ग्रामगीता
॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥
विवाहादि संस्कार आवश्यक । परि खर्च न व्हावा अधिक ।
त्यांचें स्वरूप जाणोनि तात्विक । आचरावे सर्वदा ॥१॥
ओटीफळें, मौंजीबंधन । जावळें उतरणें तीर्थी जाऊन ।
वास्तु, बारसें, वाढदिवस जाण । अवडंबर नको तेथे ॥२॥
तैसेंचि मृत्युसंस्काराचें । स्तोम नसावें अंत्यविधीचें ।
जेणें मृताचिया नांवें सजीवांचें । दु:खी होय जीवन ॥३॥
मृत्युसंस्काराचा ऐका खुलासा । लोक मृत्युसि समजती भलतिसा ।
मी म्हणतों मृत्युजैसा । उत्तम नाही कोणीहि ॥४॥
जैसी नदी सागरासि मिळे । सोडोनि भेदभाव कष्टबळें ।
तिचें कार्यचि होतें सगळें । मिळण्यासाठी सागरीं ॥५॥
वाहत राही आपुल्या रंगें । लोक शांत होती सहज संगें ।
तिच्या पाण्यासि घेवोनि निजांगें । तृप्ति पावती जीवनीं ॥६॥
परि तिजसि महत्त्व सागराचें । तैसेंचि आहे मानवाचें ।
मोहपाश तुटतां आसक्तीचें । धांव घेई निजरूपीं ॥७॥
परि कार्याची जी वासना राहते । तीच जीवासि साथ देते ।
तिचेंचि आविष्करण पुन्हा होतें । पुढच्या जन्मीं ॥८॥
शरीरमात्र नष्ट झालें । परि संस्कार वासनेअंगीं भरले ।
पुन्हा जन्म घेतां प्रगटले । ऐसें होतें ॥९॥
ज्याने याच जन्मीं मोह मिटविले । उत्तम संस्कार प्राप्त केले ।
त्याचें पारणेंचि फिटलें । जन्ममरणांचें ॥१०॥
परि ऐसे क्वचितचि होती । अढळ परमधाम पावती ।
येर ते प्राणी येती जाती । आसक्तियोगें ॥११॥
आसक्तीने इंद्रियीं बांधला । मना येई तसा करूं लागला ।
तो जन लोकांसहि आवडला । स्वार्थ त्यांनाहि म्हणोनि ॥१२॥
जन्मला वाढला मोठा झाला । अवस्था अनेक त्या देहाला ।
षडऋतूंनी फळाफुला आला । जीर्ण झाला वृक्ष जैसा ॥१३॥
त्याची विकृति शिगेस लागली । शरीरगात्रें विस्कळून गेलीं ।
मग वाट पाहे आपुली । मूळच्या घराची ॥१४॥
त्यास मोहपाशें बांधूं पाहती । औषधें वाटेल तैसीं देती ।
’वाचवा वाचवा’ कळवळोनि म्हणती । कमीं येईल म्हणोनि ॥१५॥
मरणोन्मुखासि जीवन द्यावें । पुनरपि उत्तम बनवावें ।
हें मानवाचें कर्तव्यहि बरवें । समजों आम्ही ॥१६॥
परि प्रयत्न करोनि नाही जगला । शेवटीं शरीर सोडोनि गेला ।
समजावा देवाच्या स्वरूपीं मिळाला । प्राणी आपुल्या ॥१७॥
मग ईश्वरास करावी प्रार्थना । त्यास शांति लाभो देवसदनां ।
आमुच्या सुखदु:खाच्या भावना । न बाधोत तया ॥१८॥
येथे रडण्याचें नाही काम । आपणांसहि तेंचह घाम ।
पाहावें लागेल परम । झाल्या उपशम देहाचा ॥१९॥
म्हणोनि मृत्युनंतर रोदन । हें आहे अज्ञानाचें प्रदर्शन ।
कासया दावावें सर्व समजोन । उदास होवोनि मानसीं ? ॥२०॥
हें ज्याचें त्यासचि प्राप्त होतें । मग रडावें कासयासि लागतें ?
कांही करोनि तरी दाखवावें तें । कीर्तीसाठी ॥२१॥
आपण उरलें तें कर्तव्य करावें । तेणें त्याचें नांव भूषवावें ।
आपल्या कुळांत गौरव पावोनि जावें । तेणें भूषण वडिलांसि ॥२२॥
असो ऐसा प्राणी निवर्तला । सर्वामिळोनि न्यावें त्याला ।
पाहों नये जात-परजात भला । कोण होता ॥२३॥
सन्मान द्यावा जाणाराप्रति । अभद्र ऐसी नको अर्थी ।
गंभीरपणें जावें सांगातीं । आत्मीयतेने ॥२४॥
सर्वांनी प्रसंग नीट करावा । हातभार लावोनि द्यावा ।
आपलाहि संस्कार आठवावा । उत्तम होईल म्हणोनि ॥२५॥
मृत्यूहि सुमंगल समजावा । स्मशानयात्रेस सहयोग द्यावा ।
दिंडीघोषें मार्ग सुधारावा । जाणाराचा ॥२६॥
अभद्र विद्रूप किळसवाणी । न ठेवावी रीत कुणी ।
श्रध्दांजलीच्या भाषणीं । भूषवावें प्रसंगीं ॥२७॥
स्मशानीं असावी सुव्यवस्था । पाऊसकालासाठीहि तत्त्वता ।
संस्कारमंडप सर्वांकरिता । पवित्रता वातावरणीं ॥२८॥
मृतशरीराचें करोनि दहन । पवित्र करावें वातावरण ।
\गांवें लावोनि ठेवावें सामान । योग्य ठायीं ॥२९॥
मृत शरीरास पीतांबर । घरीं नसल्यास विका घर ।
दु:ख भोगा जन्मभर । ऐसें कोणीं न करावें ॥३०॥
असेल तैसेंचि वागावें । जुनेंहि वस्त्र स्वच्छ करावें ।
खुशाल अंगीं बांधोनि न्यावें । मृताचिया गरिबांनी ॥३१॥
नवेंचि वस्त्र पाहिजे आणिलें । ऐसें शास्त्राने जरी सांगितलें ।
तरी आमुच्या घरचें कैसें चाले । नाही ठाउकें शास्त्रासि ॥३२॥
तुपावाचोनि नको भोजन । हें शास्त्रवचन पाळतो कोण ?
मग मृतासीच तुप चोळाया जाण शास्त्रवचन कां सांगावें ? ॥३३॥
मृत्यु झाला एकाचिया घरी । खावयास नाही एक दिवस ज्वारी ।
सुतक धरोनि कैसियापरिं । बसावें तेणें ? ॥३४॥
एक दिवस खाली गेला । तरी उपास पडती गरिबाला ।
त्याने दहा दिवस उपास भला । कैसा करावा सांगा तुम्ही ॥३५॥
म्हणोनि प्रेत नेवोनि कार्य उरकलें । घरीं येवोनि स्नान केलें ।
मृत्युस्थळ पवित्र करोनि ठेविलें । आटोपले मृत्युसंस्कार ॥३६॥
मग त्याने खुशाल कामासि जावें । मोलमजूरी करीत राहावें ।
उत्तम विचारांचें करावें । मनन ध्यान एकांतीं ॥३७॥
सुतक धरण्याची प्रथा लाविली । ही तर शोकवृत्तीच दाविली ।
आड येतील तीं काढून टाकिलीं । पाहिजेत ऐसीं बंधनें ॥३८॥
याचा मूळ उद्देश ऐसा होता । मृत देहाचा संसर्ग घडतां ।
रोगजंतु चढती शुश्रुषा करितां । म्हणोनि दूर राहावें ॥३९॥
परि बाप शंभर कोसांवरि मेला । मुलगा सुतक पाळी मुंबईला ।
हा विपर्यास पाहिजे दूर केला । मूळ चित्तीं धरोनि ॥४०॥
गोमूत्र शिंपडणें निंब खाणें । प्रेतासि अग्निसंस्कार देणें ।
सुतक अस्पर्शता पाळणें । आरोग्यासाठी सर्व हें ॥४१॥
म्हणोनि शुध्द जलाने स्नान करावें । शुध्द कपडे परिधान करावे ।
असेल तें वस्त्रपात्र धुवावें । रोगियाचें ॥४२॥
हें करणें आहे आवश्यक । यासीच बोलती सुतक ।
परि दहा दिवस करावा शोक । हें तों मना पटेना ॥४३॥
शोकवार्ता सकळांसि कळावी । म्हणोनि एकदा पत्रे टाकावी ।
यापरि सुधारणा करावी समाजाची ॥४४॥
विचारांची दृढता व्हावी । म्हणोनि सदग्रंथांची कास धरावी ।
परि सहामासवरी रडभूक करावी । पाहुण्यांसवें कासया ? ॥४५॥
विवेकें सांवरोनि भावना । करावी तेराव्या दिवशीं प्रार्थना ।
सर्व लोकांसह जाणा । भजनानंद चाखावा ॥४६॥
सांगावी स्मृति म्हणोनि कहाणी । असेल तरि दान देवोनि ।
सेवा करावी त्या निमित्तानी । नसल्यास मनीं खेद नको ॥४७॥
मोकळेपणीं नमन करावें । ’मी उत्तम वागेन’ संकल्पावें ।
सेवेचें कार्य चालवावें । गतात्म्याचिया प्रित्यर्थ ॥४८॥
परि पाहावी आपुली परिस्थिति । जित्यांची होऊं नये फजीती ।
कोणी दान-दक्षिणेंत दिवाळें काढती । ऐसें नको ॥४९॥
कोणी रूढिबंधनांत पडती । मृतासाठी कर्ज काढती ।
त्यांचे नांवाने पंगती उठविती । जातभाई जमवोनि ॥५०॥
बुवा, पंच अथवा ब्राह्मण । यांसि धन देती भूर्दंड म्हणोन ।
कोणी घेती गोडजेवण । कमर मोडे गरिबाची ॥५१॥
कोणी घरीं धनाढय असती । परि पुत्राअभावीं नर्काची भीति ।
म्हणोनि मरते वेळीं दत्तक घेती । होय फजीती राहिल्यांची ॥५२॥
दत्तक करी उधळेपणा । किंवा पूर येई भांडणा ।
अपव्ययाची वाट लागे धना । तेणें नर्क चुके कैसा ? ॥५३॥
जीव स्वककर्मांचीं फळें भोगतो । त्यासि कोण कैसा तारितो ?
सत्कीर्तीनेच स्वर्ग मिळतो । पुत्रपौत्रें कदा नोहे ॥५४॥
स्वर्ग अथवा मुक्ति कांही । सदगतिवेगळी अन्य नाही ।
मन:प्रवृत्ति सत्याकडे जाई । हीच उध्दारगति जीवाची ॥५५॥
यासाठी धन असल्या मालकीचें । करावें कार्य गांव-सोयीचें ।
विहीर, शाळा, छात्रालयादि कोणचें । सत्कार्य भावें ॥५६॥
अथवा बांधवावा एकादा मार्ग । जेणें जनतेचे चुकती कष्टभोग ।
आसक्ति सोडण्यानेच स्वर्ग । लाभेल त्यासि ॥५७॥
किंवा त्याचे जे नातलग । त्यांनी सत्कार्यांचा आणावा योग ।
उत्तम कार्यीं करावा उपयोग । धनाचा त्याच्या ॥५८॥
तयायोगें जी होईल कीर्ति । तिलाच सज्जन स्वर्ग म्हणती ।
लोक हृदयें गुण वाखाणती । याविण स्वर्ग असेना ॥५९॥
ज्याची पसरेल अपकीर्ति । त्यासि कैसी मिळेल मुक्ति ?
लोक मृत्यूवरीहि वाखाणती । ऐसें व्हावें जीवन ॥६०॥
याचसाठी उत्तम शिकावें । उत्तम राहावें वागावें ।
सर्वांस उत्तम करोनि सोडावें । कीर्तीसाठी ॥६१॥
कीर्ति तोचि स्वर्ग खरा । अपकीर्ति नरकाचा पसारा ।
याच जगीं यांचा व्याप सारा । पाहती प्राणी ॥६२॥
एरव्ही स्वर्गस्थळींहि गेला । तरी कुकर्में दु:खाचि देवेंद्राला ।
नव्याण्णव यज्ञें करोनि झाला । सर्प नहुष अहंकारें ॥६३॥
म्हणोनि कार्यांतचि स्वर्गनर्क । सकाम ग्रंथांचें फोल कौतुक ।
मिथ्या कल्पनांत भुलले लोक । स्वार्थियांच्या ॥६४॥
म्हणती कावळयाने पिंड नेला । तरीच तो स्वर्गाला गेला ।
नाहीतरि आत्मा अटकला । त्याचा कोठे ॥६५॥
हें म्हणणें कसेसेंचि वाटतें । पिंडाचें नाही महत्त्व येथे ।
महत्त्वाचें असे काय केलें तें । जन्मा येवोनि मानवाच्या ॥६६॥
मेल्यावरि दहा दिवस भ्रमतो । जीव पिंड देतां स्वर्गी जातो ।
नाहीतरि तो नर्की पडतो । ऐसें म्हणणें व्यर्थ असे ॥६७॥
त्याने केलें असेल उत्तम कर्म । तरीच पावेल उत्तम धाम ।
नाहीतरि पुन्हा अधम । योनींत जाणें स्वाभाविक ॥६८॥
प्राणी आपुल्याच कर्म-स्वभावें । भोगी उत्तम-अधम फळ बरवें ।
हें पिंडदानाने बदलोनि जावें । ऐसें नाही ॥६९॥
ज्याने सुकृतचि नाही केलें । त्याचे कितीहि पिंड उचलले ।
म्हणोनि काय उन्नत झालें । जीवन त्याचें ? ॥७०॥
भिक्षुकाघरीं दिली गाय । तिचें शेपूट धरोनि काय ।
वैतरणी नदी तरोनि जाय । गेलेला जीव ? ॥७१॥
हा तों आहे कर्मठ सोहळा । सग्यासोयर्यांचा विरंगुळा ।
पुत्रपौत्रांचा पुरवावया लळा । दिला निर्वाळा समाधाना ॥७२॥
टीका न करणें मृत्युग्रंथांची । तीहि असे साधना भावनातृप्तीची ।
परि यांतचि सार्थकता जीवाची । ऐसें आम्ही मानूं ना ॥७३॥
मृत्यु पावे त्यांचे नांव राहावें । म्हणोनि समाजसेवेस कांही द्यावें ।
त्याच्या सदगुणांचे गोडवे गावे । आपणहि तैसें व्हावया ॥७४॥
खरा पिंड आपणचि उचलावा । कर्तव्य करोनि जीव भूषवावा ।
त्यानेच पावेल कीर्ति जीवा । उज्ज्वल साची ॥७५॥
नाहीतरि मेला की रडावें । जिवंतपणीं लक्ष न द्यावें ।
ऐसें ढोंग कासायासि करावें । समाजाने ? ॥७६॥
जिवंत असतां रोटी ना दे । मेलियावरि वाजवी वाद्यें ।
कावळयासि पिंड, इतरां दक्षणा दे । म्हणोनि साधे काय त्यानें ? ॥७७॥
श्राध्दासाठी धन उधळावें । लोकलाजेस्तव मरावें ।
ऐसें कासया करावें । मूर्खपणें ? ॥७८॥
गेला जीव न राहे थांबून । वर्षमासाअंतीं घ्यावया भोजन ।
आपुलें घेवोनि पापपुण्य । फळ भोगाया पुन्हा जन्मे ॥७९॥
जीव पुन्हा जीवनीं यावा । कांही सत्संगतीस लागावा ।
मागील केलेला दोष चुकावा । म्हणोनि करावा सुसंकल्प ॥८०॥
किंवा त्याचें गुणवैभव । श्रध्देने आठवावें सर्व ।
हेंचि श्राध्द असे अपूर्व । श्रध्दांजलीरूप ॥८१॥
त्याची कीर्ति राहावी लोकीं । म्हणोनि करावीं दानपुण्यें निकीं ।
आपुल्याच गांवीं कौतुकीं । स्मरण राहील म्हणोनि ॥८२॥
जो कोणी ज्या रोगें मेला । तैसे होऊं नये इतरांला ।
म्हणोनि गांवीं औषधालयाला । मदत द्यावी त्या निमित्तें ॥८३॥
परि हें जनासि न कळे धर्मगुज । जाती तीर्थीं करोनि कर्ज ।
त्याने फावतें व्यापारा सहज । तीर्थियांच्या ॥८४॥
कांही सज्जन तीर्थासि जाती । अस्थि-राख भरोनि नेती ।
म्हणे गंगोदकें नाहीशीं होतीं । पापें त्याचीं ॥८५॥
’ काश्यां तु मरणान्मुक्ति ’ । ऐसी लोकीं वाढली भ्रांति ।
गंगाजळीं किडेहि मरती । तरि ते काय मुक्त झाले ? ॥८६॥
काशीवासी भक्त कबीर । समाधीसि निवडती गांव मगहर ।
ज्यास लोक म्हणती नर्कद्वार । तीच उध्दारभूमि झाली ॥८७॥
जन्मभरि सूत विणोन । प्रकट देखिला जनीं जनार्दन ।
त्या भक्त कबीराचें महिमान । गंगेंतील पाषाण जाणती कैसे ॥८८॥
जन्मवरि दोषकृत्यें केलीं । त्यावेळीं नाही गंगेंत ठरविलीं ।
आता हाडें टाकोनि झाली । सदगति म्हणे जीवाची ॥८९॥
हें सांगणारे आणि करणारे । यांना पोटापाण्याचें भरलें वारें ।
म्हणोनि मेल्यावरि करिती सारे । जिवंतपणीं न सांगती ॥९०॥
अहो ! ज्यांत मनचि नसतें । तें करोनिहि वाया जातें ।
मन देह मन दोन्ही नाहीत जेथे । तेथे काय घडवावें ? ॥९१॥
परि पंडेपुजारी सांगती गौरवें । तुमच्या वडिला स्वर्गीं पाठवावें ।
तरि बोला दक्षणा काय द्याल भावें । आम्हांलागी ? ॥९२॥
बिचारा भोळाभाळा शेतकरी । मजूर अथवा भाविक व्यवहारी ।
म्हणे कर्ज करोनि देतों पुरी । दक्षणा तुम्हां ॥९३॥
परि आमचे वाडवडील । स्वर्गाला कधी पाठवाल ?
म्हणूनि रडतो टेकवूनि भाल । पंडयापुढे ॥९४॥
ऐशा अंधश्रध्देसि वाढवोनि । धूर्त घेती स्वार्थ साधूनि ।
हें महापाप असे जनीं । निकष्टिकांचें ॥९५॥
वास्तविक ऐसी वेळ आली । त्यास पाहिजे संधी साधली ।
सांगावी पंडयाभिक्षुकांनी भली । युक्ति त्यासि ॥९६॥
” तुझे पितर स्वर्गांत जावे । ऐसें घेतलें तुझ्या जीवें ।
तरि त्यास संकल्प लागती करावे । गंगेमाजी ॥९७॥
मी पितर स्वर्गी जाण्यासाठी । संकल्प करितों जीवें पोटीं ।
दारू गांजा भांग आदि ओठीं । नाही लावणार जन्मभरि ॥९८॥
नाही करणार दुर्व्यवहार । नाही फसविणार दीनपामर ।
देईन सर्वांसि सहकार । सत्सेवेसाठी ” ॥९९॥
ऐसें जरि पंडयांनी करविलें । तरि त्यांचेहि उदर भरलें ।
आणि लोकांचेंहि कल्याण झालें । ऐसें होय ॥१००॥
परि पंडयाचि व्यसनी दुराचारी । फुकट लुटाया खटपट करी ।
तरि तो कैसेनि उध्दरी । समाजासि ? ॥१०१॥
म्हणोनि आंधळा कर्मठपणा । हा वाढवूंच न द्यावा कोणा ।
गांवगंगा म्हणोनि जाणा । तिलाच सर्व अर्पावें ॥१०२॥
गांवचा तलाव अथवा नदी । सुंदर पहावी विहीर आदि ।
स्नान करोनि साधावी शुध्दि । प्रभूला आठव द्यावा त्याचा ॥१०३॥
त्याचे निमित्ताने करावें सत्कार्य । कासया बघावें तीर्थ बाह्य ।
देव सर्वांठायींच आहे । सदासर्वकाळ ॥१०४॥
म्हणोनि हें साधन बदलावें । गांवीच सर्वकांही करावें ।
जें जें करणें असेल सदभावें । वळण द्यावें हें सर्वां ॥१०५॥
कोणी प्रेताची समाधी करिती । उगीच जागा गुंतवोनि धरिती ।
ऐसें करितां सारीच क्षिति । गुंतूनि जाइल त्यायोगें ॥१०६॥
मेला त्याची एक समाधि । जन्मला त्याच्या घरांची गर्दी ।
मग उरेल काय भूमि कधी । जगण्यासाठी इतरांना ? ॥१०७॥
जिवंत मानवां नाही घर । कष्टाळूंना नाही वावर ।
तेथे समाधीचें अवडंबर । मृतासाठी कासयासि ? ॥१०८॥
म्हणोनि सरळचि ऐसें करावें । मृतदेहाचे लोभी न व्हावें ।
पंचतत्त्वांशीं त्यास मिळवावें । अग्निसंस्कार देवोनि ॥१०९॥
स्मरण म्हणोनि घरीं वा गांवीं । योग्यशी तसबीर लावावी ।
वेळोवेळीं आठवण करावी । सदगुणी पुरुष म्हणोनि ॥११०॥
कुणाचीहि समाधि करोनि ठेवणें । हीं तंव आसक्तीचीं लक्षणें ।
समाधि करोनि काय होणें-जाणें । सांगा मज ॥१११॥
समाधि करोनि दर्शन होतें । तेंचि चित्र पाहोनि मनांत येतें ।
मनांत येण्याचेंचि महत्त्व येथे । सर्वात मुख्य ॥११२॥
वाटल्यास उत्तम स्थान करावें । ज्यात लोकशिक्षण चालेल बरवें ।
स्मरणार्थ म्हणोनि अर्पोनि द्यावें । गांवलोकांसि ॥११३॥
ऐसी आहे सहजस्थिति । त्यासि कासया करावी विकृति ?
जेणें समाज राहे सुस्थितीं । तीच महती वाढवावी ॥११४॥
मानव असो वा पशुपक्षी । न कराव्या त्यांच्या समाधि साक्षी ।
जिवंत समाज ठेवोनि लक्षीं । करावें कार्य सुस्थितीचें ॥११५॥
त्या दृष्टीनेचि भिन्न संस्कार । भिन्न वेळांचें महत्त्व थोर ।
लक्षूनि करावें सर्वांनी सुंदर । साजे तैसें ग्रामराज्या ॥११६॥
मृत्यु असो वा जन्मादि उत्सव । यांचा नुसता नको गौरव ।
गांवाचें वाढवावें वैभव । बचत करोनि, तुकडया म्हणे ॥११७॥
इतिश्री ग्रामगीता ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत ।
कथिला अन्त्यसंस्कार उचित । बाविसावा अध्याय संपूर्ण ॥११८॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥
॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥