वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय तेहतिसावा

ग्रामगीता

अध्याय तेहतिसावा : अवतारकार्य

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

श्रोतियांनी केला प्रश्न । संतसंगें मिळे संतपण । 
ऐसें झालें निरूपण । हें तों जीवा पटेना ॥१॥

संत देवाचे अवतार । आम्ही गांवचे गवार । 
कैसें त्यांच्या बरोबर । व्हावें आम्ही ? अशक्य हें ! ॥२॥

याचें ऐका समाधान । जग झालें ईश्वरापासोन । 
नर तोचि नारायण । दाविली खूण संतांनी ॥३॥

जन्मासि आला तोचि अवतार । अवतार सर्वचि प्राणिमात्र । 
त्या अवताराचे अनंत प्रकार । प्रकट होती सत्कर्मे ॥४॥

कोणी आपुलें पोटचि भरी । कोणी कुटुंबाचें पोषण करी । 
कोणी गांवाची काळजी निवारी । आपुल्यापरीने ॥५॥

कोणी होती प्रांतव्यापी । प्रांताकरितां कष्टी-तपी । 
जनाकरितां वाट सोपी । करोनि द्याया हौसेने ॥६॥

हे अवतार साधारण । यापुढे विशेष अवताराचें लक्षण । 
जो मिरवी देशाचें भूषण । शरीरीं स्वयें ॥७॥

” माझा देशचि माझें घर । देश दु:खी जणुं माझेंचि शरीर । 
त्यासाठी मी निरतर । कष्टी होईन सांभाळाया ” ॥८॥

ऐसें ज्याने मनीं धरिलें । किंबहुना कार्यें अनुभवा आलें । 
अनेक आपत्तींनी उजळलें । सत्कार्य ज्याचें ॥९॥

त्यासि म्हणावा अवतार । जो करी सज्जन-चिंता निरंतर । 
दुष्ट बुध्दीचा तरस्कार । सदा जयासि सक्रिय ॥१०॥

जगाचें उद्दिष्ट आहे सत्य । तिकडे जग करावें प्रवृत्त । 
ऐसें ज्याचें ज्याचें कृत्य । तोचि अवतार निश्चयें ॥११॥

षडगुण ऐश्वर्याच्या प्रमाणांत । अंश, पूर्ण आदि प्रकार त्यांत । 
ज्ञानी कर्तबगार निरासक्त । उदार श्री-यशसंपन्न ॥१२॥

या अवताराचे पंथ दोन । एक हृदयपरिवर्तन दुसरा दमन । 
एका क्रांति करी सशस्त्र पूर्ण । दुसरा भावभक्तीने वळवी ॥१३॥

धर्मनीति सेवामार्गे गवसिली । त्यासि संत-अवतार संज्ञा लाभली ।
सामदामदंडभेदाने क्रांति केली । त्यासि म्हणती देवावतार ॥१४॥

देव-अवतार नित्य नसती । ते महाप्रसंगीं पुढे येती । 
संत-अवतार नेहमी चालती । लोकीं सुनीति वाढवाया ॥१५॥

कांही अवतारांची महिमा । विश्वव्यापक त्यांचा आत्मा । 
प्रकट करण्या मानवतेची सीमा । प्रचार त्यांचा ॥१६॥

ज्यांचा जैसा अधिकार । त्यांचा चाले तैसा व्यवहार । 
मार्ग एकचि परि मागे-समोर । पाय अनुभवें पडताति ॥१७॥

कोणी भक्ति शिकवोनि सुधारी । मंत्र शिकवोनि जनता तारी । 
कोणी ज्ञानमार्ग सांगोनि समर्थ करी । मानवता लोकीं ॥१८॥

अखेर मानवांची उन्नति करणें । तयां राष्ट्रधर्म निजधर्म शिकविणें । 
हेंचि संतांचें असतें लेणें । सर्वतोपरी ॥१९॥

वाउगा संकल्पचि नाही उठला । स्फुरला तो अनुभवचि ठरला । 
त्या दिव्यदृष्टीच्या पुरुषाला । संत-अवतार म्हणों आम्हीं ॥२०॥

कोणी कुटुंबासि त्रस्त करी । कोणी गांवाचे होती वैरी । 
कोणी देशांत उपद्रव करी । पाखांडपंथीं ॥२१॥

जो देशद्रोही धर्मद्रोही ठरला । प्रेमाने सांगतां न समजला । 
सर्व प्राण्यांना त्रास झाला । ज्याच्या योगें ॥२२॥

कांही केल्या न सुधारें । शिरलें क्रूरवृत्तींचें वारें । 
सज्जनांचें मनहि थरारे । ज्याच्या धाकें ॥२३॥

त्याची झाली परिसीमा । तेव्हा देवावतार येतो कामा । 
पाठवावयासि विरामा । देहा त्याच्या निरुपायें ॥२४॥

ते दुर्जन राक्षस-अवतार । जे जनतेसि दु:ख देती फार । 
त्यांना दंड द्याया देव-अवतार । प्रकट होती ॥२५॥

ऐसें हें नेहमीच चालतें । जैसें जन्ममरण-रहाट फिरतें । 
तैसेचि संत-देव येताति ते । भूमीवरि ॥२६॥

राक्षसी आणि देववृत्ति । रूपांतरें खेळते जगतीं । 
संतदेव स्थापूं पाहती । शांति प्रेमशक्तीने ॥२७॥

येथे श्रोत्यांनी प्रश्न केला । जरि दुष्ट तोचि राक्षस ठरला । 
तरि त्याने वरदहस्त कैसा मिळविला । दैवतांचा ? ॥२८॥

काय ठावे नव्हते त्याचे गुण ? कां दिले शक्तीचें वरदान ? 
आम्हां न कळे हें पुराण । कैसें आहे सांगा की ॥२९॥

याचें ऐकावें उत्तर । हा राक्षसहि आधी भक्त फार । 
त्याच्या तपानेचि देवता निरंतर । प्रसन्न त्यासि ॥३०॥

त्याचिया गुणकर्मे मिळालें वरदान । तें सहन न झालें मागाहून । 
त्याचा दुरुपयोग दारुण । केला त्याने मनमाने ॥३१॥

प्रथम हाती आली सत्ता । मग भुलला तो भगवंता । 
लागला उपभोगाच्या पंथा । नीतिप्रवृत्ति सोडोनि ॥३२॥

त्याची राखती संत मर्जी । तंव तो अधिकचि चढे समाजीं । 
जनतेमनीं वाढतांहि नाराजी । पर्वा न करी अहंकारें ॥३३॥

भरावया पापांचा रांजण । त्यासि देती प्रोत्साहन । 
जेणें त्वरित होय निकाल पूर्ण । पंख फुतलिया उधळीपरी ॥३४॥

कितीहि साधुसंत समजाविती । परि न वळे त्याची मति । 
म्हणोनि देवावताराहातीं । कार्य आलें तयाचें ॥३५॥

देव-अवतार समजाविती । नाना योजना करूनि पाहती । 
शेवटीं शस्त्र धारण करिती । दुष्टासाठी ॥३६॥

त्याच्या मोक्षाने सुटती जन । मुक्त होती दु:खापासून । 
म्हणोनि करावा लागे प्रयत्न । अवतारासि निर्वाणींचा ॥३७॥

ऐसें ज्याने ज्याने केलें । दु:ख जगाचें निवारिलें । 
ते सर्व अवतारचि ठरले । पुराणें झालीं तयांचीं ॥३८॥

तैसें कोणी करी अजून । त्यांचीं गुणकर्मे पाहून । 
पूर्वीच्या थोरांचे अवतार जन । मानिती तयां ॥३९॥

तुलसीदास आधी आसक्त । ते वैराग्यें झाले महाभक्त । 
रामकथा गावोनि तारिलें जगत । म्हणोनि वाल्मीकि-अवतार ॥४०॥

कोणी भिन्न देवां अवतार मानिती । हेहि आहे आपुलीच भक्ति । 
पुढे पुढे कळेल तयांप्रति । पायर्‍या अवतार-कार्याच्या ॥४१॥

कोणा म्हसोबा खंडोबा मान्य । कोणी शक्तिअवताराचें करी पूजन । 
कोणी अवतार राम-कृष्ण । म्हणती महाविष्णूचे ॥४२॥

कोणी दश अवतार मानिती । कोणी गुरुनानक-परंपरा वानिती । 
कोणी तीर्थकरचि अवतार म्हणती । कोणी गणती चोवीस ॥४३॥

कोणी बुध्द-अवतार पूजती । कोणी दत-अवतारा भजती । 
कोणी येशु ईशपुत्रावतार समजती । जगतीं झाला ॥४४॥

कोणी म्हणे महंमद प्रेषित-अवतार । कोणी म्हणे संत अंशावतार । 
लोक मानिती अनंत प्रकर । किती सांगों ? ॥४५॥

याचें एकचि कारण । जो जो उन्नतीसि लागला न्यूनपूर्ण । 
तोचि अवतार मानिला वेगळा समजोन । सज्जनांनी ॥४६॥

कोणी ब्राह्मा-विष्णु-हर । यांसि मानिती खरे अवतार । 
कोणी म्हणती देवचि भूमीवर । कधी नाही प्रकट झाला ॥४७॥

देव आहे आत्मशक्ति । तो देह धारण न करी कल्पान्तीं । 
त्यासि जाणणें यांतचि उन्नति । मानवाची ॥४८॥

ऐसीं भिन्न लोकांचीं भिन्न मतें । सत्य सर्वांतचि उणेंपुरें तें । 
परि संगति कैसी लावावी यातें । विसरोनि गेले ॥४९॥

जे जे पुरुष थोर झाले । त्यांसि अवतारचि संबोधिलें । 
ज्यांचें ज्यांना चारित्र्य पटलें । त्यांनी मानलें त्यांलागी ॥५०॥

जुने ते सोनें विशेष ठरले । येथे कोणाचेंचि नाही चुकलें । 
परि ज्यांनी सत्य अनुभवलें । तेचि पावले देव-पदा ॥५१॥

कोणी म्हणती देवता अयोनिसंभव । अवतार करी चमत्कारचि सर्व । 
हें म्हणणें आहे अर्थगौरव । भाविकपणाचा ॥५२॥

गर्भ, नर्क, वैकुंठपुरी । यांचें महत्त्व काय देवाअंतरीं ? 
हें पाहोनि भांति-मोह धरी । तरि तो देव कैसेनि ? ॥५३॥

देवास वैकुंठ गर्भ सारिखे । येणें-जाणें स्वाभाविकें । 
सुखदु:खें एकाचि कौतुकें । राहती तयापुढे ॥५४॥

योनीद्वारें जरी प्रकटला । तरी दु:ख न वाटे त्याच्या हृदयाला । 
म्हणोनीच तो अयोनिसंभव मानिला । ज्ञानियांनी ॥५५॥

एरव्ही जन्ममरण सकला सारिखें । सहनशक्ति अधिकारभेद राखे । 
जैसें जयाचें स्थानमान देखे । तैसें निकें नाम तया ॥५६॥

सर्व अवतार मानवीच असती । परि अधिकाराऐसें कार्य करिती । 
त्यांची धारणा जीवन्मुक्ति । तैसीच असते सर्वदा ॥५७॥

अनेक जन्मांची संस्कार-संगति । घेवोनि येताति सांगातीं । 
उध्दराया जड जीवांप्रति । मार्ग दाविती अवतार ॥५८॥

परि मानवीच कार्य करणें । मानवी मार्गानेचि येणें-जाणें । 
मानवांच्या भूषणापरी मिरविणें । अवताराचें ॥५९॥

मानवें सर्व प्राणिमात्रा सुखवावें । सर्व कार्य सुरळीत चालवावें । 
एक असोनि अनंत व्हावें । उल्हास हाचि अंतरीं ॥६०॥

हें समजोनि जो वर्तला । तोचि अवतार शेवटीं ठरला । 
ज्याने पृथ्वीचा संबंध जोडला । एकसूत्रीं प्रयत्नें ॥६१॥

ज्यांनी सर्व विश्व सूत्रांत गोविलें । सन्मार्ग मानवमात्रा शिकविले । 
तेचि थोर अवतार झाले । पुढेहि होतील निश्चयें ॥६२॥

म्हणोनि अवतार हा उन्नतिवाद । अधिकार तैसा प्रकटे विशद । 
विश्वात्मभावें स्वयंपूर्ण सिध्द । अवतार आम्ही मानतों ॥६३॥

तोचि सर्वांसि एक करी । एक करोनि अनेकत्वीं वावरी । 
त्यासीच पावली पूर्णता खरी । विश्वात्म्याची ॥६४॥

एवढी विशाल ज्याची धारणा । एवढा कार्याचा व्याप जाणा । 
विश्वाचिया मतभेदांना । मिटवूं शके जो ॥६५॥

तोचि शेवटचा अवतार । महामानव विकासकेंद्र । 
आपण तयाचे अंश अंकुर । मानवधर्मी ॥६६॥

निश्चय व्हावा श्रोतियाजना । अवतार म्हणजे अतिमानव जाणा । 
मानवाची पूर्णता म्हणा । अवतारकार्य ॥६७॥

देवताची करावी उपासना । उपासकासीच ये अवतारपणा । 
ऐसाचि आहे अवताराचा बाणा । आजवरीचा ॥६८॥

यांत एकचि तारतम्य पहावें । मानवा कोणाचेनि सुख पावे । 
कोण समाजकार्य करी बरवें । जनमानस रंगवोनि ॥६९॥

तोचि समजावा महाभला । जो जनहितार्थी लागला । 
दैवी शक्तीचा सागर भरला । अंगीं ज्याच्या ॥७०॥

अवतारासि सामर्थ्य पाहिजे । आत्मबल प्रखर तयासि साजे । 
बोलिजे तैसेंचि कार्य कीजे । अवतार तो या जनीं ॥७१॥

ऐशा शांति-अवतारांची कीर्ति । मानवांसि संत सांगती । 
देव-अवतार प्रकट होती । क्रांति कराया देशामाजीं ॥७२॥

शांति-अवतार क्रांति-अवतार । या दोघांचें कार्य भिन्न सर्वत्र । 
एक करी सदबोध मात्र । एक करी निर्णय ॥७३॥

दोघांचीहि असे जरूरी । म्हणोनि ही योजना मानिली चतुरीं । 
आपणहि व्हावें अवतारी । त्यांचिया ऐसें निर्धारें ॥७४॥

नाहीतरि अरत्र ना परत्र । हेंहि म्हणतां ये अवतार-वैचित्र्य । 
परंतु अवतार तो अवतारकार्य । करावयासि ॥७५॥

मानवधर्मासि उजळोन । दुष्कृतिनाशा सज्जनरक्षण । 
करणें हेंचि अवतारलक्षण । सर्वमान्य सेवात्मक ॥७६॥

ज्यांनी जगाची सेवा केली । त्यांसीच अवतार पदवी लाभली । 
त्यावांचूनि अवतार बोली । ही तों आपुल्या भावनेची ॥७७॥

सेवेएवढें महत्त्व नाही । ज्ञान ध्यान वैराग्यासहि । 
ह्या सर्व साधनीं सफलता ही । सेवेनेचि होतसे ॥७८॥

देव-देवता जगीं आली । जपतपें करूं लागली । 
परि पूर्णता नाही झाली । सेवा नाही तोंवरि ॥७९॥

जेव्हा सेवाकार्य प्रकट केलें । अनंत जीव संतुष्ट झाले । 
तेव्हाचि अवतार तयां मानिलें । भूलोकीं या ॥८०॥

रामचंद्रें राज्य त्यागिलें । रावणा संहारूनि सज्जन रक्षिले । 
म्हणोनीच अवतार ठरले । सर्वतोमुखीं ॥८१॥

श्रीकृष्णें कंस मर्दिला । दुर्योधनाचा नाश घडविला । 
सुख देवोनि गोरगरीबांला । मगचि ठरला अवतार तो ॥८२॥

ऐसें सेवाकार्य केलें ज्याने । त्यासीच जन अवतार म्हणे । 
त्या कार्यलीला आठवती जीवेंप्राणें । सर्वतोपरी ॥८३॥

आठवती तेहि अवतार होती । तैसी करितां सेवाकृति । 
परि कोरडी सहानुभूति । ही तों नव्हें उध्दारक ॥८४॥

ज्यांनी सेवाकार्यासि जीवन दिलें । स्वानंदीं बुडोनि जगा तारिलें । 
तेचि संत आणि अवतार झाले । कर्तव्यशील मानव ॥८५॥

साधुसंतें सेवा केली । अनंत हृदयें संतोषविलीं । 
व्यवहार-उपासनेने दाविली । सिडी मोक्षमार्गाची ॥८६॥

साधुसंतें सेवा केली । जीवासि ब्रह्मप्राप्तीची ओळख दिली । 
तैसी सेवा पाहिजे घडली । आपणांसीहि ॥८७॥

एक संत जन्मास आला । त्याने प्रांताचा प्रांत कीर्तीने व्यापला । 
परि काम जनसुधारणेला । अपुरा पडला व्याप त्याचा ? ॥८८॥

याचें कारण आम्ही लोक । संदेश ऐकतांना डोळेझांक । 
नमस्कार करायाचें कौतुक । आमुच्यापाशी ॥८९॥

लोक करिती त्यांचा उत्सव । गाती मनोभावें गौरव । 
परन्तु तैसा सेवाभाव । अंगीं न आणिती आपुल्या ॥९०॥

देव घेतील अवतार । म्हणोनि वाट पाहती उतराया भार । 
हा दुबळेपणाचा विचार । शिरला थोर या लोकीं ॥९१॥

अरे ! हें सर्व आता विसरावें । संतीं सांगितलें तेंचि करावें । 
मानवाने मानवां सुधारावें । याहूनि पुण्य कोणतें ? ॥९२॥

हें पवित्र अवतारकार्य । आपणचि होऊनिया निर्भय । 
कां न करावें टाकोनि पाय ? लाभेल जय निश्चयाने ॥९३॥

कोणी रोगराईने मरे । त्यास कोण पुसतो सांगा बरें ? 
परि सेवा करितां प्राण अंतरे । लोक श्रध्दाभरें कीर्ति गाती ॥९४॥

म्हणोनि बोललों सेवक बना । ओळखा मानव म्हणोनि आपणा । 
घेवोनि अवतार-तत्त्वाचय खुणा । उजळा भुवना कीर्तीने ॥९५॥

नका अज्ञानामाजी दडूं । नका बायकापोरांसाठी रडूं ।
नका स्वार्थासाठी अडूं । निघा मानवसेवा साधाया ॥९६॥

जो आपुल्या स्वार्थासि मुकला । विश्वस्वार्थ मानितो आपुला । 
तोचि अवतारकार्यी लागला । मानतों आम्ही ॥९७॥

यासाठी करा आपुली उन्नति । सेवा देवोनि गांवाप्रति । 
गांवापासोनि विश्वाप्रति । पोहचोनि जावें ॥९८॥

आपली समज वाढवावी । पैस तेवढीं कामें करावीं । 
म्हणजे लाभेल अवतारपदवी । क्रमाने आपणा ॥९९॥

सेवेंतचि आहे देवभक्ति । कार्य करण्यांतचि राष्ट्रशक्ति । 
यानेच मिळे शेवटीं मुक्ति । अवतारदीप्ति अंगीं येई ॥१००॥

कोणालाहि न वाटावें अवघड । कैसें अवतारकार्य प्रचंड । 
पावतां नये ऐसें उदंड । नाहीच कांही ग्रामजनहो ! ॥१०१॥

तैसें भयचि वगळावें । म्हणोनि बोलिलों साध्या भावें ।
तुकडया म्हणे समजोनि घ्यावें । तारतम्याने मर्म याचें ॥१०२॥

इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभव-संमत । 
कथिला अवतारकार्याचा पथ । तेहतिसावा अध्याय संपूर्ण ॥१०३॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥