वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय अडतिसावा

ग्रामगीता

अध्याय अडतिसावा : ग्राम-कुटूंब

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोते आत्मबोधीं रंगले । म्हणती हेंचि पाहिजे कथिलें । 
साधुसंतीं हेंचि सांगितलें । सर्व जनांसि ॥१॥

धन्य धन्य आत्मबोध । ऐकतां होय ब्रह्मानंद । 
येथे गांवसेवेची ब्याद । कासयासि सांगावी ? ॥२॥

ऐसी श्रोत्यांची धारणा । ऐका आता समाधाना । 
एकाग्र करोनिया मना । सर्व जनहो ! ॥३॥

माझ्या जिवींचें मनोगत । मी सांगतों आता सत्य । 
ग्रामगीतेचा मतितार्थ । यांतचि आहे सर्वहि ॥४॥

माझाच नव्हे हा विचार । सर्व संतग्रंथांचा सार । 
महात्म्यांची तळमळ अपार । तेंच वर्म कथितों मी ॥५॥

आपण त्यांचे वाचता ग्रंथ । आत्मबोध ऐकता सतत । 
परंतु त्यांचें काय हृदगत । दुर्लक्ष झालें तयाकडे ॥६॥

जगीं ज्यांनी घेतला स्वानुभव । ज्यांनी जाणलें मूळतत्त्व । 
त्या सर्वांचा एकचि भाव । व्हावेत सर्व लोक सुखी ॥७॥

अवघाचि संसार व्हावा सुखी । मंगलता निघो सर्वांमुखीं । 
खळदुर्जनांचीहि दृष्टि निकी । व्हावी सर्वथा ॥८॥

मित्रता नांदावी सर्वजनीं । उणीव न दिसावी कोठे कोणी । 
जी जी इच्छा करिती प्राणी । व्हावी पूर्ण ती न्यायें ॥९॥

नको कोठेहि द्वेषवैर । न उरो कोठे हाहा:कार । 
दंभ मत्सर अत्याचार । अनाचार न राहो ॥१०॥

लया जावो जगाचा भेद । परस्परपोषक होवोत वाद । 
नांदो आनंदी आनंद । सगळीकडे सर्वदा ॥११॥

हीच तळमळ रात्रंदिनीं । सारखी होती तयांचें मनीं । 
जगीं जे झाले थोर कोणी । महापुरुष कोठेहि ॥१२॥

त्यांनी कथिलें आत्मज्ञान । तेंहि सुखी कराया जन । 
आत्मवत जाणावें सर्वांसि म्हणोन । प्रत्येकाने ॥१३॥

त्यांनी वर्णिलें ईश्वर-भजन । तेंहि शुध्द व्हावया मन ।
पाहावीं देवाचीं लेकरें समान । म्हणोनिया ॥१४॥

त्यांनी कथिलें त्यागवैराग्य । तेंहि जग न मानतां भोग्य ।
निष्काम सेवेने पावावें भाग्य । याचसाठी ॥१५॥

भूतदया परोपकार । दानधर्म यज्ञादि अपार ।
याद्वारें दु:खितांसि आणावें वर । अधिक तें तें देवोनि ॥१६॥

करावी समाजीं समानता । म्हणोनीच हीं साधनें तत्त्वता ।
तीर्थादिद्वारें सामुदायिकता । शिकविली साधुसंतांनी ॥१७॥

एकमेकांमुखीं काला द्यावा । समानभावें भात खावा ।
सोनें वाटोनि स्नेह वाढवावा । ऐशा प्रथा कितीतरी ॥१८॥

सर्वांमाजीं एकचि भाव । आकुंचित न व्हावा मानव ।
सामुदायिक वृत्तीने करावें सर्व । विश्वचि सुखी ॥१९॥

सर्व मिळोनि एकत्वें रहावें । सर्वांनी सर्वांस चालवावें ।
सर्व भूत-हितीं रत व्हावें । ऐसेंचि वचन गीतेचें ॥२०॥

वेदापासूनि हाच घोष । समानसुखें नांदावा मानववंश ।
सर्व धर्मांचा हाच उद्देश । जिव्हाळयाचा ॥२१॥

परंतु हें सारें पडलें पचनीं । मानव राहिला मागासलेपणीं ।
करमणूक झाली संत-वाणी । उच्च ज्ञानाची ॥२२॥

एक एकाचे घेवोनि शब्द । करिती चर्चा वितंडवाद ।
जीवनीं उतरायाचा बोध । त्यासि नाही ठाव कोठे ॥२३॥

संतांनी कथिलें ब्रह्मज्ञान । विशाल व्हाया मानवी मन ।
सर्वांनी राहाया समान । परस्पर-सहकार्यें ॥२४॥

परि तें राहिलें नुसतें मुखीं । स्वार्थाचीच वाढली शेखी ।
आपुला शेजारी मरो दु:खीं । नाही चिंता आज कोणा ॥२५॥

चर्चेसाठी तत्त्वज्ञान । आणि चैनीसाठी जीवन ।
ऐसें घेतलें भिन्नपण । मानवांनी वाउगें ॥२६॥

तेणें संतऋषींचा हेतु । ग्रासूनि गेला राहूकेतु ।
राम गेला बांधूनि सेतु । गोटे राहिले जैसे-तैसे ॥२७॥

त्यांना सांगावी संत-कहाणी । हाडें दिलीं दधीचींनी ।
जनसेवेसाठी ऋषिमुनि । रात्रंदिवस कष्टले ॥२८॥

दामाजींनी सुखविलें जना । त्यांतचि तृप्ति नारायणा । 
संत दादू करी पिंजणा । सेवाभावें ॥२९॥

हातीं घेवोनि तूपवाटी । नामदेव लागे श्वानापाठीं । 
संतोषवी जगीं जगजेठी । कपडे शिवोनि ॥३०॥

सावतोबांनी शेत पिकविलें । चोखोबांनी गांव झाडलें । 
लोकसेवेचें महत्व कथिलें । सर्व संतांनी ॥३१॥

कबिरांनी विणले शेले । जातिधर्मादि भेद निरसले । 
हें सर्व जरी सांगितले । तरी जाग नये त्यांसि ॥३२॥

ते म्हणती हें साधूंकरितां । आम्ही प्रापंचिक सर्वथा । 
आम्हां पाप्यांसि त्या कथा । ऐकल्याने पुण्य लाभे ॥३३॥

आम्ही सकळांसाठी जन्मलों । सर्व मिळोनि राहाया आलों । 
परस्परांशीं पाहिजे पूरक झालों । हें न कळे तयां ॥३४॥

तेणें ग्राम झालें कुग्राम । नाही परस्परांशीं निर्मल प्रेम । 
सर्वांचे स्वार्थ वाढले बेफाम । आपुल्याचि व्यक्तित्वाचे ॥३५॥

एक लाडू करोनि खातो । तेथेचि दुजा उपाशी राहतो । 
हें आम्ही गांवोगांवीं पाहतों । मानती भूषण ते त्यासि ॥३६॥

एक हौसेने महाल करी । दुजास राहे घर कौलारी । 
तिजास कुडाचीहि झोपडी बरी । पाहतां दिसेना ॥३७॥

एकास नाही जराहि वाव । एकास उधळपट्टीची हाव ।
एक बसोनि भोगी वैभव । कष्ट करोनि दु:खी एक ॥३८॥

सदा एक-दुसर्‍यासि जळती । एक-दुजाचें वाभाडें काढिती ।
किंवा नशिबावरि हात ठेविती । हांक देती देवासि ॥३९॥

कैसा होईल यांचा मिलाप ? कशाने फळेल संतसंकल्प ? 
कैसियाने होईल विश्वरूप । सुखी हें सारें ? ॥४०॥

यासाठी अनेक महात्मे झटले । परि जगाचें दु:ख नाही मिटलें । 
उपदेश त्यांचे नाही उतरले । लोकजीवनीं म्हणोनिया ॥४१॥

यासाठी शोधिला पाहिजे उपाय । जेणें जगीं सुखशांति राहे ।
महापुरुषांचें समाधान होय । विचारूं तैसें ॥४२॥

ऐसे संकल्प उठतां । लागलों कराया विचार तत्त्वता । 
सापडला मार्ग निर्मळ हातां । ग्रामकुटुंबयोजनेचा ॥४३॥

उपदेश सुधारी कांही लोकां । परि समाजरचना देई धोका । 
तेणें आणतां नये अनेकां । प्रत्यक्षांत संतबोध ॥४४॥

म्हणोनि समाज-रचना बदलावीं । संतबोधावरि मांडणी करावी । 
ब्रम्हज्ञानासि सक्रियता द्यावी । समत्व आणोनि जीवनीं ॥४५॥

देव एक असोनि अनंत झाला । नाना रूपें धरोनि नटला । 
परि तो पाहतां एकचि दिसला । तैसें व्हावें जनलोकीं ॥४६॥

एकाचें सुखदु:ख सर्वांसि । सर्वांचा उपयोग एकासि ।
घटकासि आणि विश्वासि । सांगड व्हावी सर्वथा ॥४७॥

सर्व विश्वचि माझें घर । ऐसें बोलिले संत ज्ञानेश्वर । 
त्याचें प्रात्यक्षिक हें सुंदर । करावें ग्राम आपुलें ॥४८॥

गांवाची करावी आदर्श व्यवस्था । म्हणोनि कथिली ग्रामगीता । 
ग्रामापासोनि पुढे वाढतां । विश्वव्यापी व्हावें ॥४९॥

जेथे गांवाचाच न कळे धर्म । तेथे विश्वधर्माचें कैचें वर्म ? 
हेंचि कळावया साधन सुगम । धरिलें गांवाचें ॥५०॥

मनुष्य ग्रामाचा संरक्षक । ग्राम देशासि पोषक । 
देश विश्वाचा घटक । ऐसें व्हावें यथार्थ ॥५१॥

मनुष्याचें सर्वस्व ग्राम आहे । त्याविण त्याला अस्तित्व नोहे ।
ग्राम सर्वांगपूर्ण राहे । तरीच वैभव मानवाचें ॥५२॥

गांवीं एकाने माडी बांधली । सर्व घरें मोडून पडलीं । 
याने आमुची कीर्ति वाढली हें समजणें वेडेपणाचें ॥५३॥

खरा स्वार्थ तोचि करी । ज्याचा व्यवहार समाजा उध्दरी । 
नाही भिन्नत्वाची उरी । जयामाजीं ॥५४॥

नाहीतरि उलट घडे । ऐसे चालत आले पोवाडे । 
श्रीमंत-गरीब हे आकडे । पुसले पाहिजेत या पुढती ॥५५॥

आपुला स्वार्थचि धरिला उरीं । पर्वा इतरांची न केली जरि । 
तेणें आपणांसहि शांति संसारीं । न साधेल कधी ॥५६॥

म्हणोनि ज्यासि दूरदृष्टि आली । त्याने हीच ठेवावी बोली । 
देवाने ही दुनिया निर्मिली । सकळांसाठी ॥५७॥

हीच खरी विकासाची वाणी । जाणेल तोचि खरा ज्ञानी । 
अभ्यास करावा सर्व लोकांनी । आतातरी ॥५८॥

हा अभ्यास नको शाब्दिक । बौध्दिक अथवा केवळ तात्त्विक । 
जीवनचि करा सामुदायिक । ग्राम-जन हो ! ॥५९॥

त्यानेच साधेल संत-उद्देश । ईश्वरी संकल्प येईल फळास । 
व्यवहारीं लाभेल ब्रह्मरस । सर्व गांवासि ॥६०॥

यावरि श्रोतीं विचारिलें । आपण सामुदायिकत्व सुचविलें । 
परि त्याचें स्वरूप कळलें । नाही आम्हां ॥६१॥

तेंचि ऐका सविस्तर । परमार्थमय हा व्यवहार । 
जेणें गांवीं वैकुंठपूर । नांदूं लागे सहजचि ॥६२॥

शक्ति, बुध्दि, सत्ता, धन । आज ज्याच्या जें स्वाधीन । 
तो त्या त्या साधनें स्वार्थ साधून । लुटतो गांवा ॥६३॥

पाहती आपापल्या पुरतें । लाभ इच्छिती आइते । 
इतर मेलियाची तेथे । पर्वा नाही कोणासि ॥६४॥

हें आकुंचितपण बाधक । पोसाया आपुले कुटुंबीय लोक । 
इतरांसि मागाया लावित भीक । नाना मार्गें ॥६५॥

म्हणोनि स्वरूप द्यावें सामुदायिक । सर्व गांवचि कुटुंब एक ।
श्रमती खाती सर्वचि लोक । ऐसें दृश्य दिसावें ॥६६॥

गांवीं जेवढी शक्ति बुध्दि । तो सर्व गांवाचाचि निधि । 
ऐसें होतां आधिव्याधि । नष्ट होतील सर्वचि ॥६७॥

आज मजुरां नाही शास्त्रीय ज्ञान । शास्त्रज्ञाअंगीं श्रमाची वाण । 
तेणें वाढेल कैसें उत्पन्न । गांवाचें आमुच्या ? ॥६८॥

श्रम करितील सर्व मिळून । तरि पिकूं लागेल बरड जमीन । 
मार्ग काढतील बुध्दिमान । नव्या नव्या शोधांनी ॥६९॥

सामुदायिक प्रयत्नांनी । सामर्थ्य वाढेल कणोकणीं । 
जेथे नसे घोटभर पाणी । तेथे सरिता वाहूं लागे ॥७०॥

स्वच्छ पाण्याचें भरेल तळें । विहिरी, जागोजागीं मळे । 
नदीचे प्रवाह होतील सगळे । शेतीसाठी उपयोगी ॥७१॥

नदी सागरीं मिळावी । तिची अपार शक्ति व्यर्थचि जावी । 
ऐसी ईश्वरी इच्छाचि नसावी । उपयोगी यावी सर्वांच्या ॥७२॥

तैसीच मानवी शक्तिबुध्दि । स्वार्थींच वाया न जावी कधी । 
गांवीं नांदवाव्या ऋध्दिसिध्दी । नाना प्रयत्नें ॥७३॥

आमुचें गांवचि आमुचें घर । सर्व व्यवहार सगळयांवर । 
सर्वांचा सर्वांठायीं हातभार । असलाचि पाहिजे ॥७४॥

बुध्दिकाम, देहपरिश्रम । कलाकाम, कौशल्यौद्यम । 
ज्याचें असेल जें जें कर्म । तें तें वाहावें समाजा ॥७५॥

कोणी द्यावा आपुला धंदा । कोणी द्यावी सर्व संपदा । 
कोणी नोकरीचा पगार सर्वदा । समर्पावा या योजनेसि ॥७६॥

त्यांत असावे चांभार-कुंभार । त्यांत असावे सुतार-बेलदार । 
शिक्षक, शिंपी, लोहार, कलाकार । दाई, सेविका सर्वचि ॥७७॥

शेती उत्तम कसणारे । शेतीची योजना जमविणारे । 
वैद्य, कोष्टी, विणणारे- । कापड, साडया, सतरंज्या ॥७८॥

अजूनीहि जे गांवीं असती । त्यांची पाहिजे अधिक भरती । 
त्या सर्वांची शक्तियुक्ति । संघटित व्हावी गांव-सेवे ॥७९॥

धन द्यावें धनवानांनी । भूमि द्यावी जमीनदारांनी । 
श्रम द्यावेत मजुरांनी । सर्वतोपरीं आपुले ॥८०॥

बुध्दि द्यावी बुध्दिवंतांनी । कला द्यावी कलावंतांनी । 
सेवा करावी वैद्य-डॉक्टरांनी । आळसी कोणीं नसावें ॥८१॥

सर्व लोकांनी झीज सोसावी । गांवसोयीसाठी जागाहि द्यावी । 
गरीबांचीं घरें दुरुस्त करावीं । गांव-खर्चाने ॥८२॥

देवळांच्या जमिनी, पडीत खंडारें । वाटोनि द्यावें गरीबां सारें । 
व्यवस्था ठेवावी उत्तम प्रकारें । सर्वांच्याच जीवनाची ॥८३॥

सर्वांनी समयदान करावें । घरें, रस्तेहि सजवोनि द्यावे । 
गांव नंदनवन बनवावें । सामुदायिक कष्टांनी ॥८४॥

कोणी नसावा गांवीं उपाशी । उद्योग द्यावे सकळ जनांसि । 
भीक मागण्याची प्रथा जराशी । नसावी गांवीं आमुच्या ॥८५॥

असो पुजारी वा पंडित । कामें करील जो उचित । 
तोचि राहील या गांवांत । सर्वानुमतें सांगावें ॥८६॥

सर्वांनी सारखेंच काम करावें । आपुलाल्या कलेने बरवें । 
कष्टाविण कुणाला पोसावें । ऐसें नाही ॥८७॥

कष्ट करोनि वृध्द झाला । काम बदलोनि द्यावें त्याला । 
अथवा कोणी बिमार पडला । तरीच पोसावें सर्वांनी ॥८८॥

असो साधु भक्त विद्वान । त्यांनीहि न खावें कष्टाविण । 
उलट आदर्श दावावा झटून । सर्व लोकांसि ॥८९॥

मुखें भजावें गोविंदा । हातें करावा कामधंदा । 
प्रेम ठेवावें सदासर्वदा । सर्वेश्वराठायीं ॥९०॥

आपुलालें काम करावें । सर्व लोकांशीं इमानदार व्हावें । 
घेणें देणें सर्वचि करावें । प्रांजळ बुध्दि धरोनि ॥९१॥

जैसा गोरा कुंभार मडकीं करी । नित्य उच्चारी हरिहरि । 
परि मडकियांत बैमानी धरी । ऐसें कल्पान्तीं घडेना ॥९२॥

जनाबाई संत झाली । परि गोवर्‍या वेचणें नाही भुलली । 
तैसीच चोख्याने भक्ति केली । ढोरें ओढतां ग्रामाची ॥९३॥

खरा नाथ भक्तिवान । देई मागासल्यांना ज्ञान । 
खाऊं घाली पितरांचें अन्न । कष्टकर्त्या दीनजना ॥९४॥

एका पैचा न चुको हिशेब । म्हणोनि जागे, नसोनि लोभ । 
संतोषला पद्मनाभ । पाणी पाजतां गाढवासि ॥९५॥

हेचि त्यांची खरी भक्ति । स्वयें बोलला जगत्पति । 
नाचे सावत्याच्या मळयाप्रति । नेटकें काम बघोनि ॥९६॥

ऐसें घडलें पाहिजे साचें । काम करोनि ग्रामाचें । 
त्यांत ठेवावें भक्तिरसाचें । हृदय आपुलें ॥९७॥

जे जे गांवीं भिन्न उद्योग । त्यांचा जुळवावा संयोग । 
ठराविक जागीं नाना प्रयोग । चालवावे गांवांत ॥९८॥

आपल्या कामाचा ठरला वेळ । सर्वांनी झटावें लावोनि बळ । 
चिंता करूं नये वेडगळ । भलतियाचि ॥९९॥

जो जो असे आपुला धंदा । तल्लीन राहावें कामांतचि सदा ।
ठरल्या वेळीं व्यवसायाबंधा । सोडूनि द्यावें सर्वांनी ॥१००॥

नियमित वेळीं काम करावें । नियमितपणें खेळ खेळावे । 
नियमित समयीं प्रार्थने जावें । सर्व मिळोनि ॥१०१॥

एरव्ही सामुदायिक जीवन । हेचि प्रार्थना असे महान । 
गांवासाठी कष्टावें पूर्ण । सेवाभावाने ॥१०२॥

काय नाही आपल्या गांवीं । याची चौकशी असावी । 
नसेल ती साजवावी । पुष्पवाटिका ग्रामासि ॥१०३॥

गांव-जीवनासि जें आवश्यक । त्याची मागावी नलगे भीक । 
ऐसें सर्वांनी श्रमोनि करावें ठीक । जीवन सारें ॥१०४॥

कोणी गांवास्तव जोडे शिवी । कोणी कपडे शिवोनि पाठवी ।
कोणी लोखंडी कामेंहि बरवीं । पाठवी वस्तुभांडारीं ॥१०५॥

कोणी कपडा विणूनि आणावा । कोणी नवारी, दोर द्यावा । 
लाकडी कामें करोनि बरवा । आणतो कोणी ॥१०६॥

कोणी महिनोगणती शेती करी । हंगाम होतां आणी दरबारीं । 
प्रत्येक ऋतूचि तुरी-बाजरी । तांदूळ आदि सामुग्री ॥१०७॥

धान्य उपजवावें सर्वतोपरीं । जें जें लागे गांवीं घरीं । 
दुसरीकडोनि न घ्यावी माधुकरी । हेंचि उत्तम ॥१०८॥

जें जें आपुल्या गांवीं होतें । आपणचि वापरावें सामान तें । 
उरलेलें विकावें भोवतें । भिन्न गांवीं ॥१०९॥

सर्व गांवाचें एक दुकान । सर्वांच्या सहकार्याचें प्रदर्शन । 
फायदा झालियाचें धन । सर्वांच्याचि मालकीचें ॥११०॥

सर्वचि धन हें सर्वांचें । हे उद्योगहि सकळिकांचे । 
हें भुवन प्रत्येकाचें । ग्रामचि आहे ॥१११॥

म्हणोनि सर्व एकत्र करावें । ज्याचें काम त्याला द्यावें । 
उणें असता अधिक मागावें । जास्त द्यावें खजिन्यामाजीं ॥११२॥

अहो ! पैशांचें तोंड काळें । सर्व आपुल्याच गांवीं मिळे । 
न मिळतां प्रयत्नबळें । तैसें करूं ग्राम आमुचें ॥११३॥

आमुच्या गांवींचें सर्व धन । ग्रामवासियांचें सुखस्थान । 
आम्ही सर्वचि मिळोन । करूं स्वर्ग गांवासि ॥११४॥

याहीवरि उणें पडे । तरि मागूं देश-पित्याकडे । 
पूर्ण कराया पोवाडे । गांवाचे आमुच्या ॥११५॥

ग्रामों जरि अधिक उरे । तरि देऊं परगांवीं संतोषभरें । 
यांत तिळभरि अंतर न शिरे । कल्पान्तींहि ॥११६॥

आधी ग्राम असावें सुखी । कोणी न व्हावीं कोणाशीं पारखीं । 
सर्व कामें गांवींच निकीं । करूं आम्ही ॥११७॥

याच दृष्टीला धरोन नामी । व्याप्ति करूं विश्वाची आम्ही । 
लावावया मानवता कामीं । सकळिकांची ॥११८॥

ज्या ज्या मार्गें ऐसें घडे । तोचि धर्म तेंचि ज्ञान रोकडें । 
तुकडया म्हणे समाधान जोडे । सकळ जनांसि ॥११९॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
सामुदायिक जीवन कथित । अडतिसावा अध्याय संपूर्ण ॥१२०॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥