अध्याय सोळावा : वेष-वैभव
ईश्वरास मान्य जें सत्कार्य । जें सांगोनि गेले संतवर्य ।
तें आचरणें यांतचि सौंदर्य । खर्या जीवनाचें ॥१॥
सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार ।
सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनांसि ॥२॥
ऐसें सात्विक करणें जीवन । ही नव्हे अंधश्रध्देची खूण ।
सात्विकता निसर्गनियमांस धरून । ऐसा अनुभव जाणत्यांचा ॥३॥
सात्विकतेनें आरोग्य लाभे । शांतिसुख दास होऊनि राबे ।
जीवन सर्वप्रकारें शोभे । प्रभावीं सौंदर्याने ॥४॥
स्वैराचार हीन विचार । राजस-तामस आहार-विहार ।
दिनचर्येंत नाही ताळतंत्र । त्याचें इह-पर सुख नाशे ॥५॥
चहा-चिवडा-चिरूटांचे दास । आपल्या तनुमनधनाचा नाश ।
करोनि बिघडविती जीवनास । गांवच्याहि ॥६॥
सात्विक सरळ ठेवितां जीवन । तें होय सुंदर आरोग्यपूर्ण ।
सात्विकचि असावी वेषभूषाहि जाण । मानवाची ॥७॥
कांही भडक वेषभूषा करिती । कपडयावरि किती कपडे घालती ।
आंत लुकडे परि वरोनि शृंगारिती । शरीरें आपुलीं ॥८॥
तोंडाचें खोडकें दिसती हाडें । छातीची खोली दाखवी लांकडें ।
काय होतें घालोनी कपडे । गर्भरेशमीहि ? ॥९॥
उगीच करिती थाटमाट । कपाळीं अत्तराचा मळवट ।
पावडर कंगवा आरसा चिरूट । खिशामाजी ॥१०॥
व्यसन तोंडाचें खोडकें करी । तेल लाविती वरचेवरी ।
केश फिरवोनि म्हणती साजरीं । दिसतों आम्ही ॥११॥
अंग निस्तेज जीर्ण झालें । खरूज गजकर्णादिकें भरलें ।
भारी कपडे घालोनि झांकिलें । सौंदर्यासाठी ॥१२॥
कशाचें हें सौंदर्य पण । ज्यांतूनि न जाय सूर्यकिरण ।
ब्रह्मचर्याचेहि नाहीत कण । शरीरामाजी ॥१३॥
चालतांना पढती आढया । बोट लावतां खाती तनघडया ।
बाता करिती बडया बडया । आम्ही शौकीन म्हणोनि ॥१४॥
रडयासारिखी निघते वाचा । औषधावाचूनि न होय शौच्या ।
बोटांत आंगठया हिरकणीच्या । मिरवोनि काय ? ॥१५॥
निस्तेज शृंगारिलें प्रेत । की भुजाण उभें केलें शेतांत ।
एकटाचि विचित्र दिसे चारचौघांत । ऐसी नको वेषभूषा ॥१६॥
अथवा भरजरी कपडे घातले । परि ते स्वच्छचि नाही केले ।
सोवळे म्हणवोनि पुन:पुन्हा नेसले । तेच ते पीतांबर ॥१७॥
ऐसी कला कासया करावी । जी हास्यास्पद आणि बाधकहि व्हावी ।
आपुली साधीच राहणी ठेवावी । ऐपतीपरी ॥१८॥
अंगीं गुणसौंदर्य भरावें । सुंदर सात्विक कपडे करावे ।
खादी-ग्रामोद्यागाचेंचि ल्यावें । लेणें आपुल्यापरीं ॥१९॥
नेहमी स्वच्छ धुतलेलें असावें । एकाचि वस्त्रें अंग झाकावें ।
निसर्गाचें हवा किरण लागावें । शरीरालागी ॥२०॥
एकावरि एक आच्छादन । तें थंड देशांचें अंधानुरण ।
शरीरा लागतां सूर्यकिरण । औषधिगुण अंगीं येती ॥२१॥
सोनेमोतीं रेशीम-जरी । सौंदर्यप्रसाधनें बहुपरी ।
त्या सर्वांहूनि शतपटीने बरी । आरोग्याची टवटवी ॥२२॥
सौंदर्य असावें रक्तशुध्दीचें । ओजपूर्ण ब्रह्मचर्याचें ।
नीटनेटकें वागण्याचें । घरींदारीं उत्तम ॥२३॥
कला दाखवावी बळकट स्नायूंची । उंच छातींची ताठ शरीराचीं ।
आरोग्याची बाणेदारपणाची । सर्वांगांनी आदर्श ॥२४॥
वेषभूषेची चढाओढ । आज जीवनास झाली अत्यंत जड ।
गरजा, चिंता, रोगांची वाढ । यांत कसलें मोठेंपण ? ॥२५॥
बाह्य वस्तूंचें भडकपण । हें आंतल्या उणीवेचें प्रदर्शन ।
महत्त्वास चढतां बाह्य आवरण । मोल घटे मानवतेचें ॥२६॥
मानव मानवतेने शोभावा । गांधीवेष लाजवी वैभवा ।
श्रीकृष्णाचा मोरमुकुट पावा । वेड लावी विश्वाला ॥२७॥
हें जाणोनिया अंतरीं । सात्विक व्हावें आहार-विहारीं ।
तेणें घर-गांव-देशसेवाहि बरी । साधतसे सहजचि ॥२८॥
लोकांपुढे राही आदर्श । समानतेचा उसळे हर्ष ।
ग्रामोद्योगांचाहि उत्कर्ष । आपैसाचि होय गांवीं ॥२९॥
येथे श्रोता करी शंका सादर । साधी राहणी उच्च विचार ।
हें जरी ऋषिजीवनाचें सूत्र । तरी तें आज ना चाले ॥३०॥
किंमती कपडे भडक राहणी । छाप पाडिती आज जनीं ।
साधा सात्विक राहे पडोनि । मागच्या मागे ॥३१॥
विष्णूचा पीतांबर पाहून । सागरें लक्ष्मी केली अर्पण ।
शंकराचीं चिरगुटें बघून । दिलें हलाहल तैसें होय ॥३२॥
आज पैसे खर्चतां सर्व मिळते । न्याय मिळतो सत्ताहि मिळते ।
कीर्तिसन्मान थोरपण मिळते । ऐसा अनुभव सर्वांचा ॥३३॥
मित्रा ! हाचि भ्रमिष्ट अनुभव । लोकांना सांगतो धनचि देव ।
या सूत्रानेचि दु:खें सर्व । आज वाढलीं जीवनांत ॥३४॥
सर्व हेंचि चालती समजोनि । जैसी स्पर्धाचि लागली जनीं ।
तोरा दाविती एक-एकाहूनि । जाती पतनीं अधिकाधिक ॥३५॥
कापसाहूनि सफेद वसनें । सोन्याहूनिहि पिवळे दागिने ।
शिखर गांठलें कृत्रिमतेने । नित्य नव्या हौसेसाठी ॥३६॥
स्वच्छता आणि पवित्रता । शुध्दता आणि नैसर्गिकता ।
याहूनि प्रिय झाली कृत्रिमता । सुशिक्षितता तीच वाटे ॥३७॥
स्नान न करतां फवारा घ्यावा । कपडयावरि अत्तरांचा शिडकावा ।
मळ सांचो परि सुंदर दिसावा । कपडा नवा घडोघडीं ॥३८॥
नवी फॅशन थाटमाट । यांची वाढतचि गेली चट ।
शिवतां पन्नासाचा कोट । लागे पँटहि तोलाचा ॥३९॥
ह्या गरजा वाढतचि जाती । तेथे न पुरे कुबेर-संपत्ति ।
मग बापुढे कामगार करिती । काय तेथे ? ॥४०॥
कोणी खाती लाचलुचपती । कोणी उघडचि डाके देती ।
अन्याय अत्याचार वाढती । पैशासाठी ॥४१॥
कोणी सरळपणें चालती । ते यांमाजी रगडले जाती ।
मग त्यांचीहि भांबावे वृत्ति । वाढे अशांति चहूंकडे ॥४२॥
कोणी घरीं उपास काढिती । मुलाबाळां दूध न देती ।
परि बाह्य डौल उत्तम ठेविती । मोठेपणा मिरवाया ॥४३॥
कोणी म्हणती यावाचून । न चाले धंदा न मिळे धन ।
परि हें सर्वांसीच गेलें समजोन । वर्म एकमेकांचें ॥४४॥
मग कां अट्टाहास करावा ? जाणोनि सन्मार्ग कां न धरावा ?
परि तो मार्गहि नाही ठावा । वेड लागलें धनाचें ॥४५॥
म्हणती पैशांनीच सर्व होतें । मोक्ष मिळतो, राज्य मिळतें ।
संत मिळती, कीर्ति मिळते । देवाचें होतें पूजनहि ॥४६॥
परि हें म्हणणें वेडयासारखें । पैशांनीच सखे होती पारखे ।
पैशासाठीच जगीं वाखे । घाली नरकीं पैसाचि ॥४७॥
पैसा नियमांनी मिळविला । तारतम्याने खर्चीं घातला ।
तरीच सौख्य देतो जीवाला । जीवनामाजीं ॥४८॥
नाहीतरि पैसा जहर । शांति न लाभूं दे क्षणभर ।
माणसासि बनवितो वानर । चंचल चित्त करोनिया ॥४९॥
चिंता लावितो कमावितांना । पशूसारिखे कष्ट नाना ।
जाळतो तनुमना जीवना । सर्वकाळ मानवाच्या ॥५०॥
चिंता थोर रक्षणाची । चोरभय अग्निभयादिकांची ।
लालसा वाढे उपभोगाची । माणूस होय पशुजैसा ॥५१॥
असला दिसला त्यासि पैसा । जीव होतो कासाविसा ।
वाटे खर्च करावा कैसा । झोप त्यासि लागेना ॥५२॥
आला पगार खर्च झाला । सिनेमा तमाशे पाहण्यांत गेला ।
त्यांतूनि उरला कांही, त्याला । उत्तम मार्ग लागेना ॥५३॥
दारू, गांज्यादिक पितो । कांही पैसा सट्टयांत जातो ।
कांही विभागणीस लागतो । व्यभिचाराच्या ॥५४॥
कांही उन्मादाच्या भरीं । झगडा करतां मार्गावरि ।
वकिलांचीं घरें भरी । ’ शाहजोग आम्ही ’ म्हणावया ॥५५॥
कांही खाण्यांत आलें बाष्कळ । मग उठलें पोट, कपाळ ।
डॉक्टर-वैद्यांची झाली धावपळ । पैसा गेला त्यासाठी ॥५६॥
कांही दाखवाया मोठेपण । देती पार्टी, बिदागी, दान ।
हसतां हसतां फसती घेवोन । बेगर्जी वस्तु ॥५७॥
कांही लोक कमाई करिती । त्यांची त्यांनाच न पुरे पुरती ।
खर्च वाढतां कर्ज घेती । धोका भोगती जाणोनिया ॥५८॥
जैसा कर्ज घेवोनि खर्च करी । तैसा कमाईस लक्ष न घरी ।
तेणें संकटें येती घरींदारीं । मग विचारी ’ काय करूं ? ’ ॥५९॥
पुढे जीवा लागली हळहळ । लोटतां न लोटे पुढचा काळ ।
म्हणोनि बुध्दि झाली चंचळ । चोरीचहाडी करावया ॥६०॥
अक्कल नाही आमदानीची । समज नाही मोजमापाची ।
जीभ चटकली खाण्यापिण्याची । धरला मार्ग चोरीचा ॥६१॥
कलंक लागला घराण्यावरि । आईबापाची बदनामी पुरी ।
पुत्र निघाले ऐसे वैरी । उत्तम कोणी म्हणेना ॥६२॥
हौसेसाठी सोडला धर्म । किळसवाणे करिती उद्यम ।
नाना प्रकारें व्यभिचारकर्म । करिती आणि करविती ॥६३॥
कोणी धनिक राक्षसचि असती । पैसा देवोनि गुलाम करिती ।
पाप करिती करवोनि घेती । आपणासाठी ॥६४॥
कोणी फसवोनि धन कमाविती । आपणचि उपभोग भोगती ।
त्यांचीहि शेवटीं होते फजीती । ऐकिली कीर्ति बहुतांची ॥६५॥
कांहींना जवानीचा चढे तोरा । लग्नें करिती दहाबारा ।
सरला पैसा आणि बोजवारा । कोणी थारा देईना ॥६६॥
मग खाती बायका तोडोनि । म्हणती पैसा आणा कोठोनि ।
काय खावें घरीं बसोनि ? लग्न केलें कासया ? ॥६७॥
कांही चढले चढवितां मनीं । विचार दिला सगळा सोडोनि ।
घरेंदारें बसले समर्पोनि । वेश्या ठेवोनि घरामाजी ॥६८॥
हा झाला वानरासमान । लोक न पाहती याचें वदन ।
आप्त हासती दुरून-दुरून । करणी याची पाहोनिया ॥६९॥
कांही धनासाठी दत्तक घेती । परि भांडतां कवडी न उरे हातीं ।
उरली तरि दत्तक-मित्र उडविती । संपत्ति सारी ॥७०॥
कोणी टोलेजंग नवसचि केला । जरि देवा ! पुत्र झाला ।
पुत्राभारंभार देईन तुला । सोनेचांदी, म्हणोनिया ॥७१॥
कांहींना प्रथमचि मुलें झालीं । त्यांनी गांवोगांवीं मिठाई वाटली ।
इस्टेट सारी गमविली । हर्ष होतां पोराचा ॥७२॥
जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी । तेव्हा हात कपाळीं देवोनि रडी ।
आता उरली नाही कवडी । भीक मागे लोकांसि ॥७३॥
कांही सज्जन यांतूनि वांचले । परि घरींच पैसे उधळोनि दिले ।
मुलामुलींचें लग्न केलें । धन खोविलें बारूदखानीं ॥७४॥
टोलेजंग दिला मंडप । नाही पाहिलें मोजमाप ।
पंगती बसल्या आपोआप । लाडूजिलेबी बासुंदीच्या ॥७५॥
कांही देखीसेखीं करूं लागले । व्रतबंध संस्कारादि भले ।
होते पैसे सर्व खोविले । वाढदिवशीं पुत्रांच्या ॥७६॥
कांहींनी वडिलांची पुण्यतिथी केली । पुंजी सारी गमाविली ।
शेवटीं रोटीहि देईल कुठली । नांव घेवोनि वडिलांचें ? ॥७७॥
कांही सज्जन यांतूनि वाचले । परि घरीं सणवारादि केले ।
होते-नव्हते पैसे घातले । दिवाळी-दसरा-होळीमाजी ॥७८॥
कांही मानव ऐसे असती । जे वाईट कामीं पैसा न घालिती ।
परि प्रतिष्ठेसाठी मरमरती । पैसा देवोनि गांठींचा ॥७९॥
शेतांत खटा असोत नव्वद । परि एका तासासाठी करिती फिर्याद ।
सारी इस्टेट होवो बरबाद । परि लढती एका शिवीसाठी ॥८०॥
कोणी नांव व्हावें लोकांतरी । म्हणोनि साहेबांस मेजवानी करी ।
नाना पक्वान्नें नजराणे परीपरी । पाहिजे तें तें पुरवावें ॥८१॥
कांहींनी घरेंदारेंहि विकलीं । प्रतिष्ठा स्थापावयासि आपुली ।
पुढे भिकारी होवोनि मेलीं । मुलेंबाळें त्यांचीं ॥८२॥
कांही लढले निवडणूक । पैसा गमावोनि झाले खाक ।
नाही उरलें लौकिकीं नाक । घेतला शोक विकतचा ॥८३॥
कांहींनी विकली शेतीभाती । बंगले बांधले सडकेवरती ।
शहरीं मौज भोगली, अंतीं । पोटा अन्न मिळेना ॥८४॥
कोणी व्यापारासाठी घर बांधिलें । पैसे त्यांतचि संपोनि गेले ।
पुढे खाण्याचे फजीते झाले । व्यापार कांही सुचेना ॥८५॥
कोणी देश-विदेश पाहती । नाना वस्तूंचा संग्रह करिती ।
शेवटीं त्यांचीहि झाली फजीती । गोष्टी उरल्या बडयाबडया ॥८६॥
कोणा साधूची लागली झळ । घरीं बुवांची चाले वर्दळ ।
चमत्कार करिती म्हणे सकळ । पैसे उधळी त्यालागी ॥८७॥
करी सेवा देई दक्षणा । मिष्टान्नें खाऊं घाली नाना ।
भरजरी वस्त्रपात्रादि दाना । करोनि झाला भिकारी ॥८८॥
मग बुवासीच म्हणे धन सांगा । लागला मागे करोनि त्रागा ।
गांठ पडली ठगा-ठगा । झाला शेवटीं निराश ॥८९॥
बुवा दक्षिणेपुरता गोड बोलला । ती संपतांच घर विसरला ।
कोण पुसतो धनहीनाला ? नाश झाला शेवटीं ॥९०॥
भक्ति चमत्कारादिसाठी । म्हणोनि झाली फजीती मोठी ।
घरदारहि लावोनि नेलें पाठीं । लुबाडलें ढोंगी बुवांनी ॥९१॥
कांही तीर्थधामावरि गेले । घरचें डबोलें जवळचि आणिलें ।
चोरागुंडादिकांनीं ठोकलें । पैसे नेले लुटोनि ॥९२॥
झाले बिचारे केविलवाणी । भीक मागत आले परतोनि ।
ऐसी केली पैशाधेल्यांनी । स्थिति अनेकांची ॥९३॥
सुविचारावांचोनि कांही । पैसा सत्कारणीं लागत नाही ।
धन वाढतां मन वाढत जाई । घटतां संवयी न घटती ॥९४॥
जीवनासि आवश्यक धन । सर्व कार्यांचें प्रारंभसाधन ।
प्रपंचीं पदोपदीं पाहिजे सुवर्ण । परि विचारधन आधी हवे ॥९५॥
नाहीतरि माणुसकीचें पडे विस्मरण । अंगीं वाढती हीन गुण ।
लोक तोंडापुरते म्हणती सज्जन । पाठ फिरवितां धिक्कातिरी ॥९६॥
शेवटीं मनुष्याचा निर्मळ व्यवहार । हाचि ठेवतो हृदयीं आदर ।
जो परस्परांच्या हिताचा विचार । आत्मत्वाने चालवी ॥९७॥
मनुष्यधर्म म्हणोनि सर्व करावें । परि भिकारीच न व्हावें ।
जीवन कर्तव्यशील राहावें । ऐसेंचि करावें सत्कर्म ॥९८॥
जें टिकेल तें करणें बरें । ज्यासि सज्जन म्हणती साजिरें ।
कंजूषीहि न करणें बरे ! उधळपट्टीहि न व्हावी ॥९९॥
ऐपत पाहोनि प्रसंग करावे । प्रसंगीं कदर्यु न बनावें ।
परि पैसेहि न उधळावे । भीक लागेल ऐशापरी ॥१००॥
लौकिकासाठी भिकारी न व्हावें । अंथरूण पाहून पाय पसरावे ।
प्रसंग शोभे ऐसे करावे । टिकाऊ परिणाम लक्षूनि ॥१०१॥
मनुष्य भावनेच्या आहारीं जातो । तेव्हा तारतम्यचि सोडतो ।
कांहीहि विचित्र करीत सुटतो । ’ हौसेला मोल नाही ’ म्हणोनि ॥१०२॥
परिणामांची पर्वा न करितां । व्यर्थचि दाखवितो उदारता ।
घरीं धनसंपत्ति नसतां । कर्ज काढोनि हौस करी ॥१०३॥
पुढे आपुला करोनि नाश । भिकेस लावी मुलाबाळांस ।
नाही कोणाचाचि विकास । ऐसें कासया करावें ? ॥१०४॥
रोज न्यायाने मिळवावें धन । थोडें थोडें करावें जतन ।
कांही खर्चावें त्यांतून । प्रसंगासाठी संसारीं ॥१०५॥
योग्य अतिथींचा करावा आदर । त्यांसहि द्यावी भाकरींत भाकर ।
आपुल्यापरीने करावा सत्कार । आलियाचा ॥१०६॥
दुसर्याच्या दु:खांत दु:खी व्हावें । त्याच्या आनंदीं सुख मानावें ।
प्रसंगीं आपणासि वगळितां यावें । न्यायी बुध्दीने ॥१०७॥
आपण कमवावें आपण खावें । परि उरलें तें गांव-कार्यीं लावावें ।
कमींत कमी खर्चात जावें । नेटकेपणें ॥१०८॥
कमावणें ती नव्हे श्रीमंती । बचत केली तीच संपत्ति ।
यानेच संपन्न होई व्यक्ति । वाढे श्रीमंती गांवाची ॥१०९॥
थोडया थोडयांतचि अधिक खर्चे । काटकसरीने रोज वाचे ।
थेंबें थेंबें तळें साचें । मग तें मना शांति देई ॥११०॥
तिळातिळांतचि तेल पूर्ण । क्षणाक्षणाने बनलें जीवन ।
कणाकणाने सांचे धनधान्य । कामीं येई प्रसंगीं ॥१११॥
अधिक न घ्यावा एकहि घांस । तेणें नशीबीं नये उपास ।
थोडा त्रास अधिक विकास । शेवट गोड याचि मार्गे ॥११२॥
ऐसें वर्तन व्हावें गांवी । गरजांची धांव कमी करावी ।
अनासक्ति वाढवावी । प्रत्येकाने अनुक्रमें ॥११३॥
काटकसरीचें करितां वर्तन । अपार वांचेल गांवी धन ।
त्याने गांव होईल नंदनवन । सर्वतोपरीं ॥११४॥
गांवासि सत्ययुग आणावा । त्याच्या सुखें स्वर्ग मानावा ।
आपुल्या इंद्रियांच्या चवा । सोडूनि द्याव्या थोडथोडया ॥११५॥
मग जाणोनिया आत्मरंग । राहावें नित्यानंदस्वरूपीं दंग ।
तेव्हाचि जीव होय अभंग । अमर स्थानीं शेवटच्या ॥११६॥
सम्यक आचार सम्यक विचार । संग्रामाचा आदर्श थोर ।
साधु-संत महावीर । जगज्जेते झाले या मार्गे ॥११७॥
शुध्द आचार-विचारांचें फळ । व्यक्तिसवेंचि गांव सोज्ज्वळ ।
गांवीं सुखें नांदतील सकळ । तुकडया म्हणे ॥११८॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत ।
कथिली साधी राहणी संयमयुक्त । सोळावा अध्याय संपूर्ण ॥११९॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥