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय तिसावा

ग्रामगीता

अध्याय तिसावा : भजन-प्रभाव

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

एक श्रोता करी प्रश्न । भजनीं देवाचें गुणगान । 
त्यासि बनवितां प्रचाराचें साधन । पावित्र्य मग कैसें उरे ? ॥१॥

भजनासि हें ऐसें वळण । देवोनि चुकवितां आपण । 
साध्या गोष्टीहि शिकविता त्यांतून । हें तों न पटे धार्मिकां ॥२॥

याचें ऐकावें उत्तर । धर्म म्हणजे धारणा सुंदर । 
त्यांत सर्वचि अंगांचा विचार । जीवनाच्या ॥३॥

कलीयुगीं भजन कीर्तनभक्ति । यामाजीं बोलिली विशेष शक्ति । 
ती नव्हे एकांगी संतउक्ति । केवळ मुक्ति मिळवाया ॥४॥

आमुचें संपूर्णचि जीवन । सुधारूं शके कीर्तनभजन । 
वेदशास्त्रस्मृति संपूर्ण । याच काजा जन्मल्या ॥५॥

समाजरचना गांवरचना । विवाहादि संस्कार राज्ययोजना । 
औषधि, शेती, कलादि नाना । वेदस्मृतींत वर्णिल्या ॥६॥

पुरातन संस्कृत वेदकाळ । त्यांतूनि जन्मला पुराणकाळ । 
पुढे प्राकृतजना कळावया सरळ । संत-भजनें अवतरलीं ॥७॥

साधुसंतीं लिहिलें नामभजन । भावभक्ति हृदयीं धरून । 
बोध कळावया जनतेलागून । सहजासहजीं सर्वचि ॥८॥

कांही वेदान्तरूपकें कथिलीं । कांही वैराग्यभावें बोलिलीं । 
कांही सलगीचीं भजनें केलीं । साधुसंतीं विनोदें ॥९॥

कांही रचिलें भजन-भारूड । बहुरूपी, गोंधळी, जोहार, गारूड । 
पाईक, मातंग, गांवगुंड । रूपकें समाज-जीवनाचीं ॥१०॥

कांही केलें लीला-लाघव । गौळणी, गोपाळ, देवीदेव । 
समाजसुधारणेचा गौरव । वर्णिला कांही ॥११॥

जैसा प्रसंग आला सामोरी । तैसींच भजनें केलीं बहुपरी । 
हें कळावया वर्म अपुरी । बुध्दि झाली लोकांची ॥१२॥

वाईट भावना नाशावया । लोकीं कर्तव्यशीलता यावया । 
समाज सुस्थितींत नांदावया । भजनें केलीं संतांनी ॥१३॥

सौरी विराण्याहि गाऊनि । लोकांवरि पाडिली मोहिनी । 
बिघडल्या जना आपुलेंसें करोनि । जागृत केलें समाजा ॥१४॥

गाऊनि नाचूनि नाना रीतीं । भावभक्ति भरोनि गीतीं । 
त्यांतूनि केली जनजागृति । शहाणें केलें संतांनी ॥१५॥

संत तुकाराम, नामदेव । शेखमहंमद, ज्ञानदेव । 
चैतन्य प्रभु, नानकदेव । जना, मीरा, मुक्ताबाई ॥१६॥

कबीर, तुलसीदास, रामानंद । सूरदास, दादू, ब्रह्मानंद । 
नरसी, देवनाथ, परमानंद । संत झाले असंख्य ॥१७॥

ऐसे कितीतरी संत झाले । ज्यांनी अभंग-भजनादि कथिले । 
कित्येक जन उध्दरोनि गेले । नामभजनें तयांच्या ॥१८॥

ज्यांची ऐकतां भजन-वाणी । जाय गगनमंडळ भेदोनि । 
झाले, आहेत, होतील अजूनि । संत-सज्जन यापरी ॥१९॥

म्हणोनि बोलिले सकळ लोकां । ’भजन-मार्ग सोडूं नका’ । 
परि भजनीं तारतम्य शिका । म्हणायाचें हेंचि असे ॥२०॥

राम झाले कृष्ण झाले । संत, पुढारी, सर्वचि झाले । 
परि आज काय पाहिजे केलें । हेंचि कथिलें तयांनी ॥२१॥

जगाची नित्य बदलती गति । आज कोणती उद्या कोणती । 
कोणते बोल कोणाप्रति । सांगावे कधी कळावें हें ॥२२॥

मुडदा स्मशानीं चालला । तेथे काय करावें शृंगाररसाला ? 
पाहिजे वैराग्यभाव वाढविला । भजनमार्गे ॥२३॥

भजनी लग्नकार्यासि बोलाविला । त्याने स्मशानींचा रस वर्णिला । 
लोक म्हणतील काढा याला । काय बरळतो या स्थानीं ? ॥२४॥

तैसेंचि देवुळीं केलें भजन । गायिलें स्त्रीसौंदर्य शृंगारपूर्ण । 
जन पाहतील हसून । वेडयापरी समजोनिया ॥२५॥

रणांगणीं भजनी नेला । वीरांस म्हणे सोडा शत्रूला । 
काय करितां मिथ्या गलबला । ऐसें बोलिल्या कोण ऐके ? ॥२६॥

हें सर्व जयाने जाणावें । तेणेंचि भजनभाव वर्णावे । 
शहाणे करूनि सोडावे । भोळेजन सर्व ॥२७॥

समाज झाला रूढिबध्द । तेथे सांगावे सिध्दांत शुध्द । 
समाजकार्याहि करावें विशद । वेळ पडेल त्यापरी ॥२८॥

प्रसंग पाहोनि उपदेशावें । सत्य तत्त्व तें न सोडावें । 
सत्यचि गोड करोनि सांगावें । वेळकाळादि पाहोनि ॥२९॥

ऐसेंचि समजोनि संतजनें । केले ग्रंथ गीतें भजनें । 
तैसेंचि आज पाहिजे नव्याने । वर्णिलें सारें ॥३०॥

सर्व पंथांचा समन्वय । सर्व जातींचा मेळ होय । 
ऐशाचि भजनांनी लागेल सोय । आमुच्या गांवाची ॥३१॥

हें जरी मागे संतांनी कथिलें । परि आज पाहिजे पुढे वर्णिलें । 
वर्णन करणारेच भ्रमांत पडले । मग ते मेले जनलोक ॥३२॥

कोणी ब्रह्मज्ञानाचीं भजनें गाती । अर्थाविणेच वाचती म्हणती । 
उगीच दंभ अंगीं आणती । आपण ज्ञानी म्हणोनिया ॥३३॥

घेऊनि संतांचें पाठांतर । आपणचि बनती महात्मा सुंदर । 
निभवाया पोटाचा व्यवहार । आयुष्यभरी ॥३४॥

कोणी गौळणींत रंगोनि नाचती । वेष धरोनि दंढार करिती । 
अर्थ सोडोनि मजा मारिती । विषयांधभावें ॥३५॥

ऐसी ऐकतां कृष्णलीला । जनमनीं भाव वेगळा झाला । 
वाटे हा तमाशाचि बनविला । देवादिकांचा ॥३६॥

कोणी रागरागिणी गाती । शब्द तोडोनि अर्थाची माती । 
पाहिजे तसे बनवोनि घेती । शब्द भजनाचे ॥३७॥

कोणी पाठांतर खूप करिती । ताल-बेताल करोनि गाती । 
चीड येते ऐकतां चित्तीं । अर्थ अनर्थ सगळाचि ॥३८॥

कांही गाती अति सुंदर । ताल कुशल आलाप मधुर । 
तेथे अर्थाचा नसे अंकुर । भजनभाव जागेना ॥३९॥

कोणी भजन करावया आधी । गांजा-तंबाकूची पाहती संधि । 
चहाप्रसादाविण न होई गर्दी । भजनकर्‍यांची ॥४०॥

कांही म्हणती आमुचें भजन वेगळें । तें तुम्हांसि कैसें कळे ?
त्यासि पाहिजे गुरुदेव-हस्तकमळें । डोक्यावरि ॥४१॥

कांही सांप्रदायिक भजनी असती । ते आपुलीच शेखी मिरविती । 
माळ-तंदुरीसाठी भांडती । शत्रु जैसे जन्मांतरीचे ॥४२॥

कांही खंजरीसाठी रागें भरती । कांही स्पर्धेने पुढे येती । 
परि समाधान नाही चित्तीं । तिळभरी कोणाचिया ॥४३॥

कांही म्हणती दुसर्‍या संताचें । भजन नका बोलूं मंडपीं आमुचे । 
आमुचें भजन संप्रदायाचें । आमुच्याच साठी ॥४४॥

मित्रहो ! आता ऐसें करणें । सोडोनि द्यावें जीवेंप्राणें । 
कोणत्याहि संतांचीं सदवचनें । म्हणावीं प्रेम धरोनि ॥४५॥

ज्या भजनाचा अर्थ न कळे । तें भजन न म्हणावें आपुल्या बळें । 
ज्याने समाजांत परिणाम सगळे । व्यर्थ होती ॥४६॥

भजनें करावी गांव-जागृति । हृदयजागृति कार्यजागृति । 
सर्वांनी लागावें सत्कर्माप्रति । ऐसें लोकां सांगावें ॥४७॥

भजन म्हणणाराचि आळसी । काय सांगेल जनतेसि ? 
करोनि घेईल आपुली हसी । ऐसें कोणा न करावें ॥४८॥

जें जें करावें तें समजोनि । पाऊल न टाकावें विचारावांचोनि । 
विचारचि नेतो मोक्षभुवनीं । ऐसी साक्ष थोरांची ॥४९॥

विचाराविण देवभक्ति केली । तेथेहि दिसे फजीती झाली । 
लोक म्हणती लोभें फैलाविली । देवपूजा दांभिकाने ॥५०॥

रात्रभरि केलें भजन । पडला खाटलीं बिमार होऊन । 
मग कोठलें नामस्मरण । ’अरे बापा’ ओरडतो ॥५१॥

अभ्यासावांचूनि उपास केला । दोनदिवसां पित्तवात उमळला । 
मग सहा महिने खातचि गेला । दवापाणी मोसंबी ॥५२॥

ऐसें कासयासि करावें ? तारतम्य सोडोनि द्यावें । 
मग तो भोग भोगीत राहावें । आयुष्यभरि ? ॥५३॥

मनुष्याने बुध्दि वापरावी । अनुभवियाची सल्ला घ्यावी । 
अति सर्वत्रचि वर्जावी । अभ्यासें करावी आत्मोन्नति ॥५४॥

समाजीं जेणें हानि घडे । तें सुधारावयाचे पोवाडे । 
वाजवावे संतांचे चौघडे । विचाराने गर्जोनि ॥५५॥

त्यांचेहि करूं अनंत प्रकार । रुचिभेदाचा जाणूनि व्यवहार । 
परि मूळचे सिध्दान्त थोर । सोडूं नेदूं कोणासि ॥५६॥

आधुनिक बसवूं चाली । जेणें लक्ष वेधेल आसुच्या बोलीं । 
परि दाखवूं संतांनी केली । तेचि वाणी या काळीं ॥५७॥

भजनांचे असोत अनंत प्रकार । मागचे पुढचे कांही विचार । 
परि संतांचें काव्य अति थोर । उमटोनि निघे बाहेरी ॥५८॥

परि संतांचीं भजनें दुकान थोर । तेथे अमोलिक वस्तु अपार । 
त्यांतूनि निवडोनि सारासार । देऊं पात्र पाहोनि ॥५९॥

संतभजनीं देवभक्तीच नाही । जीवनाचे सर्व दृष्टान्तहि । 
प्रसंगीं शिव्या देवोनीहि । समजाविलें त्यांनी ॥६०॥

मीराबाईचीं प्रेमभजनें । सूरदासाचीं लीलाकवनें । 
तैसींच गोस्वामींचीं जीवनदर्शनें । उपदेशगाणें कबीराचें ॥६१॥

तें सर्वचि प्रिय देवा । जेणें घडे जीवांची सेवा । 
हें जाणोनि समाज जागवावा । भजनप्रकारें या काळीं ॥६२॥

कांहींनी राममंत्र सांगितला । त्यांतूनि समाज जागविला । 
कांहींनी दत्तमंत्र शिकविला । लोक केले सेवाभावी ॥६३॥

कृष्णरंगीं रंगली मीरा । राज्यवैभव वाटे कचरा । 
छंद लागला घराघरां । तिच्या प्रभावें भक्तीचा ॥६४॥

चैतन्याची गर्जतां वाणी । अनिष्ट रूढया गेल्या पळोनि । 
पावन झाली श्रीकृष्ण-भजनीं । बंगालभूमि त्याकाळीं ॥६५॥

कबीर, नानकदेवादिकांनी । भजनें केलीं विदेशीं फिरूनि । 
विवेकानंद-रामतीर्थांनी । केलें प्रभावित जग जैसें ॥६६॥

ऐसे अनेक मार्गी झाले । परि ते आज अपुरेच पडले । 
देशापुरतेहि नाही व्यापले । समाजा सुमार्गी लावाया ॥६७॥

त्यांची पडली आज उणी । मानव राहिले मागासल्यापणीं । 
याची कराया भरपाई अजूनि । प्रचारक पाहिजे सेवाभावी ॥६८॥

तोचि उत्तम प्रचारक । ओळखे वेळप्रसंग सम्यक । 
मार्ग सांगतो लायक । लोकां हांक देवोनिया ॥६९॥

म्हणे आमुचें कांही नव्हे । संतीं कथिलें जैसें बरवें । 
तेंचि विशद करोनि सांगावें । हाचि धर्म भजनियांचा ॥७०॥

भजनासनीं भजनी बैसला । जनलोकांच्या दृष्टीस आला । 
पाहती लोक सदभावें त्याला । गंभीर दिसला पाहिजे तो ॥७१॥

साधी राहणी सात्विक लेणीं । विनम्र हावभाव-निशाणी । 
शुध्द बोल प्रेमळ वाणी । पाहिजे भजनी लोकांची ॥७२॥

कपाळावरि आठया पडल्या । वेडयावाकडया बाहुल्या फिरल्या । 
हेकडें तोंड मुद्रा फाकल्या । ऐसें कधी न व्हावें ॥७३॥

मनांत असावा नितांत आदर । वृत्तींत असावा भाविक गहिवर । 
रोमांच उठावेत अंगावर । भजनियाच्या ॥७४॥

असावी कोमल रसाळ वाणी । उच्चारितां जावी हृदय भेदोनि । 
जागृत व्हावे ऐकतांच प्राणी । लागावे ध्यानीं सुजनांच्या ॥७५॥

भजनें म्हणावीं सरळ सात्विक । गोड आवाज ओजस्वी रसिक । 
तालबध्द मधुर नि:शंक । अर्थपूर्ण निर्भयपणें ॥७६॥

ऐशाचि पावन प्रचारासाठी । संतीं केली आटाआटी । 
जना कळावी ओठाओठीं । भाषा त्यांची म्हणोनि ॥७७॥

आमुचा देशचि भाविकभक्त । त्याचा विश्वास भजनासक्त । 
देवधर्म म्हणतांचि चढतें रक्त । अंगीं त्याच्या ॥७८॥

हिरण्यकश्यपूसि नामाची चीड । परि नारदाचिया भजनीं ओढ । 
ऐसेंच आहे भजनाचें गूढ । नागहि होई शांत तेथे ॥७९॥

म्हणोनि भजनाचें महत्त्व । भाषणासि येतें गौणत्व । 
 हें समजोनि संतांनी तत्त्व । भजन केलें प्रेमाने ॥८०॥

भाषणांत भरलें समाजकारण । धर्मकारण राजकारण । 
लोककारण विज्ञानकारण । रुक्ष वाटे तें सर्वां ॥८१॥

लोक समजती भजनाची भावना । अर्थ सांगतां सुगंध सुवर्णा । 
चमत्कारें बदलावा जमाना । तैसें होतें भजनाने ॥८२॥

भजनाची वाजली खंजरी । थाप पडली मृदंगावरि । 
झाली जनता वेडीबावरी । ऐकावया भजनासि ॥८३॥

लोक पाहती चातकावाणी । कधी निघेल दुसरी वाणी । 
ऐसा समाज जातां मोहूनि । गांव होई जागृत ॥८४॥

आपुल्या गांवीं व्हावें भजन । जेणें जागृत होती वृध्द-तरुण । 
स्त्रियामुली सकळ सज्जन । कार्य करिती ग्रामाचें ॥८५॥

प्रत्येकाच्या तोंडीं गीतें । ’ आपुलें गांवचि सुधारूं पुरतें । 
हेंचि सांगितलें भगवंतें । ग्रंथामाजीं ’ म्हणती सारे ॥८६॥

गुराखी ढोरकी शेत-मजूर । दुकानदार शिंपी सुतार लोहार । 
दळणीं कांडणीं घरोघर । गाती भजनें उल्हासें ॥८७॥

म्हणती ’ या रे सगळयांनो ! या । एकेक काम हातीं घ्या । 
गांवची सुधारणा करूंया । आपुल्यापरीं ’ ॥८८॥

हेचि स्फूर्ति जागवाया संतीं । केली भजनमालिकेची प्रगति । 
समाधान लाभावया लोकांप्रति । सेवागुणें सुसंस्कारें ॥८९॥

आज सेवेची नोकरी झाली । भजनावरीच जिंदगी चालविली । 
याने साधनांची किंमतचि उडाली । जाहला तो पोटधर्म ॥९०॥

वीणा चिपळया झाल्या भिकारी । पोटास्तव फिरती दारोदारीं । 
त्या मागची संत-तपस्या सारी । लुप्त झाली वाटे जणूं ॥९१॥

यासि फिरूनि दुरुस्त करावें । सुसंस्कारें लोक भरावे । 
घरोघरीं रोपटें पेरावें । सेवावृत्तीचें ॥९२॥
एक सेवक सेवेसि लागला । हजारो लोकांसि मार्ग दिसला । 
मानवजातीचा पांग फेडला । ऐसें व्हावें निश्चयें ॥९३॥

हनुमंत जेव्हा भावनेने चेतला । राममंत्र घेवोनि निघाला । 
कार्य सिध्दचि करोनि आला । उल्हासें श्रीरामाचें ॥९४॥

तैसेंचि आपण आज करावें । भजनादि साधनां सुधारावें । 
गांवोगांवींच्या लोकीं भरावें । बंधुप्रेम त्याद्वारें ॥९५॥

सर्वांभूतीं प्रेमभाव । यांतूनचि सेवेचा उदभव । 
चारित्र्याचा वाढे गौरव । संस्कार होतां भजनांचे ॥९६॥

भजनांची चालतां परंपरा । जना मिळे सत्प्रवृत्तींचा झरा । 
लोकशिक्षणाचा यापरी दुसरा । उपाय नाही सात्विक ॥९७॥

म्हणोनि विनवितों गांवकर्‍यांनो ! तरुण मुलांनो ! वृध्दजनांनो ! 
सगळेचि प्रेमळ गीतें म्हणो । करा ऐसा प्रचार ॥९८॥

वाणी रंगूं द्या हरिनामाची । चटक लागूं द्या सत्कर्मांची । 
चीड येऊं द्या दुर्व्यसनांची । सर्व जना या द्वारें ॥९९॥

जतन करा गांवसंस्कृति । होऊं द्या भजनें जनजागृति । 
जनता-विद्यापीठ हें निश्चिती । तुकडया म्हणे ॥१००॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 
भजनसाधना ग्रामहितार्थ । तिसावा अध्याय संपूर्ण ॥१०१॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥