वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय सोळावा

ग्रामगीता

अध्याय सोळावा 
: वेष-वैभव 

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
 

ईश्वरास मान्य जें सत्कार्य । जें सांगोनि गेले संतवर्य ।

तें आचरणें यांतचि सौंदर्य । खर्‍या जीवनाचें ॥१॥


सात्विक आहार सात्विक विहार । सात्विक संगति, व्यवहार । 

सात्विक वाचन-दर्शनादि साचार । प्रिय सज्जनांसि ॥२॥


ऐसें सात्विक करणें जीवन । ही नव्हे अंधश्रध्देची खूण ।

सात्विकता निसर्गनियमांस धरून । ऐसा अनुभव जाणत्यांचा ॥३॥


सात्विकतेनें आरोग्य लाभे । शांतिसुख दास होऊनि राबे । 

जीवन सर्वप्रकारें शोभे । प्रभावीं सौंदर्याने ॥४॥


स्वैराचार हीन विचार । राजस-तामस आहार-विहार । 

दिनचर्येंत नाही ताळतंत्र । त्याचें इह-पर सुख नाशे ॥५॥


चहा-चिवडा-चिरूटांचे दास । आपल्या तनुमनधनाचा नाश । 

करोनि बिघडविती जीवनास । गांवच्याहि ॥६॥


सात्विक सरळ ठेवितां जीवन । तें होय सुंदर आरोग्यपूर्ण ।

सात्विकचि असावी वेषभूषाहि जाण । मानवाची ॥७॥


कांही भडक वेषभूषा करिती । कपडयावरि किती कपडे घालती । 

आंत लुकडे परि वरोनि शृंगारिती । शरीरें आपुलीं ॥८॥


तोंडाचें खोडकें दिसती हाडें । छातीची खोली दाखवी लांकडें । 

काय होतें घालोनी कपडे । गर्भरेशमीहि ? ॥९॥


उगीच करिती थाटमाट । कपाळीं अत्तराचा मळवट । 

पावडर कंगवा आरसा चिरूट । खिशामाजी ॥१०॥


व्यसन तोंडाचें खोडकें करी । तेल लाविती वरचेवरी । 

केश फिरवोनि म्हणती साजरीं । दिसतों आम्ही ॥११॥


अंग निस्तेज जीर्ण झालें । खरूज गजकर्णादिकें भरलें । 

भारी कपडे घालोनि झांकिलें । सौंदर्यासाठी ॥१२॥


कशाचें हें सौंदर्य पण । ज्यांतूनि न जाय सूर्यकिरण । 

ब्रह्मचर्याचेहि नाहीत कण । शरीरामाजी ॥१३॥


चालतांना पढती आढया । बोट लावतां खाती तनघडया । 

बाता करिती बडया बडया । आम्ही शौकीन म्हणोनि ॥१४॥


रडयासारिखी निघते वाचा । औषधावाचूनि न होय शौच्या । 

बोटांत आंगठया हिरकणीच्या । मिरवोनि काय ? ॥१५॥


निस्तेज शृंगारिलें प्रेत । की भुजाण उभें केलें शेतांत । 

एकटाचि विचित्र दिसे चारचौघांत । ऐसी नको वेषभूषा ॥१६॥


अथवा भरजरी कपडे घातले । परि ते स्वच्छचि नाही केले । 

सोवळे म्हणवोनि पुन:पुन्हा नेसले । तेच ते पीतांबर ॥१७॥


ऐसी कला कासया करावी । जी हास्यास्पद आणि बाधकहि व्हावी । 

आपुली साधीच राहणी ठेवावी । ऐपतीपरी ॥१८॥


अंगीं गुणसौंदर्य भरावें । सुंदर सात्विक कपडे करावे । 

खादी-ग्रामोद्यागाचेंचि ल्यावें । लेणें आपुल्यापरीं ॥१९॥


नेहमी स्वच्छ धुतलेलें असावें । एकाचि वस्त्रें अंग झाकावें । 

निसर्गाचें हवा किरण लागावें । शरीरालागी ॥२०॥


एकावरि एक आच्छादन । तें थंड देशांचें अंधानुरण । 

शरीरा लागतां सूर्यकिरण । औषधिगुण अंगीं येती ॥२१॥


सोनेमोतीं रेशीम-जरी । सौंदर्यप्रसाधनें बहुपरी । 

त्या सर्वांहूनि शतपटीने बरी । आरोग्याची टवटवी ॥२२॥


सौंदर्य असावें रक्तशुध्दीचें । ओजपूर्ण ब्रह्मचर्याचें । 

नीटनेटकें वागण्याचें । घरींदारीं उत्तम ॥२३॥


कला दाखवावी बळकट स्नायूंची । उंच छातींची ताठ शरीराचीं । 

आरोग्याची बाणेदारपणाची । सर्वांगांनी आदर्श ॥२४॥


वेषभूषेची चढाओढ । आज जीवनास झाली अत्यंत जड । 

गरजा, चिंता, रोगांची वाढ । यांत कसलें मोठेंपण ? ॥२५॥


बाह्य वस्तूंचें भडकपण । हें आंतल्या उणीवेचें प्रदर्शन । 

महत्त्वास चढतां बाह्य आवरण । मोल घटे मानवतेचें ॥२६॥


मानव मानवतेने शोभावा । गांधीवेष लाजवी वैभवा । 

श्रीकृष्णाचा मोरमुकुट पावा । वेड लावी विश्वाला ॥२७॥


हें जाणोनिया अंतरीं । सात्विक व्हावें आहार-विहारीं । 

तेणें घर-गांव-देशसेवाहि बरी । साधतसे सहजचि ॥२८॥


लोकांपुढे राही आदर्श । समानतेचा उसळे हर्ष । 

ग्रामोद्योगांचाहि उत्कर्ष । आपैसाचि होय गांवीं ॥२९॥


येथे श्रोता करी शंका सादर । साधी राहणी उच्च विचार । 

हें जरी ऋषिजीवनाचें सूत्र । तरी तें आज ना चाले ॥३०॥


किंमती कपडे भडक राहणी । छाप पाडिती आज जनीं । 

साधा सात्विक राहे पडोनि । मागच्या मागे ॥३१॥


विष्णूचा पीतांबर पाहून । सागरें लक्ष्मी केली अर्पण ।

शंकराचीं चिरगुटें बघून । दिलें हलाहल तैसें होय ॥३२॥


आज पैसे खर्चतां सर्व मिळते । न्याय मिळतो सत्ताहि मिळते ।

कीर्तिसन्मान थोरपण मिळते । ऐसा अनुभव सर्वांचा ॥३३॥


मित्रा ! हाचि भ्रमिष्ट अनुभव । लोकांना सांगतो धनचि देव । 

या सूत्रानेचि दु:खें सर्व । आज वाढलीं जीवनांत ॥३४॥


सर्व हेंचि चालती समजोनि । जैसी स्पर्धाचि लागली जनीं । 

तोरा दाविती एक-एकाहूनि । जाती पतनीं अधिकाधिक ॥३५॥


कापसाहूनि सफेद वसनें । सोन्याहूनिहि पिवळे दागिने । 

शिखर गांठलें कृत्रिमतेने । नित्य नव्या हौसेसाठी ॥३६॥


स्वच्छता आणि पवित्रता । शुध्दता आणि नैसर्गिकता । 

याहूनि प्रिय झाली कृत्रिमता । सुशिक्षितता तीच वाटे ॥३७॥


स्नान न करतां फवारा घ्यावा । कपडयावरि अत्तरांचा शिडकावा । 

मळ सांचो परि सुंदर दिसावा । कपडा नवा घडोघडीं ॥३८॥


नवी फॅशन थाटमाट । यांची वाढतचि गेली चट ।

शिवतां पन्नासाचा कोट । लागे पँटहि तोलाचा ॥३९॥


ह्या गरजा वाढतचि जाती । तेथे न पुरे कुबेर-संपत्ति ।

मग बापुढे कामगार करिती । काय तेथे ? ॥४०॥


कोणी खाती लाचलुचपती । कोणी उघडचि डाके देती । 

अन्याय अत्याचार वाढती । पैशासाठी ॥४१॥


कोणी सरळपणें चालती । ते यांमाजी रगडले जाती । 

मग त्यांचीहि भांबावे वृत्ति । वाढे अशांति चहूंकडे ॥४२॥


कोणी घरीं उपास काढिती । मुलाबाळां दूध न देती । 

परि बाह्य डौल उत्तम ठेविती । मोठेपणा मिरवाया ॥४३॥


कोणी म्हणती यावाचून । न चाले धंदा न मिळे धन । 

परि हें सर्वांसीच गेलें समजोन । वर्म एकमेकांचें ॥४४॥


मग कां अट्टाहास करावा ? जाणोनि सन्मार्ग कां न धरावा ? 

परि तो मार्गहि नाही ठावा । वेड लागलें धनाचें ॥४५॥


म्हणती पैशांनीच सर्व होतें । मोक्ष मिळतो, राज्य मिळतें । 

संत मिळती, कीर्ति मिळते । देवाचें होतें पूजनहि ॥४६॥


परि हें म्हणणें वेडयासारखें । पैशांनीच सखे होती पारखे । 

पैशासाठीच जगीं वाखे । घाली नरकीं पैसाचि ॥४७॥


पैसा नियमांनी मिळविला । तारतम्याने खर्चीं घातला । 

तरीच सौख्य देतो जीवाला । जीवनामाजीं ॥४८॥


नाहीतरि पैसा जहर । शांति न लाभूं दे क्षणभर । 

माणसासि बनवितो वानर । चंचल चित्त करोनिया ॥४९॥


चिंता लावितो कमावितांना । पशूसारिखे कष्ट नाना । 

जाळतो तनुमना जीवना । सर्वकाळ मानवाच्या ॥५०॥


चिंता थोर रक्षणाची । चोरभय अग्निभयादिकांची । 

लालसा वाढे उपभोगाची । माणूस होय पशुजैसा ॥५१॥


असला दिसला त्यासि पैसा । जीव होतो कासाविसा । 

वाटे खर्च करावा कैसा । झोप त्यासि लागेना ॥५२॥


आला पगार खर्च झाला । सिनेमा तमाशे पाहण्यांत गेला । 

त्यांतूनि उरला कांही, त्याला । उत्तम मार्ग लागेना ॥५३॥


दारू, गांज्यादिक पितो । कांही पैसा सट्टयांत जातो ।

कांही विभागणीस लागतो । व्यभिचाराच्या ॥५४॥


कांही उन्मादाच्या भरीं । झगडा करतां मार्गावरि ।

वकिलांचीं घरें भरी । ’ शाहजोग आम्ही ’ म्हणावया ॥५५॥


कांही खाण्यांत आलें बाष्कळ । मग उठलें पोट, कपाळ । 

डॉक्टर-वैद्यांची झाली धावपळ । पैसा गेला त्यासाठी ॥५६॥


कांही दाखवाया मोठेपण । देती पार्टी, बिदागी, दान ।

हसतां हसतां फसती घेवोन । बेगर्जी वस्तु ॥५७॥


कांही लोक कमाई करिती । त्यांची त्यांनाच न पुरे पुरती ।

खर्च वाढतां कर्ज घेती । धोका भोगती जाणोनिया ॥५८॥


जैसा कर्ज घेवोनि खर्च करी । तैसा कमाईस लक्ष न घरी । 

तेणें संकटें येती घरींदारीं । मग विचारी ’ काय करूं ? ’ ॥५९॥


पुढे जीवा लागली हळहळ । लोटतां न लोटे पुढचा काळ । 

म्हणोनि बुध्दि झाली चंचळ । चोरीचहाडी करावया ॥६०॥


अक्कल नाही आमदानीची । समज नाही मोजमापाची । 

जीभ चटकली खाण्यापिण्याची । धरला मार्ग चोरीचा ॥६१॥


कलंक लागला घराण्यावरि । आईबापाची बदनामी पुरी । 

पुत्र निघाले ऐसे वैरी । उत्तम कोणी म्हणेना ॥६२॥


हौसेसाठी सोडला धर्म । किळसवाणे करिती उद्यम । 

नाना प्रकारें व्यभिचारकर्म । करिती आणि करविती ॥६३॥


कोणी धनिक राक्षसचि असती । पैसा देवोनि गुलाम करिती । 

पाप करिती करवोनि घेती । आपणासाठी ॥६४॥


कोणी फसवोनि धन कमाविती । आपणचि उपभोग भोगती । 

त्यांचीहि शेवटीं होते फजीती । ऐकिली कीर्ति बहुतांची ॥६५॥


कांहींना जवानीचा चढे तोरा । लग्नें करिती दहाबारा । 

सरला पैसा आणि बोजवारा । कोणी थारा देईना ॥६६॥


मग खाती बायका तोडोनि । म्हणती पैसा आणा कोठोनि । 

काय खावें घरीं बसोनि ? लग्न केलें कासया ? ॥६७॥


कांही चढले चढवितां मनीं । विचार दिला सगळा सोडोनि । 

घरेंदारें बसले समर्पोनि । वेश्या ठेवोनि घरामाजी ॥६८॥


हा झाला वानरासमान । लोक न पाहती याचें वदन । 

आप्त हासती दुरून-दुरून । करणी याची पाहोनिया ॥६९॥


कांही धनासाठी दत्तक घेती । परि भांडतां कवडी न उरे हातीं । 

उरली तरि दत्तक-मित्र उडविती । संपत्ति सारी ॥७०॥


कोणी टोलेजंग नवसचि केला । जरि देवा ! पुत्र झाला । 

पुत्राभारंभार देईन तुला । सोनेचांदी, म्हणोनिया ॥७१॥


कांहींना प्रथमचि मुलें झालीं । त्यांनी गांवोगांवीं मिठाई वाटली । 

इस्टेट सारी गमविली । हर्ष होतां पोराचा ॥७२॥


जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी । तेव्हा हात कपाळीं देवोनि रडी । 

आता उरली नाही कवडी । भीक मागे लोकांसि ॥७३॥


कांही सज्जन यांतूनि वांचले । परि घरींच पैसे उधळोनि दिले । 

मुलामुलींचें लग्न केलें । धन खोविलें बारूदखानीं ॥७४॥


टोलेजंग दिला मंडप । नाही पाहिलें मोजमाप । 

पंगती बसल्या आपोआप । लाडूजिलेबी बासुंदीच्या ॥७५॥


कांही देखीसेखीं करूं लागले । व्रतबंध संस्कारादि भले । 

होते पैसे सर्व खोविले । वाढदिवशीं पुत्रांच्या ॥७६॥


कांहींनी वडिलांची पुण्यतिथी केली । पुंजी सारी गमाविली । 

शेवटीं रोटीहि देईल कुठली । नांव घेवोनि वडिलांचें ? ॥७७॥


कांही सज्जन यांतूनि वाचले । परि घरीं सणवारादि केले । 

होते-नव्हते पैसे घातले । दिवाळी-दसरा-होळीमाजी ॥७८॥


कांही मानव ऐसे असती । जे वाईट कामीं पैसा न घालिती । 

परि प्रतिष्ठेसाठी मरमरती । पैसा देवोनि गांठींचा ॥७९॥


शेतांत खटा असोत नव्वद । परि एका तासासाठी करिती फिर्याद । 

सारी इस्टेट होवो बरबाद । परि लढती एका शिवीसाठी ॥८०॥


कोणी नांव व्हावें लोकांतरी । म्हणोनि साहेबांस मेजवानी करी । 

नाना पक्वान्नें नजराणे परीपरी । पाहिजे तें तें पुरवावें ॥८१॥


कांहींनी घरेंदारेंहि विकलीं । प्रतिष्ठा स्थापावयासि आपुली । 

पुढे भिकारी होवोनि मेलीं । मुलेंबाळें त्यांचीं ॥८२॥


कांही लढले निवडणूक । पैसा गमावोनि झाले खाक ।

नाही उरलें लौकिकीं नाक । घेतला शोक विकतचा ॥८३॥


कांहींनी विकली शेतीभाती । बंगले बांधले सडकेवरती । 

शहरीं मौज भोगली, अंतीं । पोटा अन्न मिळेना ॥८४॥


कोणी व्यापारासाठी घर बांधिलें । पैसे त्यांतचि संपोनि गेले । 

पुढे खाण्याचे फजीते झाले । व्यापार कांही सुचेना ॥८५॥


कोणी देश-विदेश पाहती । नाना वस्तूंचा संग्रह करिती । 

शेवटीं त्यांचीहि झाली फजीती । गोष्टी उरल्या बडयाबडया ॥८६॥


कोणा साधूची लागली झळ । घरीं बुवांची चाले वर्दळ । 

चमत्कार करिती म्हणे सकळ । पैसे उधळी त्यालागी ॥८७॥


करी सेवा देई दक्षणा । मिष्टान्नें खाऊं घाली नाना । 

भरजरी वस्त्रपात्रादि दाना । करोनि झाला भिकारी ॥८८॥


मग बुवासीच म्हणे धन सांगा । लागला मागे करोनि त्रागा । 

गांठ पडली ठगा-ठगा । झाला शेवटीं निराश ॥८९॥


बुवा दक्षिणेपुरता गोड बोलला । ती संपतांच घर विसरला । 

कोण पुसतो धनहीनाला ? नाश झाला शेवटीं ॥९०॥


भक्ति चमत्कारादिसाठी । म्हणोनि झाली फजीती मोठी ।

घरदारहि लावोनि नेलें पाठीं । लुबाडलें ढोंगी बुवांनी ॥९१॥


कांही तीर्थधामावरि गेले । घरचें डबोलें जवळचि आणिलें । 

चोरागुंडादिकांनीं ठोकलें । पैसे नेले लुटोनि ॥९२॥


झाले बिचारे केविलवाणी । भीक मागत आले परतोनि । 

ऐसी केली पैशाधेल्यांनी । स्थिति अनेकांची ॥९३॥


सुविचारावांचोनि कांही । पैसा सत्कारणीं लागत नाही । 

धन वाढतां मन वाढत जाई । घटतां संवयी न घटती ॥९४॥


जीवनासि आवश्यक धन । सर्व कार्यांचें प्रारंभसाधन । 

प्रपंचीं पदोपदीं पाहिजे सुवर्ण । परि विचारधन आधी हवे ॥९५॥


नाहीतरि माणुसकीचें पडे विस्मरण । अंगीं वाढती हीन गुण । 

लोक तोंडापुरते म्हणती सज्जन । पाठ फिरवितां धिक्कातिरी ॥९६॥


शेवटीं मनुष्याचा निर्मळ व्यवहार । हाचि ठेवतो हृदयीं आदर ।

जो परस्परांच्या हिताचा विचार । आत्मत्वाने चालवी ॥९७॥


मनुष्यधर्म म्हणोनि सर्व करावें । परि भिकारीच न व्हावें । 

जीवन कर्तव्यशील राहावें । ऐसेंचि करावें सत्कर्म ॥९८॥


जें टिकेल तें करणें बरें । ज्यासि सज्जन म्हणती साजिरें । 

कंजूषीहि न करणें बरे ! उधळपट्टीहि न व्हावी ॥९९॥


ऐपत पाहोनि प्रसंग करावे । प्रसंगीं कदर्यु न बनावें । 

परि पैसेहि न उधळावे । भीक लागेल ऐशापरी ॥१००॥


लौकिकासाठी भिकारी न व्हावें । अंथरूण पाहून पाय पसरावे । 

प्रसंग शोभे ऐसे करावे । टिकाऊ परिणाम लक्षूनि ॥१०१॥


मनुष्य भावनेच्या आहारीं जातो । तेव्हा तारतम्यचि सोडतो । 

कांहीहि विचित्र करीत सुटतो । ’ हौसेला मोल नाही ’ म्हणोनि ॥१०२॥


परिणामांची पर्वा न करितां । व्यर्थचि दाखवितो उदारता । 

घरीं धनसंपत्ति नसतां । कर्ज काढोनि हौस करी ॥१०३॥


पुढे आपुला करोनि नाश । भिकेस लावी मुलाबाळांस । 

नाही कोणाचाचि विकास । ऐसें कासया करावें ? ॥१०४॥


रोज न्यायाने मिळवावें धन । थोडें थोडें करावें जतन । 

कांही खर्चावें त्यांतून । प्रसंगासाठी संसारीं ॥१०५॥


योग्य अतिथींचा करावा आदर । त्यांसहि द्यावी भाकरींत भाकर । 

आपुल्यापरीने करावा सत्कार । आलियाचा ॥१०६॥


दुसर्‍याच्या दु:खांत दु:खी व्हावें । त्याच्या आनंदीं सुख मानावें । 

प्रसंगीं आपणासि वगळितां यावें । न्यायी बुध्दीने ॥१०७॥


आपण कमवावें आपण खावें । परि उरलें तें गांव-कार्यीं लावावें । 

कमींत कमी खर्चात जावें । नेटकेपणें ॥१०८॥


कमावणें ती नव्हे श्रीमंती । बचत केली तीच संपत्ति । 

यानेच संपन्न होई व्यक्ति । वाढे श्रीमंती गांवाची ॥१०९॥


थोडया थोडयांतचि अधिक खर्चे । काटकसरीने रोज वाचे । 

थेंबें थेंबें तळें साचें । मग तें मना शांति देई ॥११०॥


तिळातिळांतचि तेल पूर्ण । क्षणाक्षणाने बनलें जीवन । 

कणाकणाने सांचे धनधान्य । कामीं येई प्रसंगीं ॥१११॥


अधिक न घ्यावा एकहि घांस । तेणें नशीबीं नये उपास । 

थोडा त्रास अधिक विकास । शेवट गोड याचि मार्गे ॥११२॥


ऐसें वर्तन व्हावें गांवी । गरजांची धांव कमी करावी । 

अनासक्ति वाढवावी । प्रत्येकाने अनुक्रमें ॥११३॥


काटकसरीचें करितां वर्तन । अपार वांचेल गांवी धन । 

त्याने गांव होईल नंदनवन । सर्वतोपरीं ॥११४॥


गांवासि सत्ययुग आणावा । त्याच्या सुखें स्वर्ग मानावा । 

आपुल्या इंद्रियांच्या चवा । सोडूनि द्याव्या थोडथोडया ॥११५॥


मग जाणोनिया आत्मरंग । राहावें नित्यानंदस्वरूपीं दंग । 

तेव्हाचि जीव होय अभंग । अमर स्थानीं शेवटच्या ॥११६॥


सम्यक आचार सम्यक विचार । संग्रामाचा आदर्श थोर । 

साधु-संत महावीर । जगज्जेते झाले या मार्गे ॥११७॥


शुध्द आचार-विचारांचें फळ । व्यक्तिसवेंचि गांव सोज्ज्वळ । 

गांवीं सुखें नांदतील सकळ । तुकडया म्हणे ॥११८॥


इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव संमत । 

कथिली साधी राहणी संयमयुक्त । सोळावा अध्याय संपूर्ण ॥११९॥


॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥