ग्रामगीता
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
’अनुभव’ ऐसा शब्द ऐकला । त्यावरि श्रोत्यांनी प्रश्न पुसला ।
आत्मानुभवाचा मार्ग सांगितला । पाहिजे आम्हां ॥१॥
केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ?
मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश ।
करणी करितां विवेकें पूर्ण । नरचि होय नारायण ।
ज्यासि करूं आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति ।
आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार ।
बुडतें जग त्यासि जागवी । संकटें स्फूर्ति देती नवी ।
मनीं आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ ।
सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय ।
आपुल्या अंगीं प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला ।
मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरीं ।
हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगींच देवपण ।
तुम्हीं विचारिलें माझें जीवन । म्हणोनि करितों थोडे कथन ।
हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी ।
देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडलें मलीन ।
ऐसीं साधनें निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र ।
या उन्नतिमार्गी जो लागला । विवेकें अंतरीं जागला ।
हें प्रयत्नाचें शुध्द महिमान । ऐकोनि मींहि केलें साधन ।
लहान ऐशा गांवामाजीं । मागासलेल्या जनसमाजीं ।
घरीं दारिद्रयाचें वरदान । परि भावभक्तीची नसे वाण ।
अंतरीं जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचें रूप ।
ऐकिलें श्रवणीं थोडें कीर्तन । त्यावेळीं होतें आर्तपण ।
कांही ऐकिली संतचर्चा । कांही कथां ऐंकिल्या पुरानीच्या ।
झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्तीं मुद्राध्यान ।
महत्त्वाचेम सांगावें वाटतें । साधकाला मिळेल आइते ।
कांही संगतीचें लाभलें फळ । आलें आत्मचिंतनासि बळ ।
पुढे कल्पना सरसावली । धृवानेच कां तपस्या केली ?
काय करावें वाटे मनीं । कैसें ध्यान करावें नेत्र लावोनि ।
मग बळेंचि रानीं जावें । वृक्षाखाली ध्यान धरावें ।
कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रें पूजावी ती ।
ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय ।
परि झालें नाही समाधान । चित्त उडे मधून मधून ।
आपणचि मना समजावावें । आपणचि समाधान मानावें ।
परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे ।
म्हणोनि निघालों घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन ।
राहिलों वनीं, घोर रानीं । रानवट लोकीं, धनिकाभुवनीं ।
कांही योगाचें साधन । थोडें अध्यात्म-वाचन ।
भजन, सप्ताह, यज्ञयाग । महोत्सव, व्रतें, महाप्रसंग ।
केलें बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन ।
नाना मंदिरें, देवालयें । संस्था, आश्रम, वाचनालयें ।
भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची ।
पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचे, संन्याशांचे ।
प्रवास केला बैलगाडीचा । घोडे, टांगे, हत्ती-अंबारीचा ।
पाहिले सागर, भव्य स्थानें । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रि, रानें ।
निसर्गाचीं दृश्यें अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव ।
हें सर्वकांही पाहूनि पूर्ण । नाहीच झालें शांत मन ।
बहिर्मुख दृष्टीने पाहतां । समाधान न लागे हातां ।
विश्व कोण मी कोण ? यांचें मुळांत एकपण ।
एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरीं बर्फ-तुकडयांसमान ।
मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचें हें विशालपण ।
मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालों सावकाश ।
वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ?
मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत ।
अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार ।
माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटीं ।
ब्रह्म म्हणती सर्वांत मोठें । परि ही भाषा परकी वाटे ।
प्रथम गांव-मंदिर मोठें वाटलें । मग तीर्थाटन मोठें झालें ।
परि त्याच्या मुळाचा अनुभव घेतां । मोठा कळलाच नाही कोणता ।
मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि ।
तेथेचि झालें पूर्ण साधन । मग दिसों लागलें एकचिपण ।
भिकारी आणि धनवान । हे तों संकुचित भावें दोन ।
नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद ।
जन्मणें मरणें झाला खेळ । सुखदु:ख सर्व झालें शीतळ ।
आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपें व्यापला ।
यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यांतूनि आसक्तीचा उच्छेद ।
नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा ।
हें सर्व कासयाने झालें ? यासाठी काय साधन केलें ?
हें आठवतां भान येतें । साक्षित्वरूपें पाहतां कळतें ।
बुध्दीसि स्वातंत्र्य दिलें । जैसें जें दिसलें तें विचारिलें ।
आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावें भिन्नपण ?
ऐसा जीवेंचि मंत्र धरिला । न कळे कोणीं वरदहस्त ठेविला ।
बहिरंग बोध नाही केला । स्वयेंचि श्रध्दाभावें घेतला ।
परि अंतरीं कळलें मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम ।
हें कळावयासि संगति लागे । संगतियोगें भावना जागे ।
मग जें जें मागे पाहिलें । तें तें सर्व सहज झालें ।
स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति ।
अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण ।
परि हें प्रथम कळलें नव्हतें । म्हणोनि धुंडिलें स्थानमानातें ।
जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली ।
राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी ।
आपुला आनंद पैसावला । सुखवूं पाहे दु:खिताला ।
परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेंत विरूं लागली ।
मग माघारलीं पूजामंदिरें । दिसूं लागलीं जिवंत शरीरें ।
जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासें- ।
जंव अंतरीं आत्मा कळला । तंव आपल्यांतचि विश्व पाहों लागला ।
मग अनंत उदरें अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त ।
ही दृष्टि सर्वांसचि आहे । परि विचारें उघडील तोचि पाहे ।
जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे ।
नुरे जीवाचें जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण ।
मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ ।
जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता ।
त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा ।
तो जें करी तें ईश्वरपूजन । बोलेल तेंचि वेदवचन ।
सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता ।
त्याच्या संदेशाचें बळ । गांवीं करी प्रेमाचा सुकाळ ।
त्याच्या ज्ञानें भारले अज्ञजन । ते ज्ञानियांसि देतील शिकवण ।
हें आत्मविकासाचें बळ । मानवी प्रयत्नाचेंचि फळ ।
मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरीं ।
लाभतां अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन ।
तो प्रलोभनीं कोठे फसेना । रागद्वेषेंहि गोंधळेना ।
ऐसा सेवकचि पाया जगाचा । गांवचा रत्ननिधिच तो साचा ।
प्रयत्नें मानव होई देव । प्रयत्नें स्वर्गतुल्य होई गांव ।
ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवें ।
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत ।
केले प्रयत्न तुम्हीं कोण ? कैसें गेलें तुमचें जीवन ?
खरी आत्मानुभवाची खूण । काय आहे ? ॥२॥
मित्रांनो ! ऐका सावकाश । प्रत्येक जीव देवाचा अंश ।
आपुल्या कर्तव्यें पद त्यास । प्राप्त होय हवें तें ॥३॥
करणी करितां विवेकें पूर्ण । नरचि होय नारायण ।
प्रारब्ध आणि परिस्थिति जाण । वाट देई तयासि ॥४॥
ज्यासि करूं आवडे उन्नति । निसर्ग होई ग्रंथ त्याप्रति ।
साधन होई एकेक वृत्ति । जाणत्यासि ॥५॥
आधि पाहिजे सुंसंस्कार । पुढे जाण्याचा निर्धार ।
संत, ग्रंथ काय, अवघाचि संसार । सहायक होई तयासि ॥६॥
बुडतें जग त्यासि जागवी । संकटें स्फूर्ति देती नवी ।
अघातांतूनि हितचि भावी । साधक तो ॥७॥
मनीं आत्मोन्नतीची तळमळ । त्यासि वाट देती सकळ ।
आपुलें आपणांतचि बळ । पाहिजे आधी ॥८॥
सत्य संकल्पाचा निश्चय । लावी जीवनासि सोय ।
वाट चालतां निर्भय । मुक्काम पावे ठायींच ॥९॥
आपुल्या अंगीं प्रकाश भरला । तो पाषाणचि हिरा ठरला ।
खाणींत शोधूनि आणिती त्याला । प्रयत्नें जन ॥१०॥
मृगनाभीची कस्तुरी । ती स्थान पावे राज-शिरीं ।
कमल चढे देवावरि । चिखलीं जन्मूनि स्वगुणांनी ॥११॥
हाचि अनुभव प्रमाण । यत्नाअंगींच देवपण ।
हें संतग्रंथांचें सत्यचि कथन । जाणावें श्रोतीं ॥१२॥
तुम्हीं विचारिलें माझें जीवन । म्हणोनि करितों थोडे कथन ।
जनासह आपण जनार्दन । हीच खूण अनुभवाची ॥१३॥
हीच अनुभवावयासाठी । सर्व कराव्या आटाआटी ।
ऐसेंचि प्रत्यया येई शेवटीं । साधकाच्या ॥१४॥
देवत्वाची ज्योत दीप्तिमान । परि आवरण पडलें मलीन ।
तें साफ करावयासीच प्रयत्न । म्हणती साधन त्यालागी ॥१५॥
ऐसीं साधनें निमित्तमात्र । स्वरूप एकचि असे सर्वत्र ।
तें अनुभवा आणी वृत्ति पवित्र । हेंच सूत्र उन्नतीचें ॥१६॥
या उन्नतिमार्गी जो लागला । विवेकें अंतरीं जागला ।
तो स्वयें उध्दरोनि गेला । तारक झाला जनांसि ॥१७॥
हें प्रयत्नाचें शुध्द महिमान । ऐकोनि मींहि केलें साधन ।
तें कळाया करितों वर्णन । थोडकेपण आयुष्याचे ॥१८॥
लहान ऐशा गांवामाजीं । मागासलेल्या जनसमाजीं ।
उपासाचीच लाभे रोजीं । ऐशा ठायीं जन्मलों ॥१९॥
घरीं दारिद्रयाचें वरदान । परि भावभक्तीची नसे वाण ।
ऐकत सुसंस्कारांचें गान । सोशीत कष्ट वाढलों ॥२०॥
अंतरीं जिज्ञासा असे खूप । ती घरी हूडपणाचें रूप ।
अल्लडपणें साहोनि ताप । सर्वांमाजी वावरलों ॥२१॥
ऐकिलें श्रवणीं थोडें कीर्तन । त्यावेळीं होतें आर्तपण ।
धृवप्रल्हादाचें आख्यान । मना वाटे ऐकावें ॥२२॥
कांही ऐकिली संतचर्चा । कांही कथां ऐंकिल्या पुरानीच्या ।
कांही वाढविल्या भावना मनाच्या । वैराग्ययोगें ॥२३॥
झाली परिस्थितीहि कारण । धरावया एकान्तीं मुद्राध्यान ।
तें सर्व केलिया कथन । वेळ पुरेना वर्षाचा ॥२४॥
महत्त्वाचेम सांगावें वाटतें । साधकाला मिळेल आइते ।
आत्मानात्म-विचार येथे । श्रोते ऐकती म्हणोनि ॥२५॥
कांही संगतीचें लाभलें फळ । आलें आत्मचिंतनासि बळ ।
देवदर्शनाची खळबळ । झाली हृदयीं दृढ ऐसी ॥२६॥
पुढे कल्पना सरसावली । धृवानेच कां तपस्या केली ?
आपणासहि कां न घडली । पाहिजे तैसी ? ॥२७॥
काय करावें वाटे मनीं । कैसें ध्यान करावें नेत्र लावोनि ।
कोणा विचारावें, समाधानी । वृत्ति व्हाया जीवाची ? ॥२८॥
मग बळेंचि रानीं जावें । वृक्षाखाली ध्यान धरावें ।
कधी मूर्तिपूजनचि करावें । मंदिरामाजीं ॥२९॥
कधी रेणुकांची करावी मूर्ति । वनपुष्पपत्रें पूजावी ती ।
भजन करावें अहोरातीं । तन्मय चित्त करोनिया ॥३०॥
ऐसा वाढला प्रेमनिश्चय । मानसिक संकल्पांचा समुच्चय ।
धरिली ध्यान-मुद्रेची सोय । एकांतामाजीं ॥३१॥
परि झालें नाही समाधान । चित्त उडे मधून मधून ।
तशांतचि करावें कीर्तन । तळमळोनि ॥३२॥
आपणचि मना समजावावें । आपणचि समाधान मानावें ।
गावें नाचावें बोलत जावें । आपल्याशींच एकान्तीं ॥३३॥
परि प्रारब्धभोग आडवा पडे । विषयांकडे वृत्ति ओढे ।
कधी दुष्परिणाम घडे । देह-धारणेने ॥३४॥
म्हणोनि निघालों घर सोडून । बावळट ऐसा वेष घेऊन ।
कधी कधी विसरों देहभान । चिंतेंत देवदर्शनाच्या ॥३५॥
राहिलों वनीं, घोर रानीं । रानवट लोकीं, धनिकाभुवनीं ।
अनेक अनुभव आले जीवनीं । स्फुरले मनीं सदभाव ॥३६॥
कांही योगाचें साधन । थोडें अध्यात्म-वाचन ।
विशेष विश्वनिरीक्षण । केलें मनन सर्वकाळ ॥३७॥
भजन, सप्ताह, यज्ञयाग । महोत्सव, व्रतें, महाप्रसंग ।
नाना कार्यें, साधनप्रयोग । असंख्य केले ॥३८॥
केलें बहुत पर्यटन । वनभ्रमण तीर्थाटन ।
पाहिले सर्व प्रांत फिरून । आयुष्यांत ॥३९॥
नाना मंदिरें, देवालयें । संस्था, आश्रम, वाचनालयें ।
दरीं कंदरीं होऊनि निर्भय । पाहिलीं स्थानें ॥४०॥
भेट घेतली वरिष्ठांची । पाहिली भिन्नता रीतिरिवाजांची ।
रुचि घेतली खाण्यापिण्याची । देशीं-भेंषीं ॥४१॥
पाहिले अखाडे साधुजनांचे । गोसाव्यांचे, संन्याशांचे ।
वैराग्यांचे, महानुभवांचें । वारकर्यांसहित ॥४२॥
प्रवास केला बैलगाडीचा । घोडे, टांगे, हत्ती-अंबारीचा ।
सायकल, मोटार, विमानाचा । सर्वकाही ॥४३॥
पाहिले सागर, भव्य स्थानें । सातपुडा सह्याद्रि विंध्याद्रि, रानें ।
हिमालयासहित अति उंचपणें । गगनभेदी ॥४४॥
निसर्गाचीं दृश्यें अपूर्व । मानवकृत चमत्कार-वैभव ।
सुखसाधनें ज्ञानसाधनें सर्व । पाहिलीं लोकीं ॥४५॥
हें सर्वकांही पाहूनि पूर्ण । नाहीच झालें शांत मन ।
शेवटीं घ्यावा लागला अनुभव जाण । आपणामाजीं ॥४६॥
बहिर्मुख दृष्टीने पाहतां । समाधान न लागे हातां ।
हीच असे अनात्मता । दु:खदायी सर्वांसि ॥४७॥
विश्व कोण मी कोण ? यांचें मुळांत एकपण ।
तें जाणतां विचारें पूर्ण । अंतर्मुख वृत्ति होय ॥४८॥
एकचि तत्त्व चैतन्यघन । सागरीं बर्फ-तुकडयांसमान ।
त्यावरि सजलें विविधपण । हीच खूण अनुभवाची ॥४९॥
मीच आहे सकळांस कारण । माझ्याच आत्म्याचें हें विशालपण ।
ओळखी होतां कळलें पूर्ण । अद्वैतपण सर्वांचें ॥५०॥
मग मुरली पाहण्याची हौस । निवांत झालों सावकाश ।
जें जें दिसे या दृष्टीस । तें तें भासे आपणचि ॥५१॥
वाटे सर्वचि येथे आमचे । भिन्न कोण निवडायाचे ?
हर्ष न समाये, मनाचें । मोठेपणीं आतलाचि ॥५२॥
मुंगी आणि ऐरावत । अणुरेणु आणि मेरूपर्वत ।
सर्व माझेचि संकल्प मूर्त । कळों आलें ॥५३॥
अजूनि कितीतरी आत्मा थोर । न चाले मोजमाप अनिवार ।
अनंत ब्रह्मांडें विश्वाकार । संचले असती ॥५४॥
माया, ईश्वर, ब्रह्म, सृष्टि । सर्व आत्मरूपाचिया पोटीं ।
पोटपाठहि नाही शेवटीं । तेंचि तत्त्व मी ॥५५॥
ब्रह्म म्हणती सर्वांत मोठें । परि ही भाषा परकी वाटे ।
अनुभव घेतां वेगळें न भेटे । ब्रह्मपण आटे आपणांत ॥५६॥
प्रथम गांव-मंदिर मोठें वाटलें । मग तीर्थाटन मोठें झालें ।
आणि पुढे निसर्गरूप दिसूं लागलें । मोठें मोठें ॥५७॥
परि त्याच्या मुळाचा अनुभव घेतां । मोठा कळलाच नाही कोणता ।
हा आत्म्याचा विलासचि तत्त्वता । अनुभवा आला ॥५८॥
मोठा तो पंचतत्त्वादि भेदोनि । लहान तोचि अणुरेणूहूनि ।
पाहतां पाहणें दुरी सारोनि । कळला एकपणीं जवळचि तो ॥५९॥
तेथेचि झालें पूर्ण साधन । मग दिसों लागलें एकचिपण ।
सुखदु:ख आणि जन्ममरण । सारिखेंचि ॥६०॥
भिकारी आणि धनवान । हे तों संकुचित भावें दोन ।
विकास होतां न राहती भिन्न । होती समान उन्नत ॥६१॥
नाही जातिपंथादि भेद । आपपरभाव हर्षखेद ।
प्रकट होई सच्चिदानंद । सर्व ठायीं समरूपें ॥६२॥
जन्मणें मरणें झाला खेळ । सुखदु:ख सर्व झालें शीतळ ।
संकटें येतां वाटे प्रेमळ । प्रवाह आला ॥६३॥
आता विषादचि नाही उरला । विचार विस्ताररूपें व्यापला ।
जें जें करणें असेल निसर्गाला । रुचि वाटे तयाची ॥६४॥
यासीच खरा बोलती प्रारब्धवाद । ज्यांतूनि आसक्तीचा उच्छेद ।
इच्छेविरहीत आनंद । सर्वांसाठीं निर्विषय ॥६५॥
नाही शृंगार सौंदयाचा । नाही पाल्हाळ काव्यकलांचा ।
जें असेल जैसें तयाचा । आनंद वाटे चित्तासि ॥६६॥
हें सर्व कासयाने झालें ? यासाठी काय साधन केलें ?
कासयाने द्वैतपण मुरलें । आपणामाजीं ? ॥६७॥
हें आठवतां भान येतें । साक्षित्वरूपें पाहतां कळतें ।
अंतरंगीं विचारितां वळतें । कार्यमर्म सर्वकांही ॥६८॥
बुध्दीसि स्वातंत्र्य दिलें । जैसें जें दिसलें तें विचारिलें ।
त्यापरी कार्यसंबंध जोडले । आत्मत्व आलें देहभावा ॥६९॥
आपण तैसे सकळ जन । मग कासया मानावें भिन्नपण ?
ऐसा होतां झालें सावधान । ज्ञानमार्ग सर्वकांही ॥७०॥
ऐसा जीवेंचि मंत्र धरिला । न कळे कोणीं वरदहस्त ठेविला ।
परि सदभावें मीं नमस्कारिला । आडकोजी गुरुस्थानीं ॥७१॥
बहिरंग बोध नाही केला । स्वयेंचि श्रध्दाभावें घेतला ।
अहंकार न हो म्हणोनि पूजिला । सदगुरुराजा ॥७२॥
परि अंतरीं कळलें मर्म । गुरुशिष्यपण आहे भ्रम ।
आहे एकचि वस्तु अगम्य । दोघांमाजीं ॥७३॥
हें कळावयासि संगति लागे । संगतियोगें भावना जागे ।
भावना जागतां अंतरंगें । दिसे मुळींचें आत्मरूप ॥७४॥
मग जें जें मागे पाहिलें । तें तें सर्व सहज झालें ।
स्वाभाविकपणचि अंगीं आलें । स्वरूपानुभवें ॥७५॥
स्वरूप म्हणजे अखंड स्थिति । जी आत्म्याची सहजगति ।
नाही कृति ना विकृति । स्वरूपामाजीं ॥७३॥
अखंड प्रेम अगाध ज्ञान । अबाधित सत्य आनंद पूर्ण ।
हेंच स्वरूपाचें लक्षण । अवीट अभिन्न अक्षय जें ॥७७॥
परि हें प्रथम कळलें नव्हतें । म्हणोनि धुंडिलें स्थानमानातें ।
नवल तोंवरि वाटलें होतें । न लक्षितां स्वरूपस्थिति ॥७८॥
जैसी जैसी जाणीव वाढवी । तैसी शक्ति व्यापक झाली ।
पुढे वाटली पर्वतावलि । गोवरी जैसी ॥७९॥
राजाहि वाटला घरचा गडी । सुचवावयाची झाली तातडी ।
संसार झाला आपुला सवंगडी । याचि गुणें ॥८०॥
आपुला आनंद पैसावला । सुखवूं पाहे दु:खिताला ।
निद्रेत कोणी ओसणला । तरी ये दया त्याची जैसी ॥८१॥
परकेपणाची दृष्टीच गेली । वासना भावनेंत विरूं लागली ।
दुसर्यांचीं सुखदु:खें झालीं । आपणाऐसीं सहजचि ॥८२॥
मग माघारलीं पूजामंदिरें । दिसूं लागलीं जिवंत शरीरें ।
यानेच दिसे सर्वांचें बरें । देवकृपा व्हावयासि ॥८३॥
जिकडे जिकडे उणीव भासे । तिकडे तिकडे मन उल्हासें- ।
धाविनो करी आपणाऐसें । एकचि अंग समजोनि ॥८४॥
जंव अंतरीं आत्मा कळला । तंव आपल्यांतचि विश्व पाहों लागला ।
जैसा दिव्यदृष्टीचा प्रकाश गवसला । अर्जुनालागी ॥८५॥
मग अनंत उदरें अनंत हस्त । दिशा व्यापूनिया समस्त ।
दिसे विराटरूप महासमर्थ । ठायींच्या ठायी ॥८६॥
ही दृष्टि सर्वांसचि आहे । परि विचारें उघडील तोचि पाहे ।
तो अनुभवमार्ग सांगती लवलाहें । संतसज्जन ॥८७॥
जैसे आकाशाचे तुकडे नोहे । ते घटोपाधीमुळेचि भासती पाहे ।
तैसा जीव अल्पज्ञ वेगळा न राहे । अनुभव घेतां ॥८८॥
नुरे जीवाचें जीवपण । दारिद्यदु:ख रंकपण ।
आनंदाचें शिखर पूर्ण । प्राप्त होई निश्चयें ॥८९॥
मग प्रारब्ध तयाचा खेळ । प्रयत्न लीलारूप केवळ ।
आत्मरूपें विश्व सकळ । अनुभवा ये एकपणें ॥९०॥
जीव आपुली वारी व्यथा । तैसाचि सुखवी जगा समस्ता ।
उरला उपकारापुरता । सर्वांचिया आत्मभावें ॥९१॥
त्यासि नाही उरली कामना । निष्काम कर्म त्याचा बाणा ।
मग बाधक होईल कोणा । कैशापरी संसारीं ? ॥९२॥
तो जें करी तें ईश्वरपूजन । बोलेल तेंचि वेदवचन ।
त्यांच्या शब्दें आंदोलन । करिती जन सदभावें ॥९३॥
सत्तेविण त्याची सत्ता । क्रांतीहूनि सेवेची महत्ता ।
इशारा होतां मालमत्ता । लोक लाविती सत्कार्यीं ॥९४॥
त्याच्या संदेशाचें बळ । गांवीं करी प्रेमाचा सुकाळ ।
सुखी होती लोक सकळ । गांवोगांवींचे ॥९५॥
त्याच्या ज्ञानें भारले अज्ञजन । ते ज्ञानियांसि देतील शिकवण ।
झुंजती काळाशीं दारूण । स्त्रिया मुलेंहि ॥९६॥
हें आत्मविकासाचें बळ । मानवी प्रयत्नाचेंचि फळ ।
देव होवोनि करील सकळ । लोकचि देव ॥९७॥
मित्रा ! ऐसा अभ्यास करि । धरोनि मार्ग-बोध अंतरीं ।
मग दिसेल याच शरीरीं । तो श्रीहरि व्यापला ॥९८॥
लाभतां अनुभवाची खूण । जनता होईल जनार्दन ।
गांवीं ऐसा एकटाहि जाण । उन्नत करी गांव सारें ॥९९॥
तो प्रलोभनीं कोठे फसेना । रागद्वेषेंहि गोंधळेना ।
त्याच्या सहवासेंचि ग्रामजीवना । अमृत लाभे ॥१००॥
ऐसा सेवकचि पाया जगाचा । गांवचा रत्ननिधिच तो साचा ।
अभ्यास करा सक्रिय अध्यात्माचा । याचसाठी ॥१०१॥
प्रयत्नें मानव होई देव । प्रयत्नें स्वर्गतुल्य होई गांव ।
संतांच्याहि अभेदभक्तीचें वैभव । ग्रामसेवा-प्रयत्नीं ॥१०२॥
ऐसे लोक निर्माण करावे । तरीच उदया ये जग नवें ।
नांदेल ग्राम, विश्व, वैभवें । सर्वकाळ तुकडया म्हणे ॥१०३॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्रस्वानुभव संमत ।
स्वानुभवें कथिला अध्यात्मपथ । सदतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥