वं. राष्ट्रसंतांचे साहित्य शोधण्यासाठी इथे शब्द सादर करा

अध्याय एकविसावा

ग्रामगीता

अध्याय एकविसावा : वैवाहिक जीवन

॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वराच्या इच्छेचे पूरक । समाजाचे दोनचि घटक ।
पुरुष आणि महिला देख । सृष्टिचक्र चालविती ॥१॥

चालावा जगाचा प्रवाह । व्हावा निसर्गगुणांचा निर्वाह । 
यासाठीच योजिला विवाह । धर्मज्ञांनी तयांचा ॥२॥

स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । जरि परस्पर सहायकें । 
तरीच संसाररथ चाले कौतुकें । ग्राम होई आदर्श ॥३॥

परि याची हेळसांड झाली । विवाहाची रूढीच बनली । 
मग यांतूनचि उदया आलीं । हजारों दु:खें समाजाचीं ॥४॥

पुरुषार्थासाठी वैवाहिक जीवन । विवाह समाजस्थैर्याचें साधन । 
परि वाढोनि अज्ञान प्रलोभन । झाली धुळधाण समाजाची ॥५॥

कितीतरी मुली असती सुंदर । परि हुंडयासाठी राहती कुवार । 
तैसाचि मुलांचा व्यवहार । जातींत भासे कित्येक ॥६॥

ऐसी वाईट पडली प्रथा । तेणें व्यभिचार वाढले सर्वथा । 
हें महापाप असे माथां । समाजाच्या ॥७॥

कुणाचे पिते लग्न करोनि देती । घराणें, पैसा, प्रतिष्ठा बघती । 
विवाहाआधी न पुसती । दोघांसहि ॥८॥

भिन्न स्वभावांचे प्राणी । जमवोनि आणावेत दुसर्‍यांनी । 
कैसी रुचेल जिंदगानी । दोघांसहि ? ॥९॥

वडिलांचा मान राखावा । म्हणोनि का संसार नागवावा ? 
ऐसातरी हेतु कां धरावा । वरिष्ठांनी ? ॥१०॥

विवाहाआधी परस्पराने । पाहावें दोघांनाहि निश्चयाने ।
विचारस्वातंत्र्य दोघांसहि देणें । अगत्याचें ॥११॥

वडिलांनी पहावी एक खूण । लग्न करिती काय आंधळे होऊन । 
पश्चात्तापाचें कारण । न पडावें म्हणोनिया ॥१२॥

एरव्ही दोघांच्याही मतें । लग्न जुळवूनि आणावें सु-मतें । 
नांदोत दोघेंहि एकसुतें । संसार सुखी करावया ॥१३॥

जुळतां दोघांचेहि विचार । विकास पावेल कारभार । 
दोघांची उत्साहशक्ति अपार । कार्य करील सेवेचें ॥१४॥

उत्तम राहणें उत्तम बोलणें । उत्तम सौंदर्य सात्विक लेणें । 
घरामाजी शोभून उठती तेणें । देवता जणूं समविचारें ॥१५॥

विचाराविण जें जें करणें । तें सर्वचि होतें लाजिरवाणें । 
ऐसेंचि मागील गार्‍हाणें । ऐकतों आम्ही ॥१६॥

भोगासाठी लग्न केलें । आंधळेपणीं संसार चाले । 
वर्ष लोटतांचि गोंधळले । दोन्ही प्राणी ॥१७॥

एक एकाशीं बोलेना । संशय वाढले दोन्हीजणां । 
कशाचा संसार ? यमयातना । वाटे पतिपत्नीसि ॥१८॥

विषय-विकारें लग्न केलें । पूर्वीच परस्परांसि नाही ओळखलें । 
तेणें सर्वाचि वाया गेलें । जीवन दोघांचें ॥१९॥

केवळ भोगासाठी लग्न । हें तों दिसे विचित्रपण । 
काय होतें पशु जमवोन । एके ठायीं ? ॥२०॥

मानवांचें एक होणें । स्वर्गसुखहि त्यांना ठेंगणें । 
त्यांच्या संयोगें उत्त्कर्ष पावणें । लावण्यासि ॥२१॥

श्वानांचिया पशुत्वसंयोगें । जन्मती जीव कर्मभोगें । 
टाकिलीं जाती सर्व मार्गें । श्वान-पिलीं ॥२२॥

तैसें नोहे मानवांचें । त्यांचें राहणें जबाबदारीचें । 
एक संतानहि थोर कामाचें । दिगंतरीं ॥२३॥

देशीं पाहिजे सर्वचि धन । रानधन, लेणीं आदि मानधन । 
द्रव्यधन, खाणी आणि गोधन । सर्वकांही ॥२४॥

सर्व धनांमाजी सुपुत्रधन । वाढवी राष्ट्राचें गौरवस्थान । 
म्हणोनिच वधुवरांनी शोधून । लग्न करावें विचारें ॥२५॥

नाहीतरि मरतुकडे पुत्र व्हावे । तेणें घराणें बुडोन जावें । 
देशासहि कलंकित करावें । न होवो ऐसें ॥२६॥

उत्तम बीजसि उत्तम जमीन । तेणें वृक्ष वाढतो भेदूनि गगन । 
ऐसेंचि असावें सन्तान । बलभीमासारिखें ॥२७॥

ऐसें सन्तान घराणें शोभवी । एकवीस कुळांचें नांव जागवी । 
स्वकर्तव्याने चमकवी । देश आपुला ॥२८॥

परि पुत्रांचीहि असावी मर्यादा । देशीं न वाढवी आपदा । 
शरीर संरक्षणाचीहि संपदा । गमावूं नये संसारीं ॥२९॥

निरोगी रक्त उत्तम गुण । सुस्वभावी ऐसें सन्तान । 
हें नाही सर्वस्वीं अवलंबून । जाति-कुळ-गोत्रावरि ॥३०॥

दोघें प्राणी उपवर असती । भिन्नजाति लग्न करूं म्हणती । 
विचारें करितां, त्यांसि संमति । अवश्य द्यावी ॥३१॥

गुण गुणाकडे धांव घेतो । आपण शास्त्रींपुराणींहि ऐकतों । 
मिश्र विवाहाने बिघाड होतो । म्हणणें व्यर्थ ॥३२॥

मिश्र विवाह ऐसा नसावा । इच्छा नसतां बळी पाडावा । 
विचार करण्यास अवकाश द्यावा । प्रसन्न चित्तें ॥३३॥

विचारें ’ जीवनाच्या संग्रामीं । हाचि विवाह करूं आम्ही । 
’म्हणती दोन्ही विवेकी प्रेमी । आड कोणी कां यावें ? ॥३४॥

मागे गुणविवाह बहुत झाले । श्रीकृष्णें अर्जुनादिकें केले । 
समाजीं अनेक प्रयोग घडले । विवाहांचे भिन्न भिन्न ॥३५॥

गुणसाम्याचे मिश्रविवाह । वीरश्रीच्या कसोटीचे विवाह । 
राष्ट्रांतील भेद मिटविण्याचे विवाह । नाना जमातींमधूनि ॥३६॥

ऐसे अनेक तात्विक विवाह । त्यांत कांही राक्षस-विवाह । 
बळजबरीने बांधले देह । अनेक हेतूंसाठी ॥३७॥

ऐशा गोष्टीस मात्र जपावें । बाळपणींहि लग्न नसावें । 
समजूतदारीने करूनि द्यावे । लग्नप्रसंग ॥३८॥

कांही पित्यांची असते हौस । मुलींचें वय तीन वर्ष । 
अथवा असतां तीन मास । करिती लग्न ॥३९॥

वयांत येती वधुवर । माहीत नसतो मानवी व्यवहार । 
बळी पडती रूढीसि पामर । दोन्ही प्राणी ॥४०॥

पुढे एक एकाशीं न मिळे । सर्प-मुंगुसापरी सगळें । 
मग पंचायती-नोटिसांचे सोहळे । जीवन गारद यांतचि ॥४१॥

कांही मुली विधवा होती । बालवयींच पति वारती । 
पुढे त्याची होते फजीती । लग्नावांचोनि ॥४२॥

रूढि सांगते लग्न न करावें । मन बावरे कोणीं आवरावें ? 
चोरूनि पापाचरणी व्हावें । तरि तें दु:खदायी ॥४३॥

ऐशा ज्या ज्या वाईट रीती । झुगारोनि द्याव्या हातोहातीं । 
करावी पुन्हा नवीन निर्मिती । समाजनियमांची ॥४४॥

ज्या विधवेस वाटे लग्न करावें । तिने वडीलधार्‍यांसि सांगावें । 
त्यांनी सहृदयपणें लग्न योजावें । जीवधर्म म्हणोनिया ॥४५॥

ज्या विधवेची इच्छा नाही । तिला छळूं नये कोणी कदाहि । 
ती सती संन्यासिनी समजोनि देहीं । राखावी समाजाने ॥४६॥

ऐसेंचि हें घडूं द्यावें । मानवांच्या प्रकृतिस्वभावें । 
तरीच मानव म्हणविणें बरवें । शोभा देतें ॥४७॥

कांहींचे वडील लग्न करोनि देती । मनास वाटेल तो हुंडा घेती । 
जोड-विजोड कांही न पाहती । धनापायीं ॥४८॥

वृध्द वा रोगी असोनि वर । वधु देती बालिका सुंदर । 
धनासाठी दुर्व्यवहार । परोपरीचे ॥४९॥

मुलामुलींचा घेवोनि पैसा । जीवनांत वाढविती निराशा । 
मोलाने का प्रेम-फासा । पडे गळीं कोणाच्या ? ॥५०॥

बालक-बालिकेसि वाचा नसते । तोंड फोडोनि बोलेना ते । 
परि हे कसाब म्हणावेत पुरते । जे विजोड लग्न योजिती ॥५१॥

ऐशा असतील ज्या वेडया रीती । त्या काढोनि टाकाव्या प्रवृत्ती । 
जीवनाचें प्रेम चित्तीं । तेंचि धन समजावें ॥५२॥

ज्याने मुलामुलींचे पैसे घेतले । त्यासि समाजाने पाहिजे निषेधिलें । 
तरीच हे दुराग्रह मोडले । जातील आता ॥५३॥

नाहीतरि हुंडयापांडयासाठी । जीवन होईल मसणवटी । 
अनेक मुलेंमुली करिती शेवटीं । आत्मघात ॥५४॥

कित्येक हात धरोनि जाती । समाजजीवनीं कालविती माती । 
परि लोभ न सोडवे शहाणियांप्रति । पैशांचा अजुनि ॥५५॥

हें गांवाने दुरुस्त नाही केलें । तोंवरि पापांचें डोंगर वाढले । 
सगळे गांवचि भागीदार झालें । समजावें त्यांचें ॥५६॥

कांही घरीं मुली उपवर । मुलेंहि लग्नासाठी तयार । 
तेथे आटयासाटयाचा व्यवहार । करिती कोणी ॥५७॥

मुलामुलींची नसतां जोड । आपुलिया सोयीसाठी उघड । 
लादिती मानेवरि जोखड । मायबाप ॥५८॥

मग तेथे भांडाभांडी । मुलगी माहेरींच न धाडी । 
अथवा टाकोनि करिती नासाडी । जीवनाची तिच्या ॥५९॥

कांही आपुल्या मानाकरितां । मुलींच्या दैवीं आणिती व्यथा । 
ऐशा वाढल्या वाईट प्रथा । कितीतरी गांवीं ॥६०॥

कांही जातींत ठेविती पडदा । जणूं कोंडवाडयाचाचि धंदा । 
त्याने लग्न झालियाहि आपदा । येते केव्हा ॥६१॥

मुलगी पडद्याने बघितली नव्हती । आता कळलें तिरळी होती । 
कांही म्हणती लग्नप्रति । मागे घ्यावें काडीमोडीने ॥६२॥

पडद्याचिया प्रस्थामुळे । शहाणे तेहि होती खुळे । 
गर्दीत पति चुकतां गोंधळें । पडे बापडी गुंडाहातीं ॥६३॥

दुर्जन बुरख्याआड लपविती । ऐशा स्त्रिया नेल्या किती । 
अजूनिहि नेत्र न उघडती । समाजाचे ॥६४॥

पडदापध्दति बहुपरी भोवे । थोरांपुढे कधी न यावें । 
परिशुश्रुषाहि अंतरल्या याभावें । कितीतरी मुली ॥६५॥

ऐशा विचित्र कांही प्रथा । मोडोनि टाकाव्या समाजीं व्यथा । 
लावूं नये दोष माथां । कोणा एकाच्याचि ॥६६॥

कांही मायबाप पोरा चढविती । पुरुषें कैसेंहि वागावें म्हणती । 
मुलीस गांजिती, मार देवविती । ऐसी वृत्ति आसुरी ॥६७॥

कांही मायबाप मुलींचे कैवारी । ’ हूं ’ म्हणतां जावोनि पडती द्वारीं । 
ऐसें कु-शिक्षण नानापरी । दु:ख संसारीं वाढवी ॥६८॥

कांही पतिपत्नींचें संघटन । परि आड येई थोरांचा मान । 
काडीमोड, विरोध अथवा भांडण । करी वैराण जीवन त्यांचें ॥६९॥

कांही लपवालपवी करिती । मुली नांदायासि न धाडिती । 
कांही मुलींना ओढूनि नेती । तमाशा करिती जीवनाचा ॥७०॥

कांही लग्नाआधी लपविती उणीव । त्याची पुढे होतां जाणीव । 
जन्मभरि भोगावा लागे उपद्रव । सकळांसि मग ॥७१॥

कांही बढाई दाविती खोटी । कांही रुसती आंदणासाठी । 
सोय न पाहतां करिती कष्टी । परस्परांसि सोयरे ॥७२॥

कोणास दागिन्यांची हाव । सदगुणांचा नकळे भाव । 
त्यांस फसवी नकली वैभव । जीवन गारद मुलींचें ॥७३॥

मुलीमुलांचा लग्नाबाजार । शिक्षण, सौंदर्य, नोकरीवर । 
भाव न्यूनाधिक ठरविती साचार । जीवनमूल्यें न जाणतां ॥७४॥

कांही लग्नांचे दलाल । उधळीत जाती रंग गुलाल । 
मुलामुलींचें जीवन हलाल । करिती स्वार्थास्तव ॥७५॥

कांही मुलींना खपवूं पाहती । ध्यानीं न घेतां नीति-अनीति । 
ऐसी लाचार केली स्थिति । नाना रूढयांनी ॥७६॥

ज्योतिषासि देऊन-घेऊन । मनासारिखे काढविती गुण । 
प्रसंगीं नावंहि सांगती बदलून । दंभ दारूण वाढला ॥७७॥

आकाशांतील पाहती ग्रह । इकडे स्वभावीं वेगळे दुराग्रह । 
जीवनांत वाढे जयांनी द्रोह । ऐसे त्यांना न दिसती ॥७८॥

म्हणती वधुवरें सुलक्षण । जुळले त्यांचे छत्तीसगुण । 
इकडे छत्तीसी अथवा खडाष्टक पूर्ण । करी जीवन बरबाद ॥७९॥

वधुवरांचे उत्तम गुण हेंचि परस्परांचें महाभूषण । 
त्यावांचोनि विवाह केला वैभवपूर्ण । तरि तो सर्व अमंगल ॥८०॥

कांही ठिकाणीं विवाह करिती । वेडयासारखा पैसा उधळिती । 
उपयोग नाही ऐसी रीति । कासयास आचरावी ? ॥८१॥

लग्नाचे अपार सोहळे । विहीण-व्याही-मामे सगळे । 
वर्‍हाडांचे गोंधळ सावळे यासि विवाह म्हणों नये ॥८२॥

अस्ताव्यस्त तारांबळ । उधळपट्टी आणि धांवपळ । 
यासि म्हणावें कार्य अमंगळ । खर्च निष्फळ पैशांचा ॥८३॥

लग्नाकरितां कर्ज करावें । जन्मभरि व्याज भरीत जावें । 
लग्नासाठी कफल्लक व्हावें । कोण्या देवें सांगितलें ? ॥८४॥

चार-पांच दिवस लग्न । लग्नांत होती नाना विघ्नं । 
मोठेंपणाचें विडंबन । कासयासि करावें ? ॥८५॥

असोत अडी-अडचणी किती । साधिलीच पाहिजे तिथि । 
ऐसी कां ठेवावी प्रवृत्ति । रूढिबध्द ? ॥८६॥

प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त । 
बाकीचें झंजट फालतू । समजतों आम्ही ॥८७॥

दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर । 
सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥८८॥

खर्च नको भव्य मंडपाचा । देखावा असवा निसर्गाचा । 
अथवा सभामंडप मंदिराचा । योजावा या कार्यासि ॥८९॥

वेळ पैसा आणि श्रम । वाचवावेत करोनि नेम । 
गुणांस द्यावें महत्त्व परम । जाति-धन-भ्रम सोडोनि ॥९०॥

सुंदर करावें सभास्थान । बैसवावे साजेलसे जन । 
वरवधूंना समोर बसवून । सूचना द्यावी सूचकें ॥९१॥

द्यावा वरवधूंचा परिचय । प्रकट करावा सत्कार्य-निश्चय । 
मग साधावें कार्य मंगलमय । मंगलाष्टकें म्हणोनिया ॥९२॥

मंगलाष्टकीं विवाह-उद्देश । सज्जनें करावा उचित उपदेश । 
येऊं न द्यावा नाटकी अंश । अपवित्र त्यांत ॥९३॥

सभा असावी आदरपूर्ण । देऊं नये धूम्रपान । 
धर्मसंस्कार वाटावें लग्न । अग्निदेवते स्मरोनिया ॥९४॥

वडील जनांचे आशीश घ्यावे । सर्वांशी प्रेमादरें वागावें । 
गोडं बोलोनिं उरकवावें । लग्नप्रसंगा ॥९५॥

वरवधूंना ग्रामीण खादी । असो जुनी वा नवी साधी । 
ऐशा वस्त्रींच लग्नाक्षदी । पडाव्या शिरीं उभयतांच्या ॥९६॥

कपडे असती ते घालावे । नसतां धुवोन स्वच्छ करावे । 
अहेरादि नको लग्नप्रसंगीं यावें । सर्वजनें आदरें ॥९७॥

लग्नानिमित्त भेटीच देणें । तरि उभयतांचा संसार सुरू व्हावा तेणें । 
अथवा गांवाचें फिटावे उणें । ऐशी योजना करावी ॥९८॥

सारांश, लग्नाचा प्रसंग । विचाराने करावा यथासांग । 
समजोनि परिस्थिति वेळप्रसंग । सर्वकांही ॥९९॥

ऐसा हा मंगल प्रसंग । देशाचें भूषवी अंग । 
समाजजीवन करील अभंग । वाढेल कीर्ति गांवाची ॥१००॥

विवाहाचा जो संस्कार । त्याचें महत्त्व सर्वांत थोर । 
त्या पायावरीलच समाजमंदिर । म्हणोनि सुंदर करा यासि ॥१०१॥

यासाठीच वधुवरांसंबंधीं बोललों । नवनिर्माण ओघानें पुढे चाललों । 
सांगोनि एकदा मुक्त झालों । सुखदु:ख समाजाचें ॥१०२॥

स्त्रीपुरुष हीं दोन चाकें । परस्परपोषक होतां निके । 
गांव नांदेल स्वर्गीय सुखें । तुकडया म्हणे ॥१०३॥

इतिश्री ग्रामगीत ग्रंथ । गुरुशास्त्र-स्वानुभव संमत । 
विवाहसंस्कारें ग्रामोद्वार कथित । एकविसावा अध्याय संपूर्ण ॥१०४॥

॥ सद्गुरुनाथ महाराज की जय ॥